आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पक्षासारखी आकाशात ऊंच भरारी घेण्याचे स्वप्न बघणारया मानवाचे स्वप्न पुर्ण करण्याचे श्रेय जाते ते राइट बंधूंना. तेच एका सामान्य भारतीय नागरिकाचे आकाशात उडण्याचे स्वप्न पुर्ण करण्याचे श्रेय दिले जाते ते भारतीय व्यावसायिक विमानसेवेचे जनक समजले जाणारे महान उद्योजक ‘जे.आर.डी. टाटा’ यांना.
त्यांनी १९३२ मध्ये सुरुवात केलेली ‘टाटा विमान सेवा’ पहिली व्यावसायिक विमानसेवा म्हणून ओळखली जाते, जिचे रुपांतर आता ‘एयर इंडिया’ मध्ये झाले आहे.
जे. आर. डी. टाटांचे योगदान मौल्यवान तर होतेच परंतु त्याच बरोबर अजुन एक व्यक्ती होती ज्याच्या उल्लेखाशिवाय भारताच्या व्यावसायिक विमानसेवेबद्दल बोलणे चुकीचे होईल. या व्यक्तीचे नाव ‘नेविल विंटसेंट‘. माजी ब्रिटिश ‘रॉयल आर्मी फोर्स’चे (आरएएफ) विमानचालक.
एका वृत्तानुसार जे. आर. डी. टाटा यांनी स्वत: विंटसेंट यांना “भारतीय हवाई वाहतुकीचे संस्थापक” म्हणून संबोधित केले होते.
काहींच्या मते त्यांनी पहिल्या महायु*ध्दात आरएएफसाठी काम केले. तर काहींच्या मते महायु*द्धानंतर ४ वर्षांनी त्यांची निवड आरएएफमध्ये करण्यात आली. त्याचबरोबर त्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या पुर्व भागात असलेल्या इजिप्त, कुर्दीस्तान, जॉर्डन आणि इराक इथे १९२६ पर्यंत काम केले. नागरी हवाई वाहतुकीमध्ये जास्त आर्थिक स्थिरता आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दक्षिण आशियामध्ये काम केले.
त्यांच्या आरएएफमधील सेवेसाठी त्यांना ब्रिटिश सरकारने विशेष हवाई क्रॉस आणि ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ ने सम्मानित केले आहे.
साहसाच्या प्रेमात असलेल्या विंटसेंट यांनी भारत, बुर्मा आणि दक्षिण-पुर्व आशिया मध्ये हवाई सर्वेक्षणाच्या विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच बरोबर त्यांनी पहिली हवाई संदेश घेऊन जाणारी विमानसेवा जी इंडोनेशिया मधील बोर्नियो बेटावरुन ब्रिटिश खाडीपर्यंत होती, त्यासाठीसुध्दा चालक म्हणून काम केले.
१९२८ मध्ये त्यांनी मानवी इतिहासातील लांब पल्ल्याच्या हवाई उड्डाणापैकी एक असलेले उड्डाण केले. विंटसेंट यांनी नेवल या त्यांच्या साथीदाराबरोबर ‘डी हविल्लंड डीएच ९’ हे विमान चालवले. नंतर भारतामध्ये असलेल्या व्यावसायिक नागरी हवाई वाहतुकीच्या संधी बघुन त्यांनी भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला.
त्याच वर्षी भारतात हवाई वाहतुकीचा व्यवसाय सुरू होणार अशी बातमी विंटसेंट यांना कळली. ‘ब्रिटिश इम्पेरीयल एयरवेज’ आशिया ते ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय संदेश आणि प्रवासी सेवा सुरू करणार होते. तर डच वाहक केएलएम आणि एयर फ्रांस इंडोनेशिया आणि विएतनाममध्ये आपली सेवा सुरु करणार होते. भारतासाठी सुरु झालेल्या या सेवा भारतीय प्रवाशांना कराची येथे सोडत असत आणि तेथुन ब्रिटिश रेल्वेने पुढे पोहचवले जात असत. या प्रक्रियेला खुप वेळ जात असे.
याबद्दल माहिती मिळताच विंटसेंट यांना व्यावसायिक संधी दिसू लागली. कराचीमधून मेल घेऊन ते त्यांच्या अंतिम पत्त्यापर्यंत पोहचवण्यास त्यांनी सुरुवात केली. या कामासाठी २४ तासापेक्षाही कमी वेळ लागत असे.
आर्थिक पाठबळ नसल्या कारणाने विंटसेंट यांनी विविध भारतीय उद्योजकांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पारसी उद्योजक सर होमी मेहता. स्वत:ची इच्छा जरी नसली तरी विंटसेंट यांनी टाटाकडे जावे असे त्यांनी सांगितलं. मग ते दोराबजी टाटा यांना भेटले. तेव्हा दोराबजींनीसुध्दा यामध्ये जास्त रस दाखवला नाही.
दोराबजींचे पुतणे जे. आर. डी. यांना विमानांची फार आवड. त्यांच्या स्वतःकडे विमान चालवण्याचा परवानादेखील होता. त्यांनी विंटसेंट यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.
१९३२ मध्ये २ लाख रुपये गुंतवणुक करून टाटा हवाई सेवा सुरु झाली. त्यांनी ताशी ८० किमी वेग असणारे २ मॉथ विमान विकत घेतले. कराची ते मुंबई मेल आणि गरज पडली तर तेथून मद्रास अशी सेवा सुरु झाली.
टाटा हवाई सेवेने ब्रिटिश सरकारकडून कराचीमध्ये ब्रिटिश मेल सेवा बंद करण्यासाठी १० वर्षाचा करार केला. ‘द स्ट्रेट टाइम्स’शी बोलताना जे. आर. डी. टाटा यांनी १९३२ मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “सुरुवातीच्या काळात थोडीशी समस्या असली तरीही येणाऱ्या काळात व्यावसायिक समुदाय या सेवेला नक्कीच चांगला प्रतिसाद देईल.”
विमानचालक रेल्वेच्या मार्गाने विमानाची दिशा ठरवत असत. विंटसेंट या नविन हवाई वाहतूक सेवेचे मुख्य वैमानिक होते. त्यावेळी विमानात ताररहीत साधने उपलब्ध नव्हती, तसेच रात्रीचं उड्डाण शक्य नव्हती या समस्या ‘द स्ट्रेट टाइम्स’ने नमुद केल्या आहेत.
जे. आर. डी. यांची आत्मकथा लिहिणाऱ्या आर. एम. लाला यांनी दोघांमधील संवाद “द जॉय ऑफ अचीवमेंट” या त्यांच्या एका पुस्तकात लिहीलं आहे. त्यात असं लिहिलं आहे, जे. आर. डी. यांच्या मते विंटसेंट हा एक अद्भुत व्यक्ती होता. एकदम छान माणुस. कराची-अहमदाबाद-मुंबई-मद्रास या मार्गावर हवाई वाहतुकीची त्याची कल्पना अद्भुत होती.
सप्टेंबरमध्ये झालेल्या अतीपावसामुळे टाटाला आपली सुरुवातीचे उड्डाणे थोडी उशीरा करावी लागली.
कराची ते मुंबई प्रवास रेल्वेने ४५ तास लागत असत. विमानाने टाटा आपल्या जुहूमधील घरी ८ तासांपेक्षाही कमी वेळेत पोहचत असत. अमेरिकी प्रकाशनानुसार पोस्टमास्तर मेल गोळा करण्यासाठी थेट टाटांच्या घरी जुहुला येत असे असं नमुद केलं आहे.
हवाई सेवेचे ब्रीदवाक्य असे होते, “मेल हरवू शकतात, पण उशीरा पोहचणार नाहीत; प्रवासी उशीरा पोहचतील, पण हरवणार नाहीत.”
पहिल्या वर्षी मेल सेवेने ६०,००० रुपये नफा मिळवला. एका वर्षात १० हजारपेक्षाही जास्त मेल आणि १५५ प्रवासी वाहतूक करण्यात आली. विमान सेवा विशेष प्रसिध्द झाली ती कोणत्याही हवामानात वक्तशीरपणे दिलेल्या सेवेबद्दल.
ब्रिटिशांनी आपल्या कर्मचाऱ्यांना टाटाकडे वक्तशीरपणा शिकण्यासाठी पाठवावे असे वक्तव्य त्यावेळी नागरी हवाई वाहतुकीच्या संचालकांनी केलेले.
पुढील काही वर्षात विमानसेवने आपली सेवा दिल्ली (इंदौर, भोपाळ, ग्वाल्हेर मार्गे), गोवा, हैदराबाद आणि कोलंबो पर्यंत वाढवली. प्रवाशांची वाहतूक वाढली तेव्हा नावात बदल करुन टाटा एयरलाइन्स करण्यात आले. जे .आर. डी. यांनी त्यांच्या काकांनंतर कार्यभार हाती घेतला तरीही त्यांनी हवाई सेवेकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.
दुसऱ्या महायु*ध्दांनंतर मात्र टाटा एअरलाइन्समधे खुप बदल झाले. ब्रिटिश सरकारने त्यांची विमाने यु*ध्दसाहित्य आणि सैनिकांना वाहण्यासाठी नियुक्त केले. या समस्येच्या काळातही टाटा आणि विंटसेंट यांना संधी दिसली.
विमान विकत घेण्यापेक्षा ते स्वत:च बनवलेले जास्त फायदेशीर राहील असे त्यांना वाटले. यु*ध्द चालू असतानाच १९४२ मध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारला बॉ*म्बर विमान बनवण्याची परवानगी मागितली.
पण ब्रिटिश आरएएफला बॉ*म्बर विमानांची त्यावेळी गरज नव्हती. त्यांना गरज होती त्या ग्लाइडर विमानांची. यावर चर्चा करण्यासाठी विंटसेंट इंग्लंडला गेले. तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विंस्टन चर्चील यांचे मंत्री लॉर्ड बीवरबुक यांच्याशी झालेल्या भेटीनंतर विंटसेंट इम्पेरीयल एयरवेजच्या मार्फत परत येणार होते परंतु युध्दामुळे त्यांचा येण्याचा मार्ग बदलून लांबचा झाला होता.
विंटसेंट वाट बघणारे नक्कीच नव्हते. त्यांनी आरएएफच्या बॉ*म्बरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने आरएएफ बॉ*म्बर ह*ल्ल्यामध्ये कोसळले. जे. आर. डी. यांच्यासाठी हा खुप मोठा धोका होता. भविष्यात ठरवलेल्या बऱ्याच गोष्टी या घटनेमुळे राहुन गेल्या.
विंटसेंट म्हणजे एक महान व्यक्ती आणि दुरदृष्टी असणारा व्यक्ती होता. भारतीय हवाई सेवेच्या आजच्या यशाचं गमक अजुनही विंटसेंटच्या दुरदृष्टीस जाते.
“मार्ग जर सरकारच्या निदर्शनाखाली असेल, तर खाजगी मार्ग तयार होणार नाहीत हे नक्की. आपण केलेल्या कामाची फळे सरकार खाईल अशी भिती खाजगी कंपन्यांना वाटेल” विंटसेंटने १९३१ मध्ये दिलेल्या मुलाखतीत असे वक्तव्य केले होते.
विंटसेंट नसते तर आज भारतीय व्यावसायिक विमान वाहतूक सेवेची परिस्थिती कशी असती याचा विचार न केलेलाच बरा. महत्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती कधीच लोकांच्या नजरेत येत नाही हेच खरं. विंटसेंटला भारतीय व्यावसायिक हवाई वाहतुकीचा जनक मानले जाते ते त्याच्या दुरदृष्टी आणि आयुष्यभर केलेल्या परिश्रमामुळेच.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.