आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
युद्ध हा विनाशाचा समानार्थी शब्द आहे. भारताचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा इतिहास हा अशा असंख्य युद्धकथांनी व्यापलेला आहे. शांततेच्या काळात जरी युद्ध साजरे केली जात असली तरी युद्धकाळात किड्या मुंग्यांप्रमाणे माणसं मरतात, तेव्हा माणुसकीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
जगाच्या इतिहासातील दोन सर्वात विनाशकारी महायुद्धे २० व्या शतकात घडून आली, या दोन्ही युद्धांमध्ये अपरिमित मनुष्यहानी झाली. शेकडो-हजारो-लाखो-कोट्यवधी लोक आपल्या प्राणांना मुकले. या युद्धांच्या कथा देखील तितक्याच हृदयद्रावक आहेत. या युद्धकथांपैकी एक कथा आहे फ्रान्समधील डंकर्कच्या तटावर अडकलेल्या लाखभर ब्रिटिश सैनिकांची….
१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. हिटलरच्या नाझी सैन्याने जर्मनीत आपले प्रभुत्व सिद्ध केल्यानंतर इतर देशांकडे कूच करायला सुरुवात केली. नाझी सैन्याने फ्रान्सच्या उत्तरेकडील भागावर आक्रमण केले.
१० मे १९४० ला त्यांनी पूर्ण ताकदीने बेल्जियम, हॉलंड आणि लक्झमबर्गवर हल्ला चढवला, तिथे असलेल्या डच सैन्याने नाझी जर्मनीसमोर नांगी टाकली. या विजयानंतर नाझी सैन्याचे मनोबल उंचावले.
नाझी सैन्याने फ्रान्सच्या सोमेमे नदीपर्यंतच्या क्षेत्रावर व बेल्जियमच्या अद्रेनेस क्षेत्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यावेळी ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्य एकत्रितपणे नाझी सैन्याचा सामना करत होते. परंतु ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्याचा नाझी सैन्यासमोर निभाव लागला नाही.
हळूहळू संपूर्ण उत्तर युरोपावर नाझी सैन्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
सतत युद्धात होणाऱ्या पिछेहाटीमुळे फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्य डंकर्कच्या समुद्रकिनाऱ्यावर अडकून पडले. बहुतांश जागांवर नाझी सैन्याने आपले निशाण फडकवले होते. तब्बल ३ लाख सैनिक डंकर्कच्या समुद्रकिनाऱ्यावर अडकले होते.
परिस्थिती चिघळत आहे हे बघून ब्रिटिश कमांडर लॉर्ड जॉन गार्ट यांनी या सैनिकांना मदत करण्यासाठी योजना आखायला सुरुवात केली. एकीकडे ही योजना आखली जात होती तर दुसरीकडे हर्मन गोरिंग हा नाझी नौदल अधिकारी हिटलरला पटवून देत होता की आपल्या लडाखु विमानांच्या सहाय्याने आपण डंकर्कच्या तटाची रक्षा करू शकतो, सैन्याची गरज नाही, सैन्य माघारी बोलवून ही तट सुरक्षित राखता येईल. हिटलरला त्याची कल्पना पटली व त्याने गोरिंगच्या योजनेला हिरवा कंदील दाखवला.
नाझी सैन्य गोरिंगच्या योजनेनुसार मागे हटायला सुरुवात झाली आणि बघता बघता फायटर जेट्स डंकर्कच्या किनाऱ्यावर घिरट्या घालू लागले. नाझी सैन्य मागे हटताना बघून ब्रिटीशांनी आपल्या अडकलेल्या सैनिकांना बाहेर काढण्यासाठी योजना आखायला सुरुवात केली. ‘ऑपरेशन डायनॅमो’ असे त्या योजनेचे नामकरण करण्यात आले.
२६ मे १९४० ला ऑपरेशन डायनॉमोला सुरुवात करण्यात आली. या संपूर्ण ऑपरेशनची कमांड अडमिरल बोल्टन रॅमसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या ऑपरेशनचे सर्वात मोठे आव्हान या लाखो सैनिकांना समुद्रापार करून ब्रिटनला कसे आणावे ही होती.
यावेळी ब्रिटीश सैन्याने जनतेकडे नौकेची मागणी केली. असंख्य लोकांनी आपल्या नौका सैन्याला मदत म्हणून दिल्या. या नौकांच्या बळावर ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली. शेकडो ब्रिटिश नौका समुद्रात आपल्या सैनिकांना परत आणण्यासाठी सरसावल्या.
हे मिशन योजनाबद्ध करण्याचे काम कॅप्टन विल्यम टेनेट यांनी केले होते. त्यांनी योजना आखताना सरळ डंकर्कच्या समुद्रकिनाऱ्यावर न जाता, जवळच्या पूर्वेकडील बंदरावर नौका घेऊन जायचे ठरवले. सुरक्षेच्या दृष्टीने हा फार महत्वपूर्ण निर्णय होता. यामुळे समुद्रकिनाऱ्यावर शत्रूच्या नजरेत न पडता सहजपणे शत्रूच्या तावडीतून ब्रिटिश सैनिकांना मुक्त करणे सहज होणार होते. अडकलेल्या ब्रिटिश सैनिकांना आता पुन्हा मातृभूमीच्या दिशेने प्रयाण करता येणार यामुळे आनंदाचे वातावरण होते.
परंतु, इतक्यात जर्मन सैन्याचे विमान तिथे पोहचले व त्यांनी आपल्या बॉम्बगोळ्यांनी नावा उध्वस्त करायला सुरुवात केली. त्यावेळी ब्रिटिश सैन्याने देखील आपल्या हवाई दलाच्या विमानांना डँकर्कच्या दिशेने पाठवले, ब्रिटिशांचा रॉयल एयर फोर्सने अत्यंत भेदक मारा करून नाझी हवाई दलाच्या विमानांना धाराशाही केले. यामुळे ऑपरेशन डायनॅमो यशस्वी ठरले.
तब्बल ३ लाख ३० हजार ब्रिटिश सैनिकांची डँकर्कच्या समुद्रकिनाऱ्यावरून यशस्वी सुटका करण्यात आली. पुढे याच सैनिकांनी नाझी जर्मनीचा पाडाव केला होता.
हे ऑपरेशन यशस्वी करण्यात ब्रिटिश सैन्य जरी यशस्वी झालं असलं तरी फ्रान्स, बेल्जियम यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नाझी जर्मनीने त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले कोट्यवधी लोक मारले गेले, लाखो परिवार रस्त्यावर आले, अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या. समाज उध्वस्त झाला.
हे युद्ध संपल्यानंतर देखील कित्येक वर्षे ह्या युद्धाच्या खुणा युरोपियन जनतेच्या मनावर कायम होत्या. या विनाशकारी युद्धाचा शेवट अणुबॉम्बने झाला ज्यात कोट्यवधी लोक मारले गेले.
युद्धात जिंकण्या-हरण्यापेक्षा जीवितहानीने होणाऱ्या प्रचंड नुकसानाचे वर्णन करणे अवघड होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.