आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
स्थळ ट्रेंटब्रिज, नॉटिंगहॅम. भारत-इंग्लंड दरम्यानची दुसरी कसोटी. इयान बेल वादग्रस्तरित्या रनआऊट होऊन ड्रेसिंगरुममध्ये परतलेला. त्यानंतर चहापाणासाठी खेळ थांबवलेला. भारतीय ड्रेसिंग रूममध्ये मसाला चाय आणि समोस्यांसह चर्चा सुरू आहे. सुरेश रैना, उजवीकडं इशांत शर्मा आणि डावीकडं राहुल द्रविड व डंकन फ्लेचर अशी गँग घेऊन महेंद्रसिंग धोनी मध्यभागी बसलेला. सचिन तेंडुलकर सहजपणे आपल्या खिडकीतून बाहेर बघत आहे. ड्रेसिंग रूमच्या एका कोपऱ्यात स्वतःशीच बडबडत उभा असलेला हरभजन सिंग अन् सर्वांच्या तोंडी एकच चर्चा इयान बेलसारखा कसलेला खेळाडू असा कसा आऊट झाला!
२०११ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. पाहुण्यांनी लॉर्ड्सवरील पहिला कसोटी सामना १९६ धावांनी गमावला होता. त्यानंतर दुसरा सामना नॉटिंगहॅम ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवण्यात आला. हा सामना इयान बेलच्या रनआऊट होण्यामुळं प्रचंड गाजला. जागतिक पातळीवर त्याची कितीतरी दिवस चर्चा रंगली होती.
दुसऱ्या सामन्यात भारताचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केलं. प्रवीण कुमार, इशांत शर्मा आणि श्रीसंत या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटानं प्रत्येकी तीन-तीन विकेट घेऊन इंग्लंडचा संघ स्वस्तात घरी पाठवला. पहिल्या डावात ६८.४ षटकांच्या बदल्यात इंग्लंडला २२१ धावा करता आल्या. त्यानंतर ‘द वॉल’ राहुल द्रविडच्या ३४ व्या कसोटी शतकाच्या बळावर भारतानं प्रत्युत्तरात सर्वबाद २८८ धावा केल्या.
आणि मग कसोटीचा तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा जोनाथन ट्रॉट दुखापतग्रस्त असल्यानं बेलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं. मालिकेत तोपर्यंत ४५, ० आणि ३१ अशी धावसंख्या नोंदवल्यानंतर बेलनं तिसऱ्या कसोटी शतकी खेळी करून भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.
तिसऱ्या दिवसाचा टी ब्रेक होण्याअगोदर इशांत शर्माच्या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक होता. त्यानं बॉल फेकल्यानंतर स्ट्राईकवर असलेल्या इऑन मॉर्गननं लेग साईडला टक केला. याच दरम्यान अंपायरनं इशांतला त्याचं स्वेटर परत दिलं. तोपर्यंत फाइन लेगपासून स्क्वेअरकडे पळत जाऊन प्रवीण कुमारनं बॉल बाऊंड्रीच्या बाहेर जाण्यापासून रोखला. मात्र, बेल आणि मॉर्गनचं बॉलकडं लक्षच नव्हतं. त्यांनी याची देखील खात्री केली नाही, अंपायरनं ‘फोर’साठी हात फिरवला की नाही. बॉल बाऊंड्रीपार गेल्याचा दोघांचाही ग्रह झाला आणि चहापाणासाठी त्यांनी ड्रेसिंगरुमचा रस्ता धरला. तेवढ्यात कुमारनं धोनीकडं बॉल फेकला धोनीनं तो तत्काळ अभिनव मुकुंदच्या हातात दिला अन् मुकुंदनं बेल्स उडवल्या.
भारतीय संघानं विकेटसाठी अंपायरकडं अपील केलं. त्यानंतर रिप्लेमध्ये असं दिसून आलं की, बॉलनं बाऊंड्री पार केली नव्हती. त्यामुळं भारतीय संघाचं अपील नियमात होतं. परिणामी १३७ धावांवर असलेल्या इयान बेलला बाद घोषित करण्यात आलं.
जेव्हा इयान बेलला आऊट घोषित करण्यात आलं तेव्हा तो नक्कीच खूश नव्हता. पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना त्याच्या बॉडी लँग्वेजवरून हे स्पष्ट दिसतं होतं. मैदानावर जवळपास १० ते १५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता. मात्र, खरी नाट्यमय परिस्थिती तर पुढे घडणार होती. टी ब्रेक दरम्यान अशी अटकळ लावण्यात आली की धोनी आपलं अपील मागे घेईल आणि बेलला परत बोलावेल.
मात्र, एक कर्णधार चांगला सेट होऊन आऊट झालेल्या फलंदाजाला परत बोलवून स्वत:च्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल हा देखील प्रश्न होता. क्रिकेटमधील कायदा क्रमांक २७ च्या कलम ८ नुसार, क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाचा कर्णधार अपील मागे घेऊ शकतो. यासाठी त्याला पंचाची संमती घेणं आवश्यक असतं. ते ही फलंदाजानं मैदान सोडण्यापूर्वी हा नियम लागू होतो. जर फलंदाजानं मैदान सोडलं तर कुणीही काहीही करू शकत नाही. या प्रकरणात बेलनं मैदान सोडलं होतं कारण, चहाची वेळ झाली होती. त्यामुळं त्याला परत येण्याची संधी होती.
तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर इयान बेल आउट होता याबद्दल तीळमात्रही शंका नव्हती. बॉल डेड झालेला नसताना नियमानुसार फलंदाजाला क्रिज सोडून मैदानात इतरत्र फिरता येत नाही. फक्त एकच गोष्ट चहापाणानंतर बेलला मैदानात परत आणू शकत होती अन् ती म्हणजे ‘स्पिरिट ऑफ द गेम’.
तिकडे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये एक दुर्मिळ दृश्य पहायला मिळालं. कधीही कुणासमोर हात न पसरणारे इंग्रज चक्क भारतीय ड्रेसिंग रूममध्ये चर्चा करण्यासाठी दाखल झाले होते. इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी भारतीय संघाची भेट घेतली. त्यानंतर धोनी आणि संपूर्ण टीमनं खेळ भावना जिवंत रहावी यासाठी अपील मागे घेण्याचा निर्णय घेतला.
टी ब्रेक संपल्यानंतर जेव्हा भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममधून बाहेर पडले तेव्हा संतप्त इंग्लिश चाहत्यांनी त्यांच्या नावानं अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या निर्णयापासून ते अनभिज्ञ होते. मात्र, जेव्हा मॉर्गनसोबत इयान बेलनं पुन्हा मैदानात पाय ठेवला तेव्हा इंग्लिश चाहते तोंडावर आपटले. जेव्हा कंमेन्टेटर्सनी धोनी आणि भारतीय संघाचा निर्णय जाहिरपणे ऐकवला तेव्हा अपशब्दांचं रुपांतर टाळ्यांमध्ये झालं. अगदी इंग्लंडच्या संघानं देखील बाल्कनीत उभं राहून भारतीय संघासाठी टाळ्या वाजवल्या.
बहुतेक माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाचं कौतुक केलं. या सर्व सावळ्या गोंधळानंतर पुन्हा मैदानात आलेल्या बेलनं आणखी २८ धावा केल्या आणि १५९ धावांवर बाद झाला. इंग्लंडचा दुसरा डाव ५४४ धावांवर आटोपला. ४७८ धावांचा पाठलाग करताना मात्र, भारताची दमछाक झाली आणि सर्व संघ १५८ धावांवर गुंडाळला गेला. यजमानांनी दुसरा कसोटी सामना ३१९ धावांनी जिंकला.
क्रिकेटच्या मैदानात अनेकदा असे प्रसंग येतात की तेव्हा खेळ भावनेचा कस लागतो. इयान बेलचं रनआऊट होणं हा असचा एक प्रसंग होता. मात्र, भारतीय संघानं खेळ भावनेला जागृत ठेवून त्याला पुन्हा मैदानात बोलवलं. याबद्दल गेल्या वर्षी(२०२०) भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला दशकाचा ‘आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट’ पुरस्कार देण्यात आला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.