आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे स्वातंत्र्य चळवळीत आणि भारताच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान आहे. नेहरुंप्रती सामन्यातील सामान्य माणसालाही अतीव आदर होता. नेहरुनंतर जनसामान्यांचे असे भरभरून प्रेम दुसऱ्या कुठल्याच पंतप्रधानाला लाभले नाही. म्हणूनच आधुनिक भारताचे शिल्पकार मानले गेलेले नेहरूंचे जेंव्हा निधन झाले तेंव्हा संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता.
नेहरूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली एक विलक्षण छबी उमटवली होती. देशविदेशातील त्यांचे मित्र, आणि मान्यवर नेतेही नेहरुंना अखेरचा साश्रुपूर्ण निरोप देण्यासाठी जमले होते.
आपल्या लाडक्या चाचा नेहरुंचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी दिल्लीत माणसांची झुंबड उडाली होती. मोठ्या प्रमाणावर जमलेल्या या समूहाला आवरता आवरता पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.
२७ मे १९६४ रोजी भारताच्या पहिले पंतप्रधान जवाहरलाला नेहरू यांचे निधन झाले. २९ मे रोजी जेंव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली तेंव्हा दिल्लीच्या रस्त्यावर जिकडे अंत्ययात्रा वळेल तिकडे माणसांची गर्दीच गर्दी दिसत होती.
२९ मे रोजी दिल्लीत नेहरूंच्या अंत्यदर्शनासाठी १५ लाखांचा जमाव जमला होता. ज्या रस्त्यावरून नेहरूंची अंत्ययात्रा जाणार होती त्या संपूर्ण रस्त्याच्या सुरक्षेची जबाबदार लष्करातील तिन्ही सैन्यावर सोपवण्यात आली होती. यमुना नदीच्या किनाऱ्यावरील राजघाटपर्यंत तिन्ही सैन्य दलांनी अगदी काटेकोर सुरक्षा ठेवली होती.
१९६४ सालच्या जानेवारी महिन्यात नेहरुंना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांती घेण्याची सूचना दिली होती. पण, नेहरू आपल्या कामात व्यस्त राहिले. ७४ वर्षांच्या नेहरुंना २७ मे रोजी पुन्हा अटॅक आला आणि यातच त्यांचे निधन झाले.
गन कॅरेज गाडीतून त्यांची ही अंत्ययात्रा निघाली आणि भारताच्या एका महान नेत्याचा शेवटचा प्रवास सुरु झाला. नेहरूंनी देशाला आपल्या पायावर उभे केले हा विश्वास जनतेेेच्या मनात होता.
गाडी रस्त्यावरून जात होती तेंव्हा लोकं गाडीजवळ येण्याचा प्रयत्न करू लागले. गाडी समोर जमा होणाऱ्या या गर्दीला सतत हटकावे लागत होते.
नेहरूंच्या पार्थिव देहावर उंच कॉलर असलेला पांढरा कोट आणि त्याच्या एका बटनहोलमध्ये लाल गुलाब खोचलेला होता.
पाहणाऱ्याला फक्त त्यांचा प्राणहीन चेहरा दिसत होता, उर्वरित शरीर फुलांनी झाकून गेले होते. त्यांचा देह तिरंग्यात लपेटण्यात आला होता. नेहरुंना रोज आपल्या कोटात गुलाबाचे फुल खोचण्याची सवय होती, त्यांचा अखेरचा पेहरावही तसाच होता.
नेहरुंना अखेरचा निरोप देण्यासाठी देशविदेशातून अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या गाड्या या गन कॅरेजच्या मागे होत्या. वाहनासमोर चालणारी गर्दी अफाट होती. त्यामुळे या अंत्ययात्रेला पुढे सरकण्यास वेळ लागत होता. त्यामुळे मागच्या वाहनांना दुसऱ्या रस्त्याने राजघाटपर्यंत जाऊ दिले.
गर्दीतून सावकाशपणे पुढे जात जात ही अंत्ययात्रा तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या राष्ट्रपती आवासासमोर आली. याच रस्त्यावरून पुढे जात ही अंत्ययात्रा इंडिया गेटपर्यंत पोहोचली.
१९४८ साली महात्मा गांधींची हत्या झाली तेंव्हा संपूर्ण देश हडबडून गेला होता. त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. पाठोपाठ फाळणीचे दाहक चटके, त्यानंतर महात्म्याचा खून. एका पाठोपाठ एक झालेल्या या आघातांनी देश सैरभैर झाला होता.
नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाची पुढची वाटचाल कशी असेल याबद्दल देशवासी साशंक होते.
देशाची पुढची वाटचाल कशी असणार याबद्दल जनतेला कसलीच स्पष्ट कल्पना नव्हती. अशा स्थितीत सर्वांना दिशा देणारा महात्मा मारला गेला होता, ज्याने अहिंसेची आयुष्यभर पूजा केली तो शेवटच्या क्षणी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जनतेला हे सत्य मानवले नव्हतेच. म्हणून आधीच अशांत अस्थिर असलेल्या या देशात गांधी हत्येने आगीत तेल ओतल्याचे चित्र निर्माण झाले होते.
परंतु नेहरू गेले तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून सतरा वर्षे झाली होती. या सतरा वर्षांच्या कालखंडात नेहरूंनी देशाला स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले होते. एका स्वतंत्र आणि लोकशाही राष्ट्राची वाटचाल कशी असू शकते याबद्दल लोकांना आता थोडीफार कल्पना आली होती. त्यामुळे एक महत्वाचा नेता हरवला असला तरी लोकशाहीची दिशा हरवू शकत नाही, हा विश्वास यावेळी लोकांच्या मनात नक्की होता.
अर्थात, देशासमोरील सर्वच समस्या सुटल्या होत्या असे नाही. आत्ताही समस्या होत्या, कुटील राजनीती होती. परंतु देश तेव्हा आपल्या पायावर उभा राहिला होता, स्थिर झाला होता.
नेहरूंनी देशावर खूप काळ शासन केले, त्यामुळे त्यांच्या स्मृती लोकांच्या मनातून खूप काळ राहणार होत्या. अगदी आजच्या काळातही बऱ्या-वाईट अर्थाने का होईना पण, नेहरूंचे स्मरण केल्याशिवाय एकही दिवस उलटत नाही, हे सत्य आहे.
नेहरूंच्या या अंत्ययात्रेला जमलेला १५ लाखांचा हा विशाल समूह हाताळणे काही खायची गोष्ट नव्हती. कुठे कुठे लोकांचे स्वतः वरील नियंत्रण सुटत होते. अचानकच या गर्दीत अराजकता उसळत होती. हा सैन्यदलाच्या कसोटीचा क्षण होता. या सगळ्या गदारोळात चार लोकांच्या मृत्यूही झाला होता.
पंतप्रधान आवास आणि पोलीस लाइन्सच्या जवळ गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. यात अनेक लोक जखमी झाले. या जखमी लोकांसाठी दवाखान्यात स्पेशल वार्ड बनवून त्यांना तिथे हलवण्यात आले.
विदेशातून आलेल्या मान्यवर लोकांमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री डीन रस्क, फ्रांसचे प्रतिनिधी लुई जॉक्स, ब्रिटनचे पंतप्रधान एलेक डग्लस आणि माजी व्हाईसरॉय अर्ल माउंटबॅटन सामील होते. भारतातील ब्रिटीशांचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन सुद्धा नेहरूंना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. लॉर्ड माउंटबॅटन आणि नेहरू जवळचे मित्र होते.
यावेळी लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले,
“मी आयुष्यातील एका महान मित्राला आणि शानदार व्यक्तिमत्वाला मुकलो आहे. आज इथे मी त्याच्या अंतिमसंस्कारासाठी उपस्थित आहे ही जाणीव खूप वेदनादायक आहे.”
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रस्क म्हणाले, “राष्ट्रपती जॉन्सन यांनी निरोप दिला आहे की, ते भारतीय जनतेच्या दु:खात सामील आहेत. कारण नेहरूंच्या जाण्याने भारताची अपरिमित हानी झाली आहे. नेहरू त्यांच्या काळातील एक ऐतिहासिक आणि महान व्यक्तिमत्व होते. उच्च भावना, उच्च विचार बाळगणारे महान व्यक्ती. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. नंतर देशाला उभे केले. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून आम्हालाही अमाप दुख: झाले आहे. या कठीण काळात आम्ही भारतीय जनतेसोबत आहोत.”
रस्क एका विशेष विमानाने भारतात आले होते. त्यांना परत जाण्यासाठी विशेष हेलिकॉप्टरची सोय केली. गर्दीतून एअरपोर्ट पर्यंत लवकर जाणे शक्य होणार नाही म्हणून राजघाटावरूनच त्यांच्या हेलिकॉप्टरने अमेरिकेकडे प्रस्थान केले.
याशिवाय, सोव्हिएत संघाचे उपराष्ट्रपती ए. एन. कोसिगिन आणि पाकिस्तानचे तत्कालीन विदेश मंत्री जुल्फिकार आली भुट्टो हे देखील उपस्थित होते.
नेहरूंची ही अंत्ययात्रा राजघाटावर पोहोचली. तिथेही लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. या सर्वांना मागे करण्यातच पोलिसांचा वेळ गेला. नेहरूंच्या पार्थिव शरीरावर लपेटलेला तिरंगा उतरवण्यात आला. त्यांच्यासाठी चंदनाची चिता तयार करण्यात आली होती.
शुभ्र वस्त्रातील ब्राह्मणांनी मंत्रोच्चारण आणि संस्कृत श्लोक म्हणत त्यांच्या अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण केला. हिंदू रीतीरिवाजानुसार नेहरूंचे अंत्यसंस्कार पार पडले. त्यांचे नातू राजीव गांधी यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला. त्यावेळी राजीव गांधी सतरा वर्षांचे होते. इंदिरा गांधी तर अगदी उन्मळून गेल्या होत्या त्यांची आत्त्या कृष्णा हठीसिंह यांनी इंदिराजींना पकडून ठेवले होते. त्यांची दुसरी आत्या विजयालक्ष्मी पंडित देखील त्यांच्या शेजारीच होत्या.
काश्मीरचे नेते शेख अब्दुल्ला अगदी महिन्याभरापूर्वीच तुरुंगातून बाहेर आले होते. तेसुद्धा नेहरूंच्या अंतिमसंस्कारासाठी यावेळी उपस्थित होते.
नेहरूंचा पार्थिव देह ज्वालांनी लपेटून गेला आणि सारा राजघाट ‘नेहरू अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमून गेला!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.