आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
दिवसाढवळ्या स्वच्छ सूर्यप्रकाशात देखील तिला घरातून बाहेर भीती वाटायची, त्याच नर्तकी नटराजन यांना २०१९ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी आहेत.
वस्तुतः नर्तकींना बालपणी ‘नटराज’ म्हणून ओळखले जायचे. पण, नटराजला मात्र ही ओळख अजिबात मान्य नव्हती.
तो चारचौघांत अजिबात मिसळत नसे कारण, आपल्या वागण्या-बोलण्याची टिंगल केली जाईल अशी भीती सतत त्याच्या मनात असायची. म्हणूनच संपूर्ण मदुराई शहर रात्रीत विश्रांती घेत असताना, नटराज आपला मित्र शक्तीसोबत घरातून बाहेर पडे आणि शहरापासून दूरवर जाऊन चित्रपटातील गाण्यावर नृत्य करत राही.
घरातून बाहेर पडल्यापासून ते एक नामवंत नर्तकी होण्यापर्यंतच्या त्याच्या या प्रवासात शक्तीने तिला पूर्ण साथ दिली. अगदी जीवनाच्या सर्व प्रसंगात ती खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहील म्हणूनच आज ती हे यश साध्य करू शकली.
“माझे बालपण हे सर्वसामान्य मुलांप्रमाणे मुळीच नव्हते. मला सतत नाकारले जाई, मी मुलींसारखे वागणे, बोलणे, याची माझ्या घरच्यांना लाज वाटत असे. म्हणून ते सतत मला मुलं कशी बोलतात, चालतात, तसे वागण्याची सक्ती करत. पण, त्यांची ही सक्ती मला अजिबात आवडत नसे. कारण, मी वरून मुलाप्रमाणे दिसत असलो तरी, माझ्यात एक मुलगी होती.
मुलीप्रमाणे राहू नको, असे म्हणणे म्हणजे माझ्यासाठी, डोळे असून पाहू नको, असे म्हणण्यासारखे होते. जे मला कधीच शक्य नव्हते. म्हणून माझ्या घरच्यांनी मला सरळ सरळ घरातून बाहेर काढले. तेव्हा मी फक्त अकरा वर्षांची होते” डॉ. नर्तकी सांगत होत्या. नर्तकीच्या संघार्षामयी जीवनाची सुरुवात इथूनच झाली. सगळ जग विरोधात असतानाही दोन गोष्टींनी त्यांची साथ कधीच सोडली नाही, पहिली मैत्रीण शक्ती आणि दुसरी त्यांची कला.
“नृत्य म्हणजे आपल्या आत्म्याशी संवाद साधण्याची एक अद्भुत कला आहे असे मला वाटते,” असे नर्तकी म्हणतात.
ही कला त्यांच्यासाठी फक्त एक प्रसिद्धी आणि यश मिळवण्याचे साधन नाही तर, शरीराच्या माध्यमातून परमात्म्याशी संवाद साधण्याचे एक माध्यम म्हणून त्या नृत्याकडे पाहतात. म्हणूनच त्यांना तामिळनाडू राज्याने तिला थीरुनांगाई (म्हणजे स्त्री-देवता) म्हणून सन्मानित केले.
“घरातून बाहेर काढल्यावर दोन वेळचे पोट भरणे देखील माझ्यासाठी फारच मुश्कील काम होते. कितीतरी छोटी-मोठी कामे करून मी कसेबसे माझे पोट भरत असे, हालआपेष्टा सहन करत मी, कसेबसे माझे शिक्षण पूर्ण केले. या सगळ्या संघर्षात देखील नृत्याबद्दल असलेली अतीव ओढ कधीच संपली नाही,”नर्तकी आपल्या संघर्षाची कहाणी सांगत होत्या. वयाच्या १५ व्या वर्षी त्या आपल्या गुरूच्या शोधात होत्या, जे तिला भरतनाट्यमचे शास्त्रीय ज्ञान देऊ शकतील. तेव्हा काही स्थानिक मंडळासोबत ती देवळात आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमात, नृत्याचे कार्यक्रम करत असे.
याचवेळी तिला किट्टाप्पा पिलाई यांच्याबद्दल कळाले. जे प्रसिद्ध तंजोर गटाचे शिष्य होते. ज्याला तंजोर चोकडीदेखील म्हटले जाते – चीन्नय्या, पोन्नय्या, शिवानंदम आणि वादिवेळू या चार भावांना भरतनाट्यमचे जनक म्हणून ओळखले जाते.
“किट्टाप्पा पिलाई यांना यावेळी नुकताच इसाई पेरारीग्णार पुरस्कार मिळाला होता आणि त्यांच्याबद्दल बऱ्याच मासिकातून आणि वृत्तपत्रातून लेख छापून येत होते. ते तंजावर आहेत, अशी माहिती मिळताच मी त्यांची भेट घायला कशीबशी तंजावरला पोचले. पण, त्यांचे शिष्यत्व पत्करणे ही तितकी सोपी गोष्ट नक्कीच नव्हती,” हे सांगताना, नर्तकी जुन्या आठवणीत रंगून जातात. इतक्या लहान वयात या मुलीला नृत्याबद्दल असणारी आस्था, ओढ आणि त्यातील गती पाहून पिलाई यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तिला बेंगळूरू येथील वैजयंतीमालाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले.
त्यानंतर त्यांनी वर्षभर दक्षिण भारतातील अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना तिला बोलावले. अर्थात त्या-त्या ठिकाणी जाण्याच्या, प्रवासाचा खर्च खूप होत होता. इतका सगळ्या खर्चाची तजवीज करताना तिला नाकीनऊ येत, पण, तिने हार मानली नाही.
“नंतर गुरुजी स्वतःहून मला म्हणाले, उद्यापासून आपण तुझी शिकवणी सुरु करू म्हणून. गुरुजींच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर तर माझा आनंद गगनात मावत नव्हता. याच दिवशी मी मदुराईहून चेन्नईला गेले. जाताना काही फळं आणि फुल गुरुदक्षिणा म्हणून नेली. तिथून पुढे माझे नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण सुरु झाले,” या आठवणींना उजाळा आजही त्यांच्या चेहऱ्यावर तितकाच आनंद ओसंडून वाहताना दिसतो.
आपल्या नृत्यातून विविध पात्रे आणि त्यांच्या अंतर्मनातील भावनांचा हिंदोळा आपल्या अभिनयातून व्यक्त करणे हेच नर्तकीच्या नृत्याचे खरे सौंदर्य आहे.
त्यांना वाटते, नृत्य हे स्त्रीला उन्नती मिळवण्यासाठी आवश्यक असणारे एक मध्यम आहे आणि नृत्याचे सर्व भावाविष्कार साकार करण्यासाठी बाईपण हेच एक चांगलं माध्यम आहे.
जेंव्हा मी वेगवेगळ्या नायिकांसोबतच भगवान शिवासारख्या पुरुष देवतांचाही अभिनय करते आणि त्यांचे भाव व्यक्त करते, तेंव्हा मला मी खरी स्वतंत्र आहे असे वाटते, असं ती म्हणते.
तिच्यामते, लिंग समतेचा पुरस्काराचे तत्वज्ञान मांडणारा शिवा हे आपल्या संस्कृतीतील प्रमुख दैवत आहे. स्त्रीवादाचा विषय निघतो तेंव्हा शिवाचे विस्मरण होणे शक्यच नाही. त्याच्यासारखा सच्चा स्त्रीवादी माझ्यामते तरी दुसरा कुणीही नाही. त्याचे अर्धनारीनटेश्वर हे रूप म्हणजे स्त्रीवादाचेच जिवंत रूपक आहे. “आपल्या भावना, विचार आणि कृती यातील एकरूपता म्हणजेच खरी स्त्रीशक्तीची उन्नती आहे, असे तिचे मत आहे. आपण जे आहोत आणि जसे आहोत तसे व्यक्त होणे, हाच तिच्या स्त्रीवादाचा गाभा आहे. मला स्वतःबद्दल किती ज्ञान आहे, ते मी किती ठामपणे मांडू शकते आणि माझ्या अभिव्यक्तीशी मी किती प्रामाणिक राहू शकते, हा माझ्या दृष्टीने स्त्री मुक्तीचा खरा विचार आहे,” असे ती म्हणते.
आपल्या कर्तृत्वातून आणि विचारांच्या अभिव्यक्तीद्वारे तिने तमिळनाडूतीलच नाही तर, देशभरातील तृतीयपंथी व्यक्तींसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
“सन्माननीय आणि लोकप्रिय कलाकार म्हणून आमचे नाव व्हावे या दृढ निश्चयानेच आज आम्ही जिथे आहोत, त्या यशाच्या शिखरावर पोचवले. आमच्यासारखे तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेले लोक सामान्यत: पारंपारिक व्यवसाय करणेच पसंत करतात. पण, वारंवार नकार मिळूनही आमच्यातील लज्जाभावनेने कधीच आमच्या निश्चयावर मात केली नाही,” असे डॉ. नर्तकी म्हणतात.
त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत, भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले. “हा पुरस्कार म्हणजे माझ्या कलेचा आणि कलेप्रती असलेल्या माझ्या निष्ठेचा खरा सन्मान आहे,” असे त्या म्हणतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.