आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मागे एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नावाचा चित्रपट आला. हा चित्रपट संजय बारू, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या प्रवक्त्याने लिहिलेल्या पुस्तकावर आधारित होता.
या चित्रपटात मनमोहनसिंह यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ उभा करण्यात आला होता. त्यांचा कार्यकाळात झालेली आर्थिक प्रगती, त्यांच्या काळात झालेली भ्रष्टाचार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी त्यांच्यावर टाकलेला दबाव या सर्वच गोष्टींना विचारात घेण्यात आले होते.
जेव्हा मनमोहनसिंह यांचा कार्यकाळ समाप्त झाला त्यावेळी ते एक वाक्य म्हणाले होते ते वाक्य होते, ‘History will be kinder to him’ अर्थात ‘इतिहास माझ्यावर अन्याय करणार नाही’. बहुदा मनमोहनसिंह यांनी हे वाक्य लाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्याकडे दृष्टीक्षेप टाकून म्हटलं असावं.
कारण भारताच्या इतिहासातील खऱ्या अर्थाने ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ लाल बहादूर शास्त्री होते.
जेव्हा जेव्हा लाल बहादूर शास्त्री हे नाव इतिहासात समोर येते त्यावेळी त्यांचा ‘जय जवान जय किसान’ हा नारा आठवल्याशिवाय राहत नाही.
भारताच्या राजकारणात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग सुकर करण्यात के. कामराज यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
१७ वर्षे बाल्यावस्थेत असलेल्या लोकशाहीचे पालन करणाऱ्या नेहरूंच्या निधनानंतर सर्वत्र अनिश्चिततेची भावना पसरली होती. देशभरात नेहरूंची जागा कोण घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
नेहरूंच्या मृत्यूपूर्वी अमेरिकन दैनिक न्यूयॉर्क टाईम्सने एक लेख छापला होता ज्यात त्यांनी नेहरूंचा वारसा पुढे चालवू शकणाऱ्या भारतीय नेत्यांमध्ये एका व्यक्तीचे वर्णन त्यांनी केले होते, त्या व्यक्तीकडे त्यावेळी भारतीय रेल्वे मंत्रालायची जबाबदारी होती. हा व्यक्ती असा होता, ज्याच्या कार्यकाळात घडलेल्या एका रेल्वे अपघाताची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली होती. त्या व्यक्तीचे नाव होते लाल बहादूर शास्त्री.
न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखात लाल बहादूर शास्त्रींचा संपूर्ण जीवनपट समोर ठेवण्यात आला होता. त्यांच्या महात्मा गांधींवर असलेल्या श्रद्धेपासून त्यांच्या साध्या राहणीमानापर्यंत अनेक पैलूंचे कौतुक त्या लेखात करण्यात आले होते.
परंतु नेहरूंच्या मृत्यूवेळी त्यांनी कोणाला आपला वारसदार म्हणून नामांकित न केल्यामुळे काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेकांच्या इच्छा जागृत झाल्या होत्या. त्यात प्रमुख नाव होते मोरारजी देसाई. नेहरू गेले त्यादिवशीच मोरारजी देसाईंनी पंतप्रधानपदासाठीची आपली इच्छा बोलून दाखवली होती.
हंगामी पंतप्रधान म्हणून गुलझारीलाल नंदा यांची निवड करण्यात आली होती. नंदा यांना देखील आपले पंतप्रधानपद टिकवून ठेवायचे होते. त्यावेळी मोरारजी देसाई आणि गुलझारीलाल नंदा यांच्यात चढाओढ सुरू असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते के. कामराज पुढे आले आणि त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन ‘लाल बहादूर शास्त्री’ यांचे नाव पंतप्रधानपदासाठी निश्चित केले.
खरंतर स्वतः शास्त्री यांना कधीच पंतप्रधानपदाची अभिलाषा नव्हती. पण के. कामराज यांनी मोरारजी देसाईंचा डाव हाणून पाडत त्यांना आणि नंदा यांना दावेदारी मागे घ्यायला भाग पाडून लाल बहादूर शास्त्रींच्या हाती पंतप्राधान पदाची सूत्रे सोपविली.
लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यावर सर्वांना वाटलं की ते इतर कॉंग्रेस नेत्यांच्या हातचं भावलं बनतील, पण फक्त १८ महिन्यांच्या काळातच आपलं वेगळं अस्तित्व दाखवून दिलं.
पंतप्रधान म्हणून त्यांचा १८ महिन्यांचा कार्यकाळात त्यांनी अशा गोष्टी करून दाखवल्या ज्यामुळे भारताच्या लोकशाहीचे रक्षण तर झालेच पण तीच लोकशाही आणखी समृद्ध देखील झालो. जगाला भारत शांततेचा व मैत्रीचा संदेश देऊ शकला.
आपल्या १८ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी खरा धोरणी नेता कसा असावा याचे एक उदाहरण जगासमोर ठेवले. त्यांनी भारताला एका मोठ्या संकटाच्या काळातून बाहेर काढले. दक्षिणेकडे सुरू असलेल्या हिंसक हिंदीविरोधी आंदोलनाला शांत करण्यापासून, अन्न-धान्य टंचाई असताना देशभरातील जनतेचे पोट भरण्याची व्यवस्था करण्यासाठी हरित क्रांतीचा आणि श्वेत क्रांतीचा मार्ग प्रशस्त केला.
त्यांनी नेहरूंच्या केंद्रीय नियोजनाच्या समाजवादी संकल्पनेत अमुलाग्र बदल केला. त्यांच्या कार्यकाळातील सर्वात सुवर्ण क्षण होता तो म्हणजे १९६५ च्या यु*द्धात केलेला पाकिस्तानचा पराभव व त्यानंतर भारताला दिलेला ‘जय जवान जय किसान’चा नारा!
आपल्या कमीतकमी संसाधनांचा वापर करत त्यांनी पाकिस्तानशी लढा दिला होता. आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे, त्याच्या मोबदल्यात आम्हाला गरीब रहावं लागलं तरी चालेल अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानचा धिक्कार ऑगस्ट १९६५ च्या संसदीय भाषणात केला होता.
२३ सप्टेंबर १९६५ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या दबावापोटी हे यु*द्ध थांबवले गेले. पुढे सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने आपल्या शत्रू राष्ट्र पाकिस्तानशी करार करण्यासाठी शास्त्री रशियाला ताश्कंद येथे गेले. १० जानेवारी १९६६ ला त्यांनी करारावर स्वाक्षरी केली आणि पुढे तिथेच त्यांचा मृत्यू झाला. शास्त्रींच्या जाण्याने सगळ्यांना धक्का बसला.
ताश्कंद करारामुळे भारतात मात्र शास्त्रींवर पाकिस्तानच्या कश्मिरमधील उपद्रवाला मान्यता दिली म्हणून टीका केली जात होती.
लाल बहादूर शास्त्री यांचा १८ महिन्याचा कार्यकाळ नेहरूंच्या १७ वर्षीय राजवटीपेक्षा अधिक चांगला होता. त्यांच्या मनात भारतीय अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा विचार होता. पण दुर्दैवाने त्यांना जास्त आयुष्य लाभलं नाही.
जर शास्त्रींना दहा वर्षे अजून आयुष्य लाभलं असतं तर इंदिरा गांधी राजकारणात आल्या नसत्या, राजीव आणि संजीव या त्यांच्या मुलाने नोकरी केली असती, राहुल हा त्यांचा नातू देखील परदेशात नोकरी करत असता आणि देशात गांधी घराणं अस्तित्वात नसतं. पण या सर्व जर तरच्या गोष्टी झाल्या.
मनमोहनसिंह असो की लाल बहादूर शास्त्री दोन्ही काँग्रेसचे मातब्बर नेते आणि त्यांनी सुधारणावादी राजकारण केलं. कदाचित इतिहास मनमोहन सिंह यांचं चांगलं चित्रण करेल पण लाल बहादूर शास्त्रींना स्वतःला सिद्ध करण्याचा कालावधी मिळाला नाही. अचानक पडलेल्या जबाबदारीला त्यांनी कमी कार्यकाळात ज्या प्रकारे निभावलं ते अद्भुत होतं. त्यासाठी ते इतिहासात अमर झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.