आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
नुकताच राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडून गेला आहे. कोरोनाचे संकट मावळले नसल्याने ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात यासाठी अनेक मोठ्या नेत्यांकडून प्रयत्न केले गेले. पण एकवेळ विधानसभा, लोकसभा परवडली पण ग्रामपंचायतीत असणारी चुरस ही बघण्यासारखी असते. जवळचे भाऊ कधी दूर होतात तर कधी निवडणुकीत वर्षानुवर्षे दूर असलेले भाऊ एकत्र येतात.
एकंदर ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे पाच वर्षातून एकदा येणारी सर्व मागचेपुढचे हिशोब चुकते करण्याची संधी असेच समजले जाते. म्हणून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणे तसे सोपे काम नाही. महाराष्ट्रातील मोठमोठ्या विकसित ग्रामपंचायतींना आणि त्यांच्या सरपंचांना देखील ग्रामपंचायत बिनविरोध करता आलेली नाही यावरून ग्रामपंचायत हे काय प्रकरण असते याचा अंदाज येऊ शकतो.
कारण सोपं आहे, प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते, ती पूर्ण करण्याची संधी या निमित्ताने चालून आलेली असते. बिनविरोध करायचे म्हटले तर कुणाला तरी खाली बसणे भाग असते. पण महाराष्ट्रात एका ग्रामपंचायतीत 20 वर्ष सातत्याने पॅनल निवडून आणणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी म्हणून स्वतः माघार घेतली आहे.
हे विशेष वाटत असले तरी खरे आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नगाव ही 7 सदस्य असणारी छोटीशी ग्रामपंचायत. जवळपास 14 समाजांचे लोक या गावात आनंदाने राहत असतात. यावेळी निवडणूक लागली तसे सर्व इच्छुक तयारीला लागले. दोन्हीकडून पॅनल तयार होऊ लागले. मधूनच बिनविरोधचा आवाज देखील उठू लागला. दोन्ही पॅनलमधील जवळपास सर्व उमेदवार हे नवखे होते. अपवाद होता तो फक्त नगावचे माजी उपसरपंच युवराज पाटील यांचा! नवख्यांना संधी मिळावी अशी चर्चा सुरू झाली.
युवराज पाटील हे स्वतःच्या जिवावर गेली 20 वर्ष ग्राम पंचायतीत पॅनल निवडून आणत असल्याने यावेळी त्यांच्या पॅनलमधून सरपंच पदाचे उमेदवार तेच होते. युवराज पाटील यांनी माघार घेऊ नये म्हणून एका गटाचा आग्रह होता. तर आता नवख्याना संधी मिळावी असा एका गटाचा आग्रह होता. माघार घेण्याच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत ग्रामपंचायत बिनविरोध होईल की निवडणूक लागेल याबद्दल स्पष्टता नव्हती. शेवटी आपल्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून युवराज पाटलांनी स्वतः माघार घेत दोन्ही पॅनलमध्ये अडीच-अडीच वर्ष सरपंच पदाची वाटणी करत आपले सर्वात जवळचे मित्र रविंद्र पाटील यांच्या पत्नीला बिनविरोध करत त्यांच्याकडे स्वतःच्या पॅनलच्या वाट्याला येणारे सत्तेचे सर्व अधिकार सोपवले. विशेष म्हणजे या कामात त्यांना दोन्ही पॅनेलच्या सर्व नेत्यांचे सहकार्य लाभले. युवराज पाटलांनी माघार घेणे का विशेष आहे, हे थोडे फ्लॅशबॅकमध्ये गेल्याशिवाय समजू शकणार नाही.
2001 साली 27 वर्षीय युवराज पाटील यांना मित्रपरिवाराच्या आग्रहाने ग्रामपंचायतीच्या राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आपल्या वडिलांचा उमेदवारी अर्ज भरत प्रचारास सुरुवात केली. हा नवखा तरुण कितपत टिकेल अशी सर्वाना शंका होती पण निकालाच्या दिवशी चमत्कार झाला होता.
युवराज पाटील यांनी उभ्या केलेल्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवत सातच्या सात उमेदवार निवडून आले होते. त्यांचे नाव पूर्ण तालुक्यात गेले. पुढील पाच वर्ष त्यांनी इमानेइतबारे ग्रामपंचायत सांभाळली.
आजही महाराष्ट्रात अनेक गावांत रस्ते नाहीत. पण युवराज पाटलांनी 2003 साली संपूर्ण गावात काँक्रीटीकरण करत रस्ते आणले होते. आजही ते रस्ते अतिशय चांगल्या अवस्थेत आहेत. त्याचप्रमाणे गावात पाण्याची समस्या मिटावी म्हणून जागोजाग व्हॉल्व बसविण्याचे काम करण्यात आले.
2005 साली पुन्हा निवडणूक लागली यावेळी सरपंच पद आरक्षित होते. युवराज पाटलांना गावकऱ्यांनी बिनविरोध उपसरपंच केले. याहीवेळी त्यांनी सरपंच आणि सर्व गावकऱ्यांच्या सोबतीने व्यसनमुक्ती शिबिर घेणे, स्वछता अभियान राबविणे, जवाहर विहिरी मिळवून देणे, घरकुल मिळवून देणे असे उपक्रम राबवले. आज महाराष्ट्रात बचतगटांचे जाळे पसरलेले दिसत असले तरी 2005-06 च्या सुमारास त्यांनी गावात महिलांसाठी बचत सुरू केले होते. त्यांना बचत गटांचे महत्व त्याचवेळी कळून चुकले होते असे म्हणावे लागेल. युवकांसाठी आणि इतर वाचकांसाठी त्यांनी साने गुरुजी यांच्या नावाने वाचनालय देखील सुरू होते.
पुढे 2010 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचे पॅनल बहुमताने सत्तेत आले होते. 2015 साली देखील हीच पुनरावृत्ती झाली. यावेळी युवराज पाटील यांनी आपले काका भटू विश्राम पाटील यांना उपसरपंच केले. या काळात सर्व काही आनंदीआनंद होते अशातला भाग नाही. त्यांना विरोध सहन करावा लागला. अनेक सहकारी सोडून गेले. पण तरी देखील सातत्याने त्यांनी उभे केलेले पॅनल निवडून येत होते.
तरुण आणि जेष्ठ अशा दोन्ही वयातल्या लोकांसोबत चांगले नाते असल्याने त्यांनी यावेळी स्वतः उमेदवारी करावी असा सर्वांनी आग्रह धरला होता. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. पण सातत्याने वीस वर्षे अजिंक्य असून देखील माघार घेताना त्यांना कुठलाही कमीपणा वाटला नाही.
आजवर ज्या मित्राच्या जिवावर आपण अजिंक्य होतो, त्याच मित्राच्या पत्नीला सत्तेच्या स्थानी बसवत असल्याने मैत्रीच्या ऋणातून थोड्याफार प्रमाणात मुक्त होण्याचीच भावना त्यांच्या मनात होती. युवराज पाटील यांच्या उदाहरणातून वर्षानुवर्षे सत्तेच्या स्थानी चिकटून बसलेल्यांनी शिकवण घ्यायला हवी.
गावाच्या इतिहासात पॅनलच्या पॅनल निवडून आणणारा, एकवेळ बिनविरोध होणारा, तसेच सातत्याने वीस वर्ष अजिंक्य असलेला माणूस अहंकार न ठेवता आपल्या सहकाऱ्याकडे सत्तेचे हक्क सोपवू शकतो यावरून गावाची एकता आणि विकास याला प्राधान्य देणे हेच खरे राजकारण असते हे लोकांना समजले तरी पुरेसे म्हणायला हवे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.