आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आधुनिक जगामधील सगळीकडचेच राजकारण घोडे-बाजाराने भरलेले आहे. परंतु योगायोग म्हणजे या संज्ञेची सुरुवात भारतातूनच झाली आहे. निवडणुकांनंतर, जर एखादा विशिष्ट पक्ष सत्ता मिळवू शकत नसेल तर एक विचित्र व्यापार केला जातो. विरोधी पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांना आपल्याकडे वळवण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे घोडेबाजार! पण असे का म्हटले जाते? भारतातही ‘घोडेबाजार’ होऊ नये यासाठी निवडून आलेल्या आमदारांची/खासदारांची बरीच काळजी घेतली जाते.
आधुनिक यु*द्धतंत्राच्या आगमनापूर्वी, विशेषतः र*णगाडे आणि बंदु*कीच्या आगमनापूर्वी घोडे हे यु*द्धाच्या यादीतील मुख्य घटक होते. तेराव्या आणि चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात, विशेषत: दक्षिण भारत हा अनेक सत्तांच्या संघर्षांचा केंद्रबिंदू होता. दक्षिणेतील बहमनी साम्राज्ये आणि विजयनगरचे सर्वार्थाने समृद्ध साम्राज्य यांच्यामध्ये अनेक वेळा यु*द्धाच्या ठिणग्या उडत राहिल्या. त्यानंतर काही वर्षांनी दक्षिणेत मराठ्यांचा उदय होऊन या सत्तेने मुघल साम्राज्याचा जवळ जवळ अंतच घडवून आणला. पण या सर्व संघर्षांमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘अश्व’.
‘यस्याश्वा तस्य राज्यं । यस्याश्वा तस्य मेदिनी । यस्याश्वा तस्य सौख्यं । यस्याश्वा तस्य सामराज्यं ।।’ या श्लोकाप्रमाणे भारतीय साम्राज्यांमध्ये आणि सरदारांमध्ये अश्वांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. भारतीय साम्राज्यांना आणि सरदारांना अरब राष्ट्रांकडून सर्वोत्तम घोडे मिळाले. भारतीय घोड्यांची गती, चपळता आणि सौंदर्य अरबी घोड्यांशी जुळू शकत नाहीत असे अनेक भारतीय साहित्यातून दिसते. शिवाय भारताकडे जाण्याचा मार्ग माहित असलेले अरब हे एकमेव व्यापारी होते. त्यामुळे ते भारतीय साम्राज्यांना घोड्यांचे एकमेव पुरवठादार बनले.
अगदी युरोपियन लोकांना भारतात पोहोचण्यासाठी अरब व्यापाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज होती. पोर्तुगीजांनी सर्वप्रथम ही मक्तेदारी मोडीत काढली आणि समुद्रात प्रवास करण्याच्या अरब व्यापाऱ्यांच्या युक्त्या शोधून काढल्या. त्यानंतर पोर्तुगीजांनी भारतीय साम्राज्यासाठी घोडे आणले. या काळात राजे स्वतः घोड्यांची देखरेख आणि सांभाळ करीत नसत. हे काम त्यांनी आपल्या सरदारांवर सोपवले होते. एखाद्या सरदाराकडे किती घोडे आहेत यावरून त्याचे सैन्यातील पद ठरत असत.
यु*द्धादरम्यान, या सरदारांना राजे बोलावून घेत आणि त्यांच्या शौर्याबरोबरच लढायांमध्ये त्यांच्या घोड्यांचे योगदान करण्यास सांगत असत. राजे आपल्या घोड्यांची संख्या वाढवण्यासाठी पैसे देऊन “विरोधी पक्षा”तील राजांच्या सरदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करीत असत. अशा प्रकारे संघर्ष जिंकण्याच्या हेतूने विरोधी पक्षांची ताकद विकत घेण्यासाठी घोडे-बाजार हा शब्द अस्तित्वात आला. काळाच्या ओघात घोडे अप्रचलित झाले असले तरी घोडे-बाजार हा शब्दप्रयोग अजूनही लागू आहे आणि कदाचित अमरही आहे.
भारतात पुढे शिवरायांनी ही पद्धत मोडून काढली आणि स्वराज्यातील अश्वांना विशेष महत्व दिले. शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी तीन प्रमुख भाल्यांच्या मदतीने शिवरायांच्या राज्याचे द्योतक दाखवण्यात आले होते. यापैकी एका भाल्यावर राज्याच्या अश्वशक्तीचे द्योतक असलेली अश्वाची प्रतिकृती, दुसऱ्या भाल्यावर समुद्रावरील सत्तेचे द्योतक असलेले माशाचे तोंड आणि तिसऱ्या भाल्यावर न्यायाचे द्योतक असलेला तराजू होता. यावरूनच स्वराज्यातील अश्वाचे मोल कळू शकेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.