आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
रेल्वे, सर्वसामान्य मनुष्याशी नाळ जुळलेले एक हक्काचे वाहतुकीचे साधन. भारतात स्वतःच्या सोयीसाठी इंग्रजांनी रेल्वे सुरू केली, तरी ती आज भारतीय लोकांच्या रोजच्या जगण्याशी पूर्णतः एकरूप झालेली आहे. आरामात बसून, कमी खर्चात, विना ट्रॅफिक लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वेसारखा स्वस्त नि मस्त पर्याय नाही. केवळ प्रवासासाठीच नाही तर मालवाहतुकीसाठीही रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
सोळाव्या शतकात युरोप खंडातील कोळशाच्या खाणींमध्ये अनेक ठिकाणी लाकडी किंवा लोखंडी रुळावरून कंगोरे असलेली लोखंडी किंवा लाकडी चाकाची ‘वाहने’ – जी पिंपे, टिपे अशा स्वरूपात असत – ओढून अथवा ढकलून नेण्याची पद्धत होती.
१५५०-६० च्या सुमारास फ्रान्स व जर्मनीमध्ये प्रसिद्ध झालेल्या खाणशास्त्रावरील काही ग्रंथांमध्ये या वाघीण-मार्गाची सचित्र माहिती दिलेली दिसून येते. त्या काळातील हे वाघीण-मार्ग अभियांत्रिकीदृष्ट्या अतिशय प्राथमिक अवस्थेत होते. या वाहतुकीसाठी वापरलेले रूळ, चाके व वाघिणी अशी साधने लाकडी व लोखंडी अशा मिश्र स्वरूपाची होती. शिवाय त्यांना ओढण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी घोडा किंवा क्वचित कधी मानव यांचा वापर केला जात असल्याने हे वाघीण-मार्ग कमी कार्यक्षम होते.
सतराव्या शतकात जर्मनीमधून इंग्लंडमध्ये आलेल्या काही अभियंत्यांनी कोळशाच्या खाणीतील ‘वाघीण-मार्गाची’ ही प्राचीन पद्धत इंग्लिश खाणीमध्ये चालू केली. त्यांनी यात काही बदल करत त्यांचे रूपांतर लोखंडी रूळ व चाके असलेल्या लोहमार्गात करण्याचे प्रयत्न केले. त्यात ते यशस्वीही झाले. शतकाच्या अखेरपर्यंत कोळशाच्या खाणींपासून दूरवर असलेल्या बंदरांपर्यंत मालाची वाहतूक करणे या लोहमार्गांमुळे शक्य होऊ लागले.
युरोप व उत्तर अमेरिका या दोन खंडांच्या व्यतिरिक्त रेल्वे वाहतुकीचा उल्लेखनीय प्रसार झाला तो भारतात. इंग्लंडमध्ये रेल्वे वाहतूक सुरू झाली तेव्हापासूनच भारतात व्यापाराच्या निमित्ताने येऊन राज्यकर्ते बनलेले ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी भारतातही रेल्वे सुरू करण्याची स्वप्ने पाहत होते.
तोपर्यंत बैलगाडी, घोडागाडी अशा साधनांवरच प्रवासासाठी अवलंबून असलेल्या भारतीय माणसासाठी रेल्वे हा एक मोठा चमत्कार होता. “सायबाचा पोऱ्या कसा रे अकली, बिनबैलाने गाडी की हाकली.” हा वाक्प्रयोग तेव्हा रूढ झाला होता. पण या रेल्वेच्या आजवरच्या इतिहासात अनेक वळणे आलेली आहेत.
एक गोष्ट खरी, की इंग्रजांनी भारतामध्ये रेल्वे आणली ती केवळ लोकांना प्रवास करता यावा म्हणून नाही, तर आपल्या मालाची वाहतूक सुलभतेने करता यावी म्हणून. इसवी सन १८३२ पासूनच तत्कालीन मद्रासमध्ये म्हणजेच आजच्या चेन्नईमध्ये रेल्वे कशी सुरु करता येईल याविषयीचे प्रयत्न सुरू झाले होते. त्यामुळे तसे पाहता भारतामध्ये रेल्वे वाहतुकीचे पहिले डिझाईन १८३२ सालीच मांडले गेले होते.
या रेल्वेचे नाव होते ‘रेड हिल्स रेल्वे’. ही रेल्वे इसवीसन १८३७ साली मद्रास मधील रेड हिल्स परिसरापासून चिंताद्रीपेट पुलापर्यंत धावली. या रेल्वेच्या निर्मितेचे श्रेय सर आर्थर कॉटन यांना जाते. या रेल्वेलाईनचा उपयोग मुख्यतः मद्रासमधील रस्ते बांधण्याच्या कामी वापरात येणारे ग्रॅनाईटचे दगड वाहून नेण्यासाठी केला जाई.
आजही भारतातील पहिली रेल्वे लाईन कोणती? या प्रश्नाचे उत्तर अनेक जण बोरीबंदर ते ठाणे असे देतात. मात्र ही पॅसेंजर रेल्वे लाईन होती. चिंताद्रीपेट पुलाजवळची १८३७ मधली ‘रेड हिल्स रेल्वे लाईन’ ही त्या अर्थाने पहिली रेल्वे लाईन आहे. मात्र प्रत्यक्ष वाहतुकीपेक्षा तिचा प्रदर्शनासाठीच जास्त उपयोग केला गेला.
तिचे निर्माते कॅप्टन कॉटन यांनी तिच्या वापराविषयी जो प्रस्ताव मांडला होता, त्यानुसार लिटिल माउंट या परिसरात अनेक दगडांच्या खाणी होत्या. रेड हिल्स पासून या खाणींपर्यंत जर एखादी रेल्वे लाईन असेल तर मालाच्या वाहतुकीमध्ये बरीच बचत होऊ शकेल, असे त्यांचे मत होते. परंतु ही रेल्वे लाईन मुख्यतः पवनऊर्जेवर चालणारी होती. त्यामुळे भविष्यात ती नियमित सेवा देऊ शकली नाही, आणि अखेरीस एक दिवस तिला निरोप घ्यावा लागला.
पुढे भारतात नियमित रेल्वे सेवा सुरू झाली आणि अनेक कमी वाहतुकीसाठी रेल्वे फिडर सर्विसेस म्हणून वापरण्यात येऊ लागल्या. त्यापैकी पहिली म्हणजे दक्षिण भारतातील कुलशेखरपट्टणम् लाईट रेल्वे किंवा के. एल. आर. ही रेल्वे सुरुवातीला प्रवासी आणि मालवाहतूक करण्यासाठी डिझाईन करण्यात आली होती.
मुळात या रेल्वेची संकल्पना मोठ्या प्रमाणावर वाहतूक करण्यासाठीची होती आणि कुड्डालूर – वृद्दाचलम् – सेलम या मार्गावर ती धावणार होती. या रेल्वेचे उद्घाटन १९१५ साली झाले आणि त्यावेळी ती कुलशेखरपट्टणम् जॅगरी फॅक्टरी पासून तिरूचेंदुरपर्यंत २७ मैल एवढे अंतर धावली. पुढे १९४० साली ही रेल्वे बंद पडली आणि तिचे रूळ भंगारात काढून महायु*द्धासाठी वापरण्यात आले.
केएलआरच्या वाघिणी एका जर्मन इंजिनिअरिंग कंपनीकडून मागवण्यात आल्या होत्या. या कंपनीचे मुख्यालय कलकत्ता येथे होते आणि दक्षिणेत ती ‘पॅरीज’ या नावाने ओळखली जात होती. १९०९ साली पॅरीजने लाईट रेल्वे म्हणजे कमी वर्दळीच्या वाहतुकीसाठी डिझाईन केलेली रेल्वे या क्षेत्रातील विशेषज्ञ ऑरेनस्टाईन आणि कोपेल (ओ अँड के) यांची भागीदारी मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु या जर्मन कंपनीला या प्रकल्पाची भागीदारी नको होती तर त्यांना पुरवठादार म्हणून काम करण्यात रस होता.
दुर्दैवाने यानंतर काही काळाने दुसरे महायु*द्ध सुरू झाले आणि पॅरीजने ‘ओ अँड के’चा ताबा मिळवला. याबरोबर केएलआरसाठी पॅरीजने यापूर्वी ऑर्डर केलेल्या वाघिणीचाही ताबा मिळाला. अर्थातच ओ अँड के कडून जे काही मिळाले त्याचा पॅरीजला फारसा उपयोग झाला नाही.
त्यानंतर पॅरीजने लाईट रेल्वे बांधणीच्या व्यवसायाकडे आपले लक्ष अधिक केंद्रित केले. हा व्यवसाय अधिक यशस्वीपणे चालवण्यासाठी त्यांनी रेल्वे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची स्थापना केली. महायुद्धानंतर हे डिपार्टमेंट ‘पॅरी इंजीनियरिंग लिमिटेड’ नावाने ओळखले जाऊ लागले, आणि एक कंपनी म्हणून त्यांची कारकीर्द दीर्घकाळ टिकली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.