आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मैदानी खेळांमध्ये हॉकी हा एक रोमांचक खेळ आहे. हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून स्फूर्तीदायक, रोमांचक आणि उत्साह वाढविणारा खेळ म्हणून हॉकी प्रसिद्ध आहे. हॉकी या खेळात दोन संघ असतात, ज्यात प्रत्येकी ११-११ खेळाडूंचा समावेश असतो.
याच खेळावर आधारीत एक हिंदी सिनेमा २००७ साली येऊन गेला. त्याचे नाव होते ‘चक दे! इंडिया’. या सिनेमामध्ये विमेन्स हॉकी टीमच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणारे कबीर खान हे कॅरेक्टर शाहरुख खान याने रंगवले होते. पाकिस्तानविरुद्धच्या एका सामन्यात मॅच फिक्सिंगचा आरोप ठेवत त्याच्यावर सामने खेळण्यासाठी आजन्म बंदी घालण्यात येते, पण पुढे तो महिला हॉकी संघाचा प्रशिक्षक होतो आणि भारताला सामना जिंकून देत आपल्यावरचा कलंक पुसून काढण्याचा प्रयत्न करतो.
ही व्यक्तिरेखा प्रत्यक्षातल्या एका व्यक्तीवर आधारलेली आहे. मीर रंजन नेगी असे त्यांचे नाव. आज त्यांचीच गोष्ट जाणून घेऊया.
एक काळ असा होता जेव्हा मीर रंजन नेगी यांना लोकांचे टोमणे ऐकून ऐकून प्रचंड मनस्ताप होत असे. अर्थात लोकांच्या मते त्यांचा गुन्हाही तितकाच गंभीर होता.
भारतीय हॉकी संघात गोलकीपर असलेल्या मीर रंजन नेगी यांच्यामुळेच १९८२ च्या आशियाई गेम्स दरम्यान दिल्ली येथे झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला भारतावर १-७ असा विजय मिळवता आला होता, असा त्यांच्यावर आरोप केला जात होता. त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर दगाबाजी आणि विश्वासघात केल्याचा आरोप ठेवला होता.
त्यानंतर ते जेथे जातील तेथे त्यांना लोकांचे वाकडेतिकडे टोमणे आणि जळजळीत नजरा यांचा सामना करावा लागत होता. तो काळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होता. कित्येक महिने अंध:कारमय, निराशेने भरलेले होते. १९८२ मधला तो बुधवार हा तर त्यांच्या आयुष्यातील सर्वांत काळाकुट्ट दिवस होता. त्या दिवशी झालेला पराभव आणि त्यानंतर लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांमुळे त्यांना असह्य यातना झाल्या होत्या.
पाकिस्तान बरोबर झालेल्या सामन्यात दणदणीत पराभव झाल्यानंतर संघातील इतर खेळाडू हळूहळू सावरले आणि त्यांनी परत एकदा मॅचेसमध्ये सहभागी होत आपली कारकीर्द पुढे सुरू ठेवली. मात्र नेगी यांना यामध्ये खलनायक ठरवण्यात आले हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत निराशाजनक ठरला.
‘चक दे इंडिया’ या सिनेमातही नेगी यांचीच गोष्ट सांगितलेली आहे, ज्यांच्यावर पाकिस्तान्यांना सामना जिंकून देण्यासाठी लाच घेतल्याचा, म्हणजेच मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यानंतर त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली होती. यापुढे भारतासाठी हॉकी सामन्यात खेळण्याचा त्यांचा अधिकार यामुळे काढून घेतला गेला.
पण त्या दिवशी नक्की काय बिनसले होते?
संघाचा कप्तान असलेल्या जफर इक्बाल यांच्या मते, “त्यादिवशी प्रत्येकच गोष्ट बिनसत होती. टीममधल्या प्रत्येकाने चुका केल्या होत्या. अगदी डिफेन्समधल्या खेळाडूंनीसुद्धा अनेक मोठ्या गॅप्स सोडल्या होत्या, ज्यांचा पाकिस्तानी खेळाडूंनी बरोबर फायदा उठवला होता. या फटी झाकण्यासाठी खूप प्रयत्न करून देखील नेगी यांना अपयशच आले आणि त्यांच्या माथ्यावर खापर फुटले. पण खरे म्हणजे टीममधील प्रत्येक खेळाडूकडे याचा दोष जात होता.”
मोहम्मद शाहिद हा स्टार फॉरवर्ड म्हणतो, “खरेतर संघावर काही मान्यवरांच्या उपस्थितीचे दडपण होते आणि त्यालाच संघ बळी पडला. त्या सामन्याला इंदिरा गांधी, राजीव गांधी, ग्यानी झैलसिंग असे भलेभले लोक उपस्थित होते. सामना हरल्यानंतर लगेचच प्रेक्षकांमध्ये कुजबुज सुरू झाली, की नेगीने मॅच फिक्स केलेली आहे. हे खूप विचित्र होते, चीड आणणारे होते; पण तरीही आरोप होत राहिले. एकाने असाही दावा केला, की त्याने नेगीला मॅचच्या दिवशी संध्याकाळ पाकिस्तानी उच्च आयुक्तांच्या कार्यालयातून बाहेर पडताना पाहिले होते. एकाने तर नेगी याच्या नावात मीर असल्याने तो मुस्लिम असल्याची आणि त्यामुळे त्याची पाकिस्तानला सहानुभूती असल्याचीही शंका व्यक्त केली होती.”
उद्ध्वस्त झालेल्या नेगी यांना भारतीय हॉकी महासंघाचाही पाठिंबा मिळाला नाही, संघानेही त्यांच्यावर बहिष्कार घातला. त्या काळात ब्लिट्झ या नियतकालिकात एक अहवाल छापून आला होता, ज्यामध्ये त्याने सामना गमावण्यासाठी ७ लाख रुपये घेतल्याचा दावा केला होता.
मीर रंजन नेगी यांनी त्यानंतर अनेक महिने स्वतःला खेळांपासून, प्रसिद्धीपासून दूर ठेवले. शेवटी, त्यांच्या मित्रांनी त्यांना परतण्यासाठी राजी केले आणि पुढच्या काही वर्षांमध्ये, त्यांनी खेळात नेहमीपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवली.
स्वतःचे वेगळेपण दाखवत त्याने मुंबई हॉकीचे वेगळेपण सिद्ध करून दाखवले. मात्र ते भारतासाठी कधीच खेळले नाहीत. पण, चांगल्या माणसाला कधी ना कधी वर यायची संधी मिळते, तसे प्रशिक्षक म्हणून यश मिळवून शेवटी नेगी यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलेच.
१९८८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळी ते गोलकीपर प्रशिक्षक म्हणून परतले. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले. पण ही नियुक्ती केवळ तात्पुरती होती, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा खेळ सोडावा लागला.
चार वर्षांनंतर, नेगी यांना भारतीय महिला हॉकी संघाचे गोलकीपर प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. २००२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत या संघाने सुवर्णपदकाची कमाई केली. २००४ मध्ये ते महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षकही होते. सध्या ते इंदोरच्या एक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्चमध्ये क्रीडा संचालक म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमधून जग उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना, मीर रंजन नेगी यांनी स्वतःला एका वेगळ्या दुनियेत रममाण करून घेतले. त्यांच्या आवाजाची मोहिनी इंदोरमधील श्रोत्यांच्या कानावर पडली. त्यांनी श्रोत्यांसाठी ४५ दिवस पाच मिनिटांची ऑडिओ कथानके आयोजित केली, ज्यात ते हॉकीच्या धड्यांपासून ते जीवन कौशल्यापर्यंत विविध विषयांवर कथा सांगत. या कथांनी त्यांना नव्याने ओळख मिळवून दिली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.