आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मानवी आयुष्यात जन्म व मृत्यू या २ गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे आणि प्रत्येक सजीवाला या दोन्ही गोष्टींना सामोरं जावं लागतं. मानवी देहातून आत्मा निघून जातो व माणसाला मृत्यू येतो असं म्हणतात. मग नंतर हा आत्मा जन्म घेतो. कोणाचा आत्मा स्वर्गात जातो तर कोणाचा नरकात जातो. काही लोकांचा भटकत राहतो असं सुद्धा म्हणतात.
काशी हे ठिकाण मोक्ष मिळण्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्या व्यक्तीस या ठिकाणी मृत्यू येईल त्याला पुनर्जन्म वगैरे या सगळ्या फेऱ्यातून मुक्ती मिळून तो थेट स्वर्गात जातो. पण जसं काशी मध्ये मृत्यू झाल्यावर माणूस स्वर्गात जातो तसेच आपल्या देशात मगहर हे असं ठिकाण आहे की या ठिकाणी मृत्यू झाल्यात माणूस नरकात जातो असं म्हणलं जातं.
तर आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मगहर या अशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत जिथे संत कबीर यांनी अखेरचा श्वास घेतला. अशी एक शांत जागा जिथे तुम्हाला मृत्यू आला तर तुम्ही नरकात जाणार किंवा गाढवाच्या जन्मी जाणार अस बोललं जातं. तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून संत कबिरांची समाधी असणाऱ्या मगहर या शहराची माहिती घेऊया.
दुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार,
तरुवर ज्यों पत्ता झड़े, बहुरि न लागे डार.
या ओळी अशा एका संतांच्या आहेत ज्यांनी समाजाच्या धारणेला कायम चुकीचं ठरवलं. त्यांनी जिवंत असताना चुकीच्या गोष्टींवर नेहमी प्रहार केला. आपल्या शेवटच्या क्षणी सुद्धा ते एक मोठा संदेश सोडून गेले. वरचे काव्य हे संत कबीर यांचे आहे. संत कबिरांनी असं म्हणलं होत की मनुष्य जन्म असा आहे जसं की एका झाडाच्या फांदीचे पान, जे एकदा गळून पडले की पुन्हा परत फांदीवर येत नाही. जीवन सुद्धा तसच आहे एकदा मृत्यू आला की पुन्हा जीवन नाही.
कबिरांचा जन्म काशीचा, ते वाढले सुद्धा तिथेच मग असं असून सुद्धा त्यांनी अखेरचा श्वास हा मगहर इथे घेतला होता. हीच गोष्ट मगहर या ठिकाणाला महत्वपूर्ण बनवते. तर या लेखात आपण मगहर या शहराची माहिती घेत घेत संत कबीर यांच्याविषयी सुद्धा जाणून घेऊया.
आज भारतासाठी मगहर हे एक खूप महत्वाचं शहर आहे त्याचं कारण हे की इथे संत कबिरांची समाधी आहे. ही जागा एकमेवाद्वितीय असण्याचं कारण या जागेने कबिरांचे विचार जिवंत ठेवले आहेत. हेच कारण आहे की ज्यामुळे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांनी या शहराला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
उत्तर प्रदेशात असणारे मगहर हे शहर कुठल्याही धर्माच्या पलीकडचं शहर आहे. हे शहर गोरखपूर या शहरापासून केवळ ३० किलोमीटरच्या अंतरावर असून कौसंबी पासून ७० किलोमीटरवर आहे. या ठिकाणी आपण सार्वजनिक वाहनाने सुद्धा सहज पोहचू शकाल.
मगहर या शहराला घेऊन बऱ्याच दंतकथा सांगितल्या जातात. त्यातलीच एक अशी सुद्धा की बौद्ध भिक्षु लोक कपिलवस्तू, लुंबिनी, कुशीनगरसारख्या प्रसिद्ध बौद्ध स्थानांच्या दर्शनासाठी इथूनच जायचे. जाताना हे भिक्षु लोक या भागात चोऱ्या करत असायचे व याच गोष्टीमुळे या भागाचे नाव मार्गहर हे पडलं व नंतर त्याच रूपांतर मगहर या नावात झालं अस म्हणलं जातं.
दुसरी एक कथा अशी सुद्धा सांगितली जाते की या रस्त्यावरून जाणारा प्रवासी हरीकडे म्हणजेच देवाकडे जातो यावरून सुद्धा याच नाव मगहर अस पडलं.
एक काळ असा होता की ही जागा बदनाम होती. याच्या मागे खूप साऱ्या अंधश्रद्धा होत्या. मनुष्यसुद्धा कमाल असतात नाही, भलेही जगताना ते नरकयातना भोगत असतील पण मृत्यूनंतर त्यांना स्वर्ग हवा असतो. इथे सुद्धा गोष्ट अशीच होती. इथे अशी अफवा पसरली होती की ज्याचा मृत्यू मगहरमध्ये होतो त्याला नरकात जावं लागत. किंवा त्याला गाढवाचा जन्म मिळतो.
फक्त हाच संत कबिरांचा उद्देश होता की ही अफवा आहे आणि ही अफवा आहे हे लोकांना पटावे म्हणून त्यांनी इथे आपले प्राण सोडणे पसंत केले. मगहर इथे आमी नदीजवळ एक गुहा आहे. या गुहेत बसून कबीर आपली ध्यानधारणा करत असत.
आता या जागेबद्दल बोलण्याआधी जरा कबिरांच्या जीवनाविषयी जाणून घेऊया.
जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही,
सब अँधियारा मिट गया, दीपक देखा माही.
संत कबीर असं म्हणतात की जोपर्यंत ते आपल्या अहंकारात बुडाले होते तोपर्यंत त्यांना देवाचे दर्शन होत नव्हते. पण जेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांच्यात ज्ञानाचा दिवा पेटवला तेव्हा त्यांच्यातील अज्ञानाचा अंधार संपून गेला. ज्ञानाच्या ज्योतीने मनातील अंधार नष्ट झाला व त्यांना देवाचे दर्शन व्हायला लागले.
विचार करा ते दृश्य किती मनोहारी असेल जेव्हा काशीच्या लहान लहान गल्ल्यांमध्ये कबीर रोज एका नवीन विचारांनी आपल्या जीवनाला नवीन रंग देत होते. काशीच्या मातीतल्या या संताने अवघ्या जगाला आपल्या संदेशातून शिकवण दिली.
कबिरांच्या जन्माविषयी तसा संभ्रम आहे. असं म्हणलं जातं की कबिरांचा जन्म काशीजवळच्या एका ब्राम्हण बाईच्या पोटी झाला होता पण ती त्यांना सोडून निघून गेली. या नंतर एका मुस्लिम परिवाराने त्यांना दत्तक घेतले कारण त्यांना अपत्य नव्हते. थोडं मोठं झाल्यावर आपल्या सुरुवातीच्या जीवनातच संत कबीर हे रामानंद यांचे शिष्य झाले. हे रामानंद म्हणजे तेच जे सांगायचे की ईश्वर सर्वत्र व माणसाच्या देहातच आहे.
संत कबीर नेहमी धार्मिक रुढीपरंपरांच्या विरोधात होते, त्यांचं असं म्हणणं होत की जीवात्मा व परमात्मा यांचं जेव्हा मिलन होते तेव्हाच माणसाला मोक्ष प्राप्त झालेला असतो.
संत कबिरांचे जीवन हे काही शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. त्यांनी देवाला शोधण्यासाठी इतरत्र भटकण्याऐवजी स्वतःच्या शरीरात देव शोधण्याची शिकवण दिली. हा संदेश देण्यासाठी ते काशीच्या गल्ल्यांमध्ये आपले दोहे गात फिरायचे व लोकांची मने जिंकायचे. तर ते काही लोकांच्या डोळ्यांत सुद्धा खटकायचे.
आपलं आयुष्य जगल्यानंतर ते या मगहर शहराच्या गल्ल्यांमध्ये पोहचले. तिथे जाऊन त्यांनी आपले उरलेले आयुष्य व्यतीत केले व पसरलेली अफवा नष्ट करण्यासाठी त्यांनी मगहर इथेच आपले प्राण सोडले.
कबिरांची खास गोष्ट ही होती की त्यांचे अनुयायी हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजातील होते. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा भांडण झाली. हिंदूंना कबिरांना अग्नी द्यायचा होता तर मुस्लिमांना त्यांना दफन करायचे होते. कबिरांच्या दोन शिष्यांत हे वाद झाले होते. त्यातला एक मगहरचा राजा होता तर दुसरा वाराणसीचा राजा होता.
यावेळी जवळजवळ युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अस म्हणलं जातं की यावेळी एक आवाज आला की त्यांच्या मृत शरीरावरची चादर काढली जावी. तिथे असलेले लोक अचंबित झाले, त्यांनी चादर काढून पहिली तर ते अवाक झाले.
कारण त्यावेळी चादरीखाली मृतदेह नसून फक्त फुले उरली होती. संत कबिरांनी आपल्या मृत्यूनंतरसुद्धा धर्मात भांडण होऊ दिली नाहीत. शेवटी तिथे असलेली फुले दोन्ही धर्मियांनी वाटून घेतली व नंतर हिंदू धर्मियांनी त्यांची समाधी बांधली तर मुस्लिमानी मजार बांधली आणि याच्यानंतर दोन्ही धर्मीय आपल्या पद्धतीने आराधना करू लागले.
मगहर येथील मजार व समाधीची जागा एकाच भिंतीने तयार झाली इथे हिंदू घंटी वाजवून फुले वाहून पूजा करतात तर शेजारी मुस्लिम चादर अर्पण करून नमस्कार करतात.
हे सगळं एवढं सुंदर आहे की हा लेख तुम्हाला मगहर पर्यंत नक्की घेऊन जाईल. तुम्हाला कुठे जायचा विचार असेल तर मगहर हे तुमच्या यादीत नक्की असुद्या. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या ठिकाणाला भेट दिली आहे. इथे ती शांती आहे, समृद्धी आहे, जी बऱ्याच लोकांच्या आयुष्यात नसते व ते यासाठी भटकत असतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.