आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
स्थळ- बारामुल्ला, जम्मू-काश्मीर.
या भागात होणारा दहशतवाद्यांचा धुडगूस, गोळीबार ही काही नवीन बाब नाही. दर थोड्या दिवसांनी इथे दगडफेक, पोलिसांवर, CRPFच्या जवानांवर हल्ले अशा घटना घडत असतात. परंतु यामध्ये विनाकारण भरडला जातो तो तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस.
दहशतवाद्यांना इथल्या जनतेशी काहीही देणंघेणं नसतं. त्यांच्यासमोर आलेली व्यक्ती पोलीस असो, जवान असो की एखादा लहान मुलगा असो त्यांना समोर आलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडणे एवढंच माहितीये.
असाच गेल्या आठवड्यात बारामुल्लामध्ये भरदिवसा अचानक गोळीबार सुरु झाला. मशिदीबाहेर चालू असलेल्या या अंदाधुंद गोळीबारात काही सामान्य नागरिकांचा बळी गेला. त्यातच एक आजोबा होते. त्यांच्याबरोबर त्यांचा एक ३ वर्षांचा नातू होता. त्या आजोबांना गोळी लागली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
आता या लहानग्या जीवाला काहीच कळेना. तो आपल्या आजोबांच्या मृतदेहाशेजारी बसून होता. त्याच्या आजूबाजूला अंदाधुंद गोळीबार सुरूच होता.
इतक्यात त्याच्याकडे आपल्या एका CRPFच्या जवानाचं लक्ष गेलं. त्याने या छोट्या मुलाला इशारा करून स्वतःकडे बोलावले आणि पटकन कडेवर उचलून सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर त्या बाळाला त्याच्या घरच्यांकडे सुखरूप पोहोचविण्यात आले.
कोणीतरी हा फोटो काढला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. सगळीकडूनच या जवानाचं कौतुक होऊ लागलं.
तर, हा जवान आहे कोण?
या वीराचं नाव आहे पवन कुमार चौबे. मूळ वाराणसीचे असणारे पवन १७९ बटालियनचा भाग आहेत. त्यांनी २०१०मध्ये CRPFमध्ये भरती झाले. सुरुवातीला नक्षलवाद्यांशी दोन हात केल्यानंतर २०१६ ला त्यांची बदली जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढण्यासाठी झाली.
“जम्मू-काश्मीरला येण्याआधी पवन 203 CoBRA बटालियनमध्ये कार्यरत होते. ही बटालियन खास नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी यांना वेगळे ट्रेनिंग दिले जाते. पवनने या बटालियनमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची बदली सोपोर, बारामुल्ला येथे करण्यात आली. २०१६पासून येथे वेगवेगळ्या कामगिऱ्या त्याने व्यवस्थित पार पाडल्या आहेत”, असे CRPFच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांवर विशेष प्रेम असणाऱ्या गटांनी या मुलाचे आजोबांना आर्मीनेच मारले असं सगळीकडे पसरवायला सुरुवात केली आणि आपल्याच जवानांना बदनाम करणे सुरु केले. अर्थात हे खोटेच आहे आणि सेनेला बदनाम करून दहशतवाद्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिली वेळ नाही. यावरून त्यांची फुटीरतावादी मानसिकता लक्षात येते.
लहान मुलं, सामान्य नागरिक यांच्यावर आज पहिल्यांदा हमला झालेला नाही. याआधीदेखील कित्येकदा नागरिकांवर हल्ले झालेत, असंख्य नागरिक जखमी झालेत. काही विनाकारण मृत्युमुखी पडलेत. पण त्याने हे हल्ले काही थांबले नाही आणि ते कधी थांबतील याची शाश्वती नाही.
परंतु, एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आपले जवान त्यांच्या जीवाची, घरदाराची कसलीही काळजी न करता सीमेवर दिवसरात्र पहारा देऊन आपण सुरक्षित राहू याची काळजी घेतायत.
अशा सर्व भूमिपुत्रांना आणि खासकरून त्यांच्या घरच्यांना आमचा मानाचा मुजरा. तुमच्यामुळे आम्ही आणि आमचा परिवार सुरक्षित आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.