आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
अयोध्येत राम मंदिराचे भूमी पूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिथे एक पारिजाताचा वृक्ष लावण्यात आल्याचे तुम्ही वाचले किंवा ऐकले असेलच. या ठिकाणी पारिजाताचेच झाड का लावण्यात आले असावे बरे? कारण आपल्या शास्त्रानुसार पारिजात वृक्षाला पवित्र वृक्ष मानले जाते.
हिंदू धर्मात या वृक्षाला विशेष महत्व आहे. पारिजातकाची फुले दिसायला तर सुंदर असतातच शिवाय हे संपूर्ण झाडच औषधी गुणांनी युक्त आहे. अनेक प्रकारच्या रोगांवर पारिजातकाची फुले, कळ्या आणि खोड देखील उपयुक्त ठरते. आपल्या पुराणातूनही या वृक्षाचे अनेक ठिकाणी उल्लेख केलेले आढळतात. पृथ्वीलोकांतच नाही तर देवलोकांतही हा वृक्ष खूप प्रिय आहे. इंद्राच्या दरबारातही याला स्थान होते असे म्हणतात.
सत्यभामानेही कृष्णाकडे पारीजातकांच्या फुलांचा हट्ट धरला होता. हरीवंश पुराणातही या वृक्षाचा उल्लेख आढळतो. या झाडाला हात लावताच स्वर्ग सुंदरी उर्वशीचा थकवा दूर होत असे.
पारिजातकाच्या जन्माची कथाही तितकीच विलक्षण आहे. राक्षस आणि देवांनी जेंव्हा समुद्रमंथन केले, तेंव्हा त्या समुद्रमंथनातून जे चौथे रत्न बाहेर पडले ते म्हणजे हे पारिजातकाचे झाड.
इंद्राने हाच पारिजात आपल्या दरबारात लावला. पुढे कृष्णाने इंद्राशी युद्ध करून हे झाड पृथ्वीवर आणले अशीही कथा आहे. देव लोकातील झाड म्हणून आजही हे पवित्र मानले जाते.
परिजाताकाच्या झाडावरून कृष्ण आणि इंद्रामध्ये जे युद्ध झाले त्या युद्धामागेही एक कथा आहे. ती अशी, एकदा नारदमुनी देवलोकातून फिरत होते. फिरता फिरता ते इंद्राच्या दरबारात पोहोचले. इंद्राच्या दरबारात दरवळणारा मंद सुगंध त्यांना आकर्षित करत होता. त्या मंद सुगंधाचे कारण शोधताना नारदांना दिसला तो प्राजक्ताचा (पारिजातकाचा) सडा.
पांढऱ्या रंगाची पाने आणि केशरी रंगाचा देठ असलेला तो प्राजक्ताच्या फुलांचा सडा पाहून नारदांना राहवले नाही. त्यांनी त्यातील काही फुले वेचली आणि ते पुढे निघाले. ती फुले घेतलेले नारद पोहोचले कृष्णाच्या दरबारात. ती फुले पाहून रुक्मिणीही हरखून गेली तिने कृष्णाला नारदाकडून ती फुले मागून घेण्याचा हट्ट धरला. कृष्णाने नारदमुनींकडून ती फुले मागून घेतली आणि रुक्मीणीला दिली.
नारदमुनी ते नारदमुनीच शेवटी, त्यांनी ही गोष्ट सत्यभामेला सांगितली. ते म्हणाले, “कृष्णाने रुक्मीणीला देव लोकातील सर्वात सुगंधी आणि सुंदर फुले भेट म्हणून दिली. कृष्णाची लाडकी तर रुक्मिणी आहे, मग तुझं काय?”
झालं सत्यभामेने मलाही तीच फुले हवीत म्हणून कृष्णापुढे हट्ट धरला. कृष्णाने इंद्राच्या दरबारातून तुझ्यासाठीही फुले आणून देईन असे वचन दिले.
परंतु इथेही नारदांनी घोळ घालून ठेवला. त्यांनी इंद्राला कृष्णाविरुद्ध हे सांगून भडकावले की कृष्ण तुझ्या दारातील हा संपूर्ण पारिजातच उचलून नेणार आहे. कृष्ण इंद्राकडे पारिजातकाची फुले मागायला आला होता झाड नेण्यासाठी नाही. परंतु, सत्य जाणून न घेताच इंद्राने कृष्णाशी युद्ध सुरु केले.
शेवटी कृष्ण या युद्धात जिंकला आणि त्याने खरोखरीच पारिजताकाचे संपूर्ण झाड आणून सत्यभामेच्या अंगणात लावले. तेंव्हा हा पारिजात अशा रीतीने स्वर्ग लोकातून पृथ्वीवर अवतरला.
इंद्राकडून कृष्णाने युद्ध करून झाड मिळवले असले तरी, इंद्राने पारीजातकाला शाप दिला की ही फुले कधीच दिवसाची फुलणार नाहीत. इंद्राच्या शापाच्या प्रभावाने ही फुले कधीच दिवसा फुलत नाहीत. रात्री फुलतात आणि सूर्य उगवताच ती झाडावरून गळून पडतात.
याशिवाय पारिजातकाच्या जन्माची आणखी एक कथाही प्रचलित आहे.
कोणे एकेकाळी पारिजात नावाची एक सुंदर राजकन्या होती. ही राजकन्या सूर्यावर मनोमन प्रेम करत असे. पण, सूर्य काही तिच्या प्रेमाला दाद देत नव्हता. सूर्याला आपल्या प्रेमपाशात ओढण्यासाठी तिने बरेच प्रयत्न केले पण सूर्य काही तिच्यावर भाळला नाही. शेवटी निराश झालेल्या राजकुमारीने प्रेम असफल झाल्याने आत्महत्या केली.
पारिजात राजकुमारीच्या समाधीवर एक झाड उगवून आले. तोच हा पारिजात, अशीही कथा आहे. म्हणूनच पारिजाताचे झाड रात्रीचे उदास वाटते. सूर्याची किरणे पडताच याची फुले जणू सूर्याकडे झेपावण्याच्या आशेत खाली गळून पडतात.
पारिजाताची फुले लक्ष्मी देवीलाही खूपच प्रिय आहेत. पारिजातकाची फुले वाहिल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते. पारिजातकाची झाडावरून खाली पडलेली फुलेच पूजेसाठी वापरण्यात येतात. पारिजातकाची फुले तोडणेही शास्त्रानुसार निषिद्ध मानण्यात आले आहे.
याशिवाय पारिजात औषधीय गुणांनी युक्त आहे. मुळव्याधाच्या त्रासात पारिजातकाच्या बियांचा वापर केला जातो. मुळव्याधीवर हे एक रामबाण इलाज असल्याचे मानले जाते. पारिजाताची पाने कुटून ती मधासोबत चाटून खाल्ल्यास खोकला बरा होतो.
पारिजातकाच्या पानांचा लेप लावल्याने त्वचेचे आरोग्यही सुधारते आणि त्वचारोगापासूनही मुक्ती मिळते. या पानांपासून बनवले जाणारे तेलही त्वचा रोगावर अधिक उपयुक्त आहे.
पारिजातकाच्या कळ्या आणि मिरी एकत्र खाल्ल्यास स्त्रियांना स्त्रिरोगांच्या तक्रारीत फायदा होतो. जुनाट तापावरही याच्या पानांचा रस अधिक गुणकारी आहे.
कवी देखील प्राजक्ताच्या प्रेमांत पडलेले दिसतात. अनेक कवींना भल्या पहाटे पडणारा प्राजक्ताचा सडा फारच आकर्षित करतो.
परीजाताकाला प्राजक्त, हरसिंगार, शेफाली अशा विविध नावांनी ओळखले जाते. उर्दूमध्ये याला गुलजाफरी म्हंटले जाते.
पारिजातकाचा वृक्ष दिसायला फारच सुंदर असतो. भारतात सर्वत्र हे वृक्ष आढळतात. शिवाय, याला धार्मिक महत्व असल्याने कित्येक ठिकाणी अगदी तुळशीप्रमाणेच प्राजक्तालाही घराच्या अंगणात आवर्जून स्थान दिले जाते.
भारतकोशमधील माहितीनुसार नुसत्या प्राजक्ताच्या स्पर्शानेही एखाद्या व्यक्तीचा थकवा दूर पळून जातो.
हा वृक्ष १०-१५ फुट उंच असतो. काही ठिकाणी तर याची उंची आणि घेरही अजूनच वाढलेला दिसतो. या झाडाला बाराही महिने बहर येतो. पावसाळ्यात याला अजूनच जास्त बहर आलेला दिसून येतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.