आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात काही किलोमीटर्सवर एक नवी संस्कृती आणि लोककला पाहायला मिळते. कोकण किनारपट्टी आणि केरळचा भाग तर सांस्कृतिक रंगांची उधळण करतो. कोकणातील दशावतार, कोळीगीत, पश्चिम महाराष्ट्रातील भारूड ही महाराष्ट्रातील लोककलांची उदाहरणे.
नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या केरळमध्ये पुथरी, थिरायाट्टम, थिय्याम, नीरा, अशा अनेक लोककला आहेत. याच केरळमध्ये कथकली नावाची लोककला देखील प्रसिद्ध आहे. या लोककलेला विशेष महत्त्व दिलं जातं ते अयिरूर या गावात. कथकली आणि अयिरूर गावाबद्दल जाणून घेण्यासाठी हा विशेष लेख..
अयिरूर गावाने कथकली या लोककलेबद्दल आपली आत्मीयता जपली आहे. गावातील एखाद्या पाच वर्षांच्या मुलालाही कथकलीची प्रत्येक मुद्रा लक्षात असते आणि अगदी इतक्या कमी वयाची मुलं-मुली देखील ही कला अतिशय उत्साहाने सादर करतात. याशिवाय या गावातील आणि जिल्ह्यातील स्थानिक शाळांमध्ये देखील “क्लासिकल डान्स फॉर्म” हा विषय शिकवला जातो. गावातील आणि जिल्ह्यातील अनेक तरुण परफॉर्मर्स, सिंगर्स, आणि मेक-अप आर्टिस्ट्स बनले आहेत. गेली अनेक वर्षे यांतील बहुतेक जण ‘केरळ कलामंडलम’ या कला विद्यापीठात याच कलेचं औपचारिक शिक्षण घेत आहेत.
या कलेला सुमारे दोन शतकांचा इतिहास असला तरी, गेली १२ वर्षे या गावामध्ये ही कला जपण्यात आली आहे. यावर्षी केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारताच्या सर्वेयर जनरल, म्हणजेच भारताच्या सर्वेक्षण विभागाच्या प्रमुखाने या गावाचे नामकरण “कथकली ग्रामम” असे करण्याचे ठरवले आहे. या नामकरणाची पार्श्वभूमी सांगितल्याप्रमाणे येथील गावकऱ्यांनी या कलेचा अगदी मनापासून स्वीकार करून ध्यासच घेतला आहे. समाजामध्ये एकोप्याची, सलोख्याची भावना एखाद्या कलेमुळे वाढीस लागल्याचे हे सर्वोत्तम उदाहरण असल्याचे आपल्या लक्षात येईल.
अयरुर या गावामध्ये सर्वांत जास्त कथाकलीची साक्षरता आहे असे मत ‘जिल्हा कथकली क्लब’चे सेक्रेटरी विमल राज यांचे आहे. राज स्वतः जरी प्रोफेशनल कथकली प्रेझेन्टेशन देणार नसले तरी त्यांना कलेबद्दल, त्याचे म्युझिक, कथाकथन इत्यादींचे कौशल्य प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे या विषयीचे ज्ञान, जिल्हा कथकली क्लबद्वारे मिळालेले अधिकार आणि अयारूर गावाची भूमिका जवळजवळ एकच आहे.
कथाकली हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे, कथा म्हणजे गोष्ट, आणि कली नाटक, म्हणजेच या कलेमध्ये नाट्य रूपाने एखादी गोष्ट सादर केली जाते. या गोष्टी प्रामुख्याने रामायण, महाभारतासारख्या महाकाव्यांमधून घेतलेल्या असतात. आज कथकली फक्त रामायण आणि महाभारत यांच्यापुरतीच मर्यादित न राहता ख्रिस्ती धर्मातील काही गोष्टीही यातून दाखवण्यात येतात.
एकूण ३ हजार लोकसंख्येपैकी सुमारे ७०% लोक कोणत्याही पद्धतीने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या कलेमध्ये सामील असतात. त्यांच्यापैकी अनेक जण अशीच कला शिकण्यासाठी उत्सुक असतात. या गावामध्ये कथकलीचं अक्षरशः वेड असल्याचं मानलं जातं. या वेडापायीच राज यांनी १९८७ साली कथकली ॲप्रिसिएशन फोरम सुरु केले, पुढे याच रोपट्याचे रूपांतर १९९५ साली जिल्हा कथकली क्लबमध्ये झाले.
आज या जिल्हा कथकली क्लबमध्ये सुमारे ४०० मेम्बर्स असून त्यातील अनेक जण ख्रिस्ती असून त्यांचाही हा क्लब चालवण्यात मोठा वाटा आहे. राज यांची पत्नी श्रीजा गेल्या २८ वर्षे सरकारमध्ये काम करताहेत. अगदी लहानपणापासूनच त्या या गावातील कलेकडे आत्कृष्ट झाल्या आहेत. त्यांच्या घरात या कलेची परंपरा पिढ्यान्-पिढ्या चालत आली आहे. त्यांच्या वडिलांनी कित्येकदा गावांतील मंडळींना कथकली सादर करण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे.
राज यांच्याशी लग्न झाल्यानंतर मात्र दोघांचाही आवडीचा विषय असल्याने त्यांनी एकमेकांना मदत करून कथकली क्लबमध्ये काम सुरु केले. या क्लबद्वारे दर महिन्याला “साहित्यिक प्रशंसा वर्ग” देखील घेतला जातो. या वर्गामध्ये विविध क्लासिक्स आणि नाट्ये इत्यादींवर चर्चा होते, तसेच क्लासिक्स आणि नाट्ये कथाकथनाच्या मदतीने कथाकलीशी कशी जोडली जाऊ शकतात यावर चर्चा होते. या वर्गासाठी जवळच्या महाविद्यालयांमधून प्राध्यापकांनाही पाचारण केले जाते.
अयरुर हे गाव सुप्रसिद्ध शबरीमाला मंदिरापासून फक्त ६० किलोमीटर अंतरावरच आहे. एका दंतकथेनुसार, गावाचे नाव अय्या (आज ज्या देवतेला अय्यप्पा नावाने ओळखले जाते) आणि उर (म्हणजेच जागा) या शब्दांपासून बनले आहे. या गावाला कथाकलीचा मोठा आणि दैदिप्यमान इतिहास आहे. याच गावात थेक्कन चित्ताचे (एक दक्षिण भारतीय विचारधारा) पालन करणाऱ्या गुरु चेंगन्नुर रामन पिल्लई यांचे अनेक शिष्य कपिलांगदन पद्धतीची कला सादर करीत असत.
दर वर्षी गावामध्ये १५ दिवसांचा “कथकली उत्सव” आयोजित केला जातो. हा उत्सव पाम्बन नदीच्या किनारी सुमारे दहा ते पंधरा हजार जणांच्या उपस्थितीत साजरा होतो. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थी या गावात उपस्थित असतात.
अयरुर कथकली ग्राम हे नाव मिळाल्याने गावाचे नाव जगाच्या नकाशावर यायला वेळ लागणार नाही असे मत स्थानिक पंचायत समितीच्या अध्यक्षा आंबिली प्रभाकरन यांनी मांडले आहे. तसेच हे गाव केरळच्या पर्यटन मंत्रालयाने सुरु केलेल्या ग्रेट डेस्टिनेशन चॅलेन्जचा भाग असेल असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाअंतर्गत कथकली संग्रहालय तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. हे संग्रहालय कथकली क्लबने दान दिलेल्या जागेवर तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. याशिवाय कथकलीसाठी ‘थेक्कन कलामंडलम’ नावाने एक स्वतंत्र संस्था गावात असावी असा बऱ्याच जणांचा मानस आहे.
लोककलेच्या वाढत्या आकर्षणामुळे अयरुर या गावाला भारताच्या नकाशावर मानाचे स्थान प्राप्त होईल. जवळच असलेल्या आरणमुळा गावाप्रमाणेच या गावालाही पर्यटनाच्या पॅकेजेसमध्ये स्थान मिळेल असे वाटते. आरणमुळा गाव धातूचे आरसे आणि बोट रेसिंगसाठी प्रसिद्ध आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.