आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
भारत आणि पाकिस्तान १९४७ साली एकमेकांपासून भौगोलिक दृष्ट्या वेगळे झालेले असले तरी त्या देशांची संस्कृती नेहमी एकच राहिली आहे, त्यांचा ऐतिहासिक वारसा हा एकच राहिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान जरी सीमा प्रश्न आणि इतर भौगोलिक समस्यांवर वाद असले तरी दोन्ही देशात होणारी सांस्कृतिक देवाणघेवाण खूप मोठी आहे. भारतात येऊन अनेक पाकिस्तानी अभिनेते-अभिनेत्री यांनी यश कमावलं आहे तर पाकिस्तानात बॉलिवूड चित्रपटांचे क्रेझ मोठी आहे. हीच गोष्ट गायक, क्रिकेटपटू यांच्यासोबत आजच्या युट्युबर्सच्या बाबतीत ही घडली आहे.
पण बऱ्याचदा सांस्कृतिक देवाणघेवाणीवर दोन्ही देशांमधल्या राजकीय आणि सामजिक स्थितीचा प्रभाव पडतो. ज्यामुळे यातून वितुष्ट अजून खोलावत जात असतं.
यातूनच मग भारत पाकिस्तानचे क्रिकेट सामने दोन्ही देशात न होणे, दोन्ही देशांच्या संघांनी एकमेकांवर बहिष्कार घालणे, भारतातून पाकिस्तानी कलाकारांना प्रवेश नाकारणे आणि त्यांची हकालपट्टी करणे तर पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी घातली जाणे ह्या गोष्टी फार सामान्य आहेत.
ह्यामुळे दोन्ही देशातील जनतेच्या मनात एकमेकांविषयी द्वेष भावना निर्माण होण्याऐवजी दुसरं असं काही विशेष घडत नाही. पण कालांतराने जेव्हा वातावरण शांत होऊ लागतं तेव्हा मात्र ही सांस्कृतिक देवाणघेवाण पुन्हा सुरु होते आणि ही देवाणघेवाण अनेक वर्ष सुरु असते, जोपर्यंत नवा वाद येत नाही. पण जेव्हा हा वाद चालू असतो तेव्हा ही देवाणघेवाण बंद असते.
अशावेळी मात्र दोन्ही बाजूच्या मनोरंजन क्षेत्राला झळ पोहचते, भारतात त्या झळीची तीव्रता इतकी नसली तरी पाकिस्तानात मात्र त्याची तीव्रता खूप जास्त असते असे दर्शवणारा आणि सिद्ध करणारा एक लेख द प्रिंट ह्या ई-नियतकालिकेत नीला इनायत ह्या एका पाकिस्तानी पत्रकाराने लिहिला आहे, ह्यात भारतीय सिनेमावर असलेली बंदी उठवण्याची मागणी पाकिस्तानात जोर धरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
इतकंच नाही तर पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी नेटफ्लिक्स आणि अमेझॉन ह्या दोन ऑनलाईन स्ट्रीमिंग सेक्टरमधील कंपन्यांकडे मागणी केली आहे की त्यांनी पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीत गुंतवणूक करून नवीन मालिका, चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात सर्वात पहिला बळी हा चित्रपटांचा जात असतो. मागच्या वर्षी पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानात वातावरण ढवळून निघालं होतं. पाकिस्तानने भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी घातली. ह्यामुळे सर्वात जास्त परिणाम झाला तो पाकिस्तानच्या चित्रपट व्यावसायिकांच्या उत्पन्नावर!
पाकिस्तानातील १५० सिनेमागृहात २०१९ साली फक्त २२ उर्दू चित्रपट रिलीज करण्यात आले आहेत. यातून फक्त १५० कोटी इतकंच उत्पन्न मिळवणं शक्य झालं आहे. अनेक मल्टीप्लेक्समध्ये एकच चित्रपट दाखवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. महिरा खान ह्या अभिनेत्रीचा सुपरस्टार, मीरा यांचा बाजी आणि मिकाल झुल्फिकार यांचा शेरदिल हे तीन चित्रपट पाकिस्तानात प्रसिद्ध झाले. ह्या तिन्ही चित्रपटांना जरी पाकिस्तानच्या बॉक्स ऑफिसवर यश मिळाले असले तरी ते जास्त काळ सिनेमागृहात टिकले नाहीत. काही कालावधीतच हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरून हद्दपार झाले आहेत, यामुळे मोठं नुकसान चित्रपटगृह चालक आणि मालकांचे होत आहे. ह्या चित्रपटगृहात अनेक प्रकारचे डिस्काउंट देऊन देखील ग्राहकांचा ओढा त्याकडे वळत नाही, म्हणून चित्रपगृहाचे मालक चिंताग्रस्त आहेत.
यात पाकिस्तानी चित्रपटाची गुणवत्ता ही अत्यंत खराब असून भारतीय चित्रपटांच्या तुलनेत ती अत्यंत दर्जाहीन असल्याने पाकिस्तानी प्रेक्षक ह्या चित्रपटांकडे पाठ फिरवतात. भारतीय चित्रपटांच्या अनेक पायरेटेड डीव्हीडी पाकिस्तानच्या बाजारात सर्रास उपलब्ध होत असून ह्यामुळे लोक या माध्यमातून मनोरंजन मिळवतात परिणामी चित्रपटगृहांच्या मालकांच्या व्यवसायावर अजून गंभीर परिणाम होत आहेत. आज पाकिस्तानातील चित्रपटगृह मालकांच्या मनात सरकार विरोधात अजून असंतोष वाढीस लागला आहे.
पाकिस्तानी शासनाने याची गंभीर दखल न घेता, देशभक्ती ही पोटापाण्याच्या वर असल्याचा सल्ला त्या लोकांना दिला आहे यामुळे त्या लोकांच्या संतापात अजून वाढ झाली आहे.
काफ कंगना नामक पाकिस्तानी लष्कराने प्रदर्शित केलेला एक देशभक्तीपर चित्रपट देखील पाकिस्तानातील जनतेने नाकारला गेला आणि त्याबरोबरच भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात प्रदर्शित करण्याची मागणी अजून जोर धरू लागली आहे. चित्रपट वितरकांच्या मते जर भारतीय चित्रपटांना परवानगी नाकरण्यात आली असेल तर पुढे जाऊन सरकारला चित्रपटगृहासाठी अनुदान द्यावे लागणार आहे. पाकिस्तानी चित्रपटगृह चालकांच्या आणि मालकांच्या डोक्यावर आर्थिक बोजा निर्माण झाला आहे. पाकिस्तान सरकारला देखील आर्थिक झळ यामुळे पोहचत आहे.
पाकिस्तानमध्ये चित्रपट निर्मिती करावी अशी मागणी पाकिस्तानचे फवाद चौधरी यांनी नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम यांना जरी चित्रपट निर्मितीचे आमंत्रण दिले असले तरी तितकासा अनुकूल प्रतिसाद मिळत नाही आहे. अक्षरश: ओस पडणाऱ्या चित्रपटगृहांना बघून आणि पायरसीच्या अभिशापाला बघता, ह्या दोन्ही कंपन्या अनुकूल नाही आहेत. यामुळे हा पेच अजूनच वाढला आहे. पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी येण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे.
१९६५ च्या युद्धानंतर अय्युब खान यांनी भारतीय चित्रपटांवर बंदी घातली होती जी २००७ साली उठवण्यात आली, ह्या दरम्यानच्या काळात पाकिस्तानच्या चित्रपट उद्योगाची संपूर्णपणे वाताहत झाली आहे. २०१६ साली पाकिस्तानच्या चित्रपटगृह मालकांनी मृत पाकिस्तानी सैनिकांच्या सन्मानार्थ भारतीय चित्रपटांवर तीन महिने बंदी घातली होती.
एवढं असूनही पाकिस्तानमधील ही बंदी उठवली जाण्याची कुठलीही सुतराम शक्यता नाही. भारताने काश्मीरच्या ३७० कलमाला हटवल्यानंतर तिथे वातावरण चिघळून इमरान खान यांनी पाकिस्तानच्या बाजूने भारताशी असलेले सर्व व्यवहार तोडले आहेत. आज पाकिस्तानकडे भारताच्या समझौता एक्स्प्रेसचे अनेक डबे असून ते परत करण्यास पाकिस्तानने साफ इन्कार केला आहे.
भारत पाकिस्तान यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण ही गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत असल्याने पाकिस्तानचा चित्रपट व्यवसायाला ग्रहण लागलं आहे आणि हे ग्रहण कधी दूर होतं याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.