आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगातील सर्वात मोठी भिंत कोणती? तर चीनची, “वॉल ऑफ चायना”. पण, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची भिंत जगात कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे का? नाही? मग आम्ही तुम्हाला सांगतो जगातील दुसरी मोठी भिंत कोणती आणि ती कुठे आहे?
जगातील दुसरी मोठी भिंत भारतातच आहे. काय म्हणाला? भारतात कुठे? राजस्थानमधे.
राजस्थानमधील मेवाडच्या ‘कुंभालगड’जवळील कुंभाल किल्ल्याच्या भिंतीबद्दल आम्ही बोलत आहोत.
ही भिंत जगातील दुसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील सर्वात मोठी भिंत आहे.
कुंभालगड हे तसे नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षण स्थळ राहिले आहे, ते त्याच्या निसर्गसंपन्न सौंदर्यामुळे. या किल्ल्याचे बांधकाम आणि भोवतालचा मनोहरी परिसर देशविदेशातील पर्यटकांना नेहमीच साद घालत असतो.
या कुंभालगडाच्या सभोवताली बांधलेली भिंत सुमारे ३६ किमी लांबीची आहे. म्हणूनच ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी भिंत ठरते. १५व्या शतकात राणा कुंभाने या भिंतीचे बांधकाम केले असे म्हटले जाते. ३६ किमी लांबीची ही भिंत बांधण्यासाठी सुमारे १५ वर्षांचा कालावधी लागला होता.
राणा कुंभाने या भिंतीचे काम सुरु केले. पण, दिवसभरात बांधलेली भिंत संध्याकाळ झाली की लगेच पडून जात असे. कित्येक दिवस हे असेच सुरु राहिले. यावर उपाय योजण्यासाठी राजाने राज्य पंडितांचा सल्ला विचारला. राज्यातील पंडितांनी सांगितले की,
“हे राजा या भिंतीचे बांधकाम तडीस जाण्यासाठी नरबळी दिला पाहिजे. पण, यासाठी राज्यातील कुठल्याही नागरिकावर सक्ती करून चालणार नाही. या नरबळीसाठी कुणीतरी स्वतःहून बलिदान दिले पाहिजे. त्याचा बळी देऊन त्या व्यक्तीला जेंव्हा या भिंतीच्या पायाशी पुरले जाईल तेंव्हाच या भिंतीचे काम यशस्वी होईल.”
पंडिताची भविष्यवाणी तर दुर्दैवी होती पण, राजाला भिंतीचे काम पूर्ण करवून घेणेही तितकेच गरजेचे होते.
मग राजाने संपूर्ण राज्यात दवंडी पेटवली की, “या गडाच्या भिंतीच्या पायाशी जो कुणी स्वखुशीने बलिदान द्यायला तयार होईल त्याच्या वारसांना मोठी रक्कम बक्षीस दिली जाईल.”
राजाला वाटले बक्षिसाच्या आशेने का असेना कुणी ना कुणी तयार होईल. पण, राज्यातील एकही व्यक्ती तयार झाली नाही. खूप दिवसांनी राजाच्या सैन्यातीलच एक सैनिक या भिंतीसाठी स्वखुशीने बलिदान देण्यास तयार झाला.
या सैनिकाचा बळी दिल्यानंतर भिंतीचे बांधकाम अगदी व्यवस्थितपणे सुरू झाले आणि भिंत बांधून पूर्णही झाली. किल्ल्याचे सरंक्षण करण्यासाठी ही भिंत आवश्यक होतीच. या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशीच त्या बळी देण्यात आलेल्या सैनिकाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराचे नाव आहे, हनुमान पोल.
किल्ल्याच्या खाली शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीही भरपूर प्रकाश मिळावा म्हणून राजा महाराणा कुंभ या किल्ल्यावर मोठमोठ्या मशाली लावत असे. या मशालींमध्ये तो दररोज ५० किलो तूप आणि १०० किलो कापूस जाळत होता असे म्हटले जाते.
मेवाडचे शूर प्रतापी राजा महाराणा प्रताप यांचा जन्मही याच कुंभालगडावर झाल्याचे म्हटले जाते. १९ व्या शतकापर्यंत हा किल्ला उदयपूर संस्थानाच्या ताब्यात होता. संध्याकाळच्या वेळी जेंव्हा गडावर रोषणाई केली जाते तेंव्हा तर गडाचे सौंदर्य अक्षरश: दृष्ट लागण्याजोगे असते. आज पर्यटकांसाठी हा गड खुला आहे. या ऐतिहासिक स्थळाला जागतिक वारसास्थळाचाही दर्जा मिळाला आहे.
राजस्थानच्या डोंगर-किल्ले विभागाकडूनही या किल्ल्याची देखीभाल आणि डागडुजी केली जाते.
उदयपुरपासून हा किल्ला फक्त ८२ किमी अंतरावर आहे. तुम्ही उदयपुरपासून बसने देखील जाऊ शकता. मेवाडचा चितोडगड जितका प्रसिद्ध आहे तितकाच हा गड देखील राजस्थानच्या इतिहासात या दोन्ही गडांना विशेष स्थान आहे.
समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची १११० मीटर उंचीवर आहे. आरवली पर्वतरंगाच्या एका टेकडीवर वसलेल्या या किल्ल्याला निसर्ग सौंदर्याचेही कोंदण लाभले आहे. या किल्ल्याच्या भिंती १५ फुट रुंद आहेत. किल्ल्यामध्ये एकूण ३६० मंदिरे आहेत. यामध्ये जैन आणि हिंदू दोन्ही धर्मातील मंदिरांचा समावेश आहे. १४४३ मधे सुरु झालेल्या या किल्ल्याचे बांधकाम १४५८ मध्ये पूर्ण झाले. या किल्ल्यात अनेक महाल, मंदिरे आणि निवासी इमारती देखील आहेत. किल्ल्यावरील सपाट जमिनीचा उपयोग शेतीसाठी आणि उंचसखल जमिनीचा उपयोग जलाशयांच्या निर्मितीसाठी करण्यात येत होता.
भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला अगदी अवघड वळणावर वसलेला असल्याने या किल्ल्यापर्यंत पोचणे शक्य नव्हते, म्हणूनच शत्रूंच्या हल्ल्यापासून या किल्ल्याचा बचाव झाला. कठीण प्रसंगी मेवाडचे राजे याच किल्ल्याच्या आश्रयाला येत असत. विक्रमादित्याचा वध करून बंबीरने जेंव्हा गादी स्वतःच्या ताब्यात घेतली तेंव्हा मेवाडचा राजकुमार उदय याच किल्ल्यात आश्रयाला आला. त्याचे वय त्यावेळी खूपच लहान होते त्यामुळे बंबीरशी लढून त्याला आपला हक्क परत मिळवणे शक्यच नव्हते.
चारही बाजूंनी अभेद्य असलेला हा किल्ला भेदणे शत्रूला फक्त तेंव्हाच शक्य झाले जेंव्हा एकाचवेळी मुघल सम्राट अकबर, अंबरचा राजा मानसिंह, मारवाडचा राजा उदयसिंह आणि गुजरातच्या मिर्झा घराण्याने एकत्र येऊन या किल्ल्यावर हल्ला केला. एकत्र झालेल्या शत्रू सैन्याने किल्ल्याला घेराव केला. किल्ल्यावरील पाण्याचे साठे संपत आल्यावर आतून किल्ला लढवणाऱ्या लोकांना किल्ला सांभाळणे अवघड झाले. आणि या किल्ल्यासाठी तह करावा लागला.
ऑक्टोबर ते मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये इथले वातावरण पर्यटनाच्या दृष्टीने एकदम योग्य असते. उन्हाळ्यात या ठिकाणचे तापमान ३२ ते ४५ डिग्रीवर पोहोचलेले असते त्यामुळे चुकूनसुद्धा उन्हाळ्यात या ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार करू नका. शिवाय पावसाळ्यात या ठिकाणी बेफाम पाऊस सुरू असतो. म्हणूनच हिवाळ्यात जर फिरायला जायचा विचार करत असाल तर या किल्ल्याला भेट द्यायला हरकत नाही.
फोटोग्राफी करण्यासाठी तर इथे तुम्हाला एकाहून एक भन्नाट जागा मिळतील. शिवाय जंगल सफारी, ट्रेकिंग, यांचाही आनंद लुटता येईल. इथे वन्यप्राण्यांचे अभयारण्यही आहे. पर्यटकांना हा किल्ला आणि या गडाचा परिसर का भुरळ पडतो ते आता तुम्हाला समजले असेलच.
मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक वैभव आणि निसर्ग सौंदर्याची लयलुट यांचा मिलाफ साधणाऱ्या या किल्ल्याला एकदा तरी आवर्जून भेट द्यायला हवीच.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.