आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
औद्योगिक क्रांतीमुळे सर्वच क्षेत्रांत जागतिक क्रांती झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. औद्योगिक क्रांती आणि त्याआधी १६४८ साली झालेल्या ‘वेस्टफालिया’च्या करारामध्ये जागतिकीकरणाची बीजं होती. वेस्ट फालियाच्या करारामध्येच राज्याचे सार्वभौमत्व आणि लोकशाही पद्धती सांगण्यात आली होती म्हणजेच वेस्टफालिया आणि औद्योगिक क्रांतीसारख्या गोष्टींमुळे जग आर्थिक आणि व्यापाराच्या दृष्टीने जवळ आलं. या सगळ्याची सुरुवात युरोपमधून वैज्ञानिक प्रगतीने झालेली आपल्याला दिसते.
ब्रिटिशांनी भारतात ज्याप्रमाणे अन्याय आणि अत्या*चार केले, त्याचप्रमाणे त्यांनी आधुनिक भारत देश घडवण्यात काहीसा हातभारसुद्धा लावला. अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमधील ब्रिटिशांचे योगदान अमान्य करता येणार नाही. मग ते सुरक्षा क्षेत्र असो, दळणवळण किंवा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्र असो. फरक इतकाच की युरोपीय वसाहतवाद्यांनी भारतीय मूलनिवासींना कधीही कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू दिली नाही. जगदीशचंद्र बसू यांच्यासह याची अनेक उदाहरणे भारतीय इतिहासात आहेत. पण सैन्यव्यवस्था, पोस्ट, वाहतुकीचे मार्ग, पूल, लसीकरण, जनगणना या सर्वोत्तम गोष्टींबरोबरच ब्रिटिशांनी आणखी एक महत्वाची गोष्ट दिली, ती म्हणजे रेल्वे.
आज रेल्वे म्हणजे भारताची ‘जीवनवाहिनी’ बनली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई तर रेल्वेशिवाय ठप्पच होऊन जाते. ही रेल्वे सर्वप्रथम ब्रिटिशांनी भारतात आणली. भारतातील सगळ्यांत पहिली रेल्वे कुठून कुठपर्यंत धावली याचे उत्तर आपसूकच १८५३ साली धावलेली, बोरी बंदर ते ठाणे हे उत्तर येईल. पण हे अर्धसत्य आहे. नेमकं कसं हे समजून घेण्यासाठीच हा विशेष प्रयत्न..
सर्वांत पहिली ‘रेल्वे लाईन’ ही बोरीबंदर ते ठाणे अशी नसून मद्रास अर्थात सध्याच्या चेन्नई येथे पहिली ‘रेल्वे लाईन’ होती. रेल्वेचे स्टीम इंजिन ब्रिटनमधून आले होते. ज्या दिवशी ब्रिटीश अभियंते जहाजातून इंजिन उतरवणार होते, त्या दिवशी चेन्नईमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. जेणेकरून लोकांना प्रथमच स्टीलचे भलेमोठे आणि आश्चर्यचकित करून टाकणारे इंजिन ईस्ट इंडिया कंपनी दाखवू शकेल.
ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर ८ वर्षांनीच, १६०८ साली ब्रिटिशांनी या कम्पनीद्वारे भारतात पाय रोवायला सुरुवात केली. व्यापाराच्या आडून त्यांना सत्ता हस्तांतरित करायची होती याची जाणीव अत्यंत कमी भारतीयांना असल्याची दिसते. पण शिवरायांसारख्या काही जाणकारांना याची पूर्ण खात्री होती. म्हणूनच त्यांनी एकदा ईस्ट इंडिया कंपनीशी तांब्याचा व्यापार करताना त्यांना २० ते २५% तोटा घडवून चांगलाच धडा शिकवला होता. पण पानिपतच्या तिसऱ्या यु*द्धानंतर सर्वच गोष्टी नियंत्रणाबाहेर जात राहिल्या आणि अंतिमतः ईस्ट इंडिया कंपनीने आपला पहिला गड मद्रासला स्थापन केला.
सर्वत्र कच्चे रस्ते असल्याने मुख्य भूमीपासून किनारपट्टीपर्यंत (लुटलेला) माल वाहून नेण्यासाठी योग्य वाहतूक उपलब्ध नसल्याचे ईस्ट इंडिया कंपनीला समजले. ईआयसीने या समस्येचे निराकरण करण्यासाठी रेल्वे लाईन सुरु करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर लवकरच ईआयसीने जगातील सर्वात महागडा रेल्वेमार्ग सुरु केला, यासाठी आवश्यक सर्व निधी सार्वजनिक क्षेत्रातून आलेला होता. शिवाय सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून जितका निधी ईआयसीला मिळत असे तो संपूर्ण निधी ब्रिटनकडे वळवण्यात येत असत.
‘ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली’ हे वाक्य ऐकून, वाचून अनेकांच्या मनात ब्रिटिशांबद्दल सहानुभूती वाढताना दिसते. किंबहुना स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ज्या निवडक “कॉन्व्हेंट” शाळा ब्रिटिश-धार्जिणं विषारी शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांना देतात, त्यांच्या मते तर ‘भारत राष्ट्र’ हे ब्रिटिशांनी निर्माण केलेलं आहे. पण ब्रिटिशांनी भारतात ज्या सोयी-सुविधा आणल्या, त्यांचा कितपत उपयोग आपल्या पूर्वजांना झाला?
या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भारतातील विविध भागांमध्ये पडलेल्या दुष्काळातून मिळेल. दुष्काळाच्या काळातही रेल्वेचा वापर अन्न वाहून नेण्यासाठी केला जात नव्हता, तर (लुटलेला) माल, मुख्यतः कापूस मुख्य भूमीवरून किनारपट्टीपर्यंत करण्यासाठी केला जात होता. भुकेने आणि तहानेने व्याकुळ हजारो लोकांनी रेल्वे रुळांजवळ आपले प्राण गमावले होते.
लवकरच ब्रिटिश रेल्वेद्वारे भारत जोडला गेला. भारतीय रेल्वेचे डबे हे भारतातील जातिव्यवस्थेची पकड कमी करण्याचे केंद्र बनले. सर्व जातीचे लोक रेल्वेने एकत्र प्रवास करत होते. रेल्वेनेही भारताला एक प्रमाणित वेळ दिला.
मद्रासमधील ईआयसीला मद्रासच्या उत्तरेकडील लाल टेकड्यांपासून मद्रास बंदरावर खडक स्थलांतरित करायचे होते. यासाठी ईआयसीने रेल्वे लाईन टाकली. स्टीम इंजिन ब्रिटनमधून आयात करण्यात आले होते आणि १८३७ साली हे इंजिन जहाजाने भारतात आले होते. पण या काळात मद्रासला योग्य बंदर नव्हते, त्यामुळे कटॅमरॅम्स नावाच्या छोट्या बोटी समुद्रातून किनाऱ्यापर्यंत मालवाहतूक करण्यासाठी वापरल्या जात होत्या.
कटॅमरॅम्स लाकडाने बनलेल्या, मासेमारी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साध्या नौका होत्या. ब्रिटीश अभियंत्यांनी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या क्रेनचा वापर करून स्टीम इंजिनला जहाजातून कटॅमरॅम्सच्या बोटींच्या गटामध्ये हलवले. हे इंजिन सुरक्षितपणे मद्रास किनाऱ्यावर पोहोचले. ईआयसीने हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आणि अशा प्रकारे भारतातील पहिला रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.