आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आज घरोघरी संगणक किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठूनही आपण आपली कामे विना व्यत्यय सुरु ठेवू शकतो. पण, जेंव्हा संगणकाचा शोध लागला नव्हता भारतातील कार्यालयीन कामकाजाचा सगळा भार फक्त टाईपरायटरवरच होता. टाईपरायटरचा शोध लागल्यानंतर मात्र भारतीय कार्यालयीन कामकाजाचे स्वरूपच पालटून गेले. आधुनिक भारताची पायाभरणी करण्यात या टाईपरायटरचे योगदान समजून घ्यायला हवे.
संगणकाचा शोध लागलेला नसताना लेखक, पत्रकार, लिपिक, कारकून यांना आपले काम करणे किती जिकिरीचे गेले असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जेव्हा ही सगळी कामे हाताने केली जात तेव्हा त्या-त्या व्यक्तीवर त्या कामाचा किती ताण येत असेल नाही का?
आज संगणकामुळे कामात सुलभता आली आहे. थोडक्या कालावधीत कामाचा मोठा आवाका उरकता येतो. पण, संगणक युगाआधी टंकलेखन मशीननेही खूप मोठे योगदान दिले आहे.
टंकलेखनाचा काल इतिहासजमा झाला असला तरी, ज्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी होती अशा क्षेत्रात स्त्रियांनाही प्रवेश मिळवून देण्यात टंकलेखन मशीनने बरेच सहाय्य केले आहे. प्रत्येक अक्षरावर कमीअधिक जोर देत टाईप करताना ओळीच्या शेवटी टिंग टिंग वाजणाऱ्या बेलकडे लक्ष ठेवावे लागे.
प्रत्येक नवी ओळ टाईप करताना हाताने त्याचा सिल्व्हर बार मागे पुढे करावा लागे. आत्ता यातल्या बऱ्याच कटकटी संपल्या आहेत. संगणकावर आपण एक सलग टाईप करू शकतो. पण, टंकलेखन मशीनमुळे भारताचा इतिहासाला एक नवे वळण मिळाले हे मान्य करावेच लागेल.
या मशीनमुळे सरकारी कार्यालयातील रोजगार भरती वाढली. लेखनिकांच्या जागी टायपिस्टची भरती केली जाऊ लागली. शहराशहरात टायपिंग शिकवणाऱ्या संस्था वाढल्या. टंकलेखन मशीन दुरुस्त करून देणाऱ्या नव्या रोजगाराची निर्मिती झाली.
टायपिंग येत असेल तर सरकरी नोकरी मिळतेच अशी एक आश्वासकता निर्माण झाली. टायपिंगचे कौशल्य शिकलेल्या लोकांना एक वेगळीच ओळख मिळाली.
पत्रलेखन, याचिका, ॲफिडेव्हिट्स टाईप करून घेण्यासाठी टायपिस्टवर अवलंबून राहणाऱ्या लोकांची संख्या वाढली. मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर आपापले टाईपरायटर घेऊन बसलेले लोक आणि त्यांच्याकडून आपली कामे करवून घेण्यासाठी लागलेल्या भल्या मोठ्या रांगा हे तर अगदीच सामान्य चित्र होते.
रस्त्यावर टाईपरायटर ठेवून टायपिंग करून देण्यापासून अगदी कादंबरीकार, राजकरणी आणि पत्रकार यांच्याकडे टायपिस्ट म्हणून काम करण्यापर्यंत या क्षेत्रात अनेक संधी होत्या. टायपिस्ट म्हणजे त्या काळातील कौशल्य आणि शिक्षण यांचा एक आदर्श उदाहरण होते.
१९४० पर्यंत भारतात वापरण्यात येणारे अनेक टाईपरायटर हे परदेशातून आयात केले जात. अमेरिकन बनावटीचे ‘रेमिंग्टन अँड सन्स’ तसेच ‘हमोंड’ या कंपन्यांचे टाईपरायटर विशेष लोकप्रिय होते. कधी कधी डीलर्स या मशीन्सचे वेगवेगळे पार्ट आयात करून त्यांची जोडणी भारतात करत असत.
रेमिंग्टनने पहिल्यांदा मराठी, गुजराती, देवनागरी, उर्दू, अरेबिक, आणि गुरुमुखी अशा वेगवेगळ्या भारतीय भाषांतील टाईपरायटर उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. विविध सरकारी विभागातून अशा टाईपरायटर्सची मागणीही वाढली.
टाईपरायटरचा उपयोग फक्त अक्षरी मजकूर टाईप करण्यासाठी होत असे का? नाही!
त्याकाळी चंद्रकांत भिडे हे वेगवेगळ्या नेत्यांची आणि कलाकारांचे पोर्ट्रेट बनवायचे. त्यासाठी ते ब्रश आणि कॅनव्हास ऐवजी त्यांच्या कार्यालयातील टाईपरायटरचा वापर करत असत. अगदी सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर आणि अगदी आर. के. लक्ष्मण यांचे पोर्ट्रेट देखील त्यांनी टाईप रायटर वापरूनच तयार केले.
याबद्दल भिडे सांगतात, “एकदा ऑफिसमध्ये बॉसनी ऑफिसमधील इंटरकॉम नंबरची यादी बनवून मागितली. ती यादी तयार करताना मी ती टेलिफोनच्या आकारातच टाईप केली. तेंव्हा मी ठरवले की या क्षेत्रात मी कलाकारी करू शकतो.”
भिडे यांनी त्यांच्या निवृत्तीच्या वेळी, ऑफिसमध्ये ते वापरत असलेले हेल्डा टाईपरायटर विकत देण्याची विनंती केली. पण, कार्यालयीन वस्तू अशी विकत येत नसल्याचे कारण देत, त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती मान्य करण्यास नकार दिला.
पण, त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमावेळी त्यांच्या चेअरमनने त्यांना हेल्डा कंपनीचा दुसरा टाईप रायटर भेट म्हणून दिला. तेंव्हापासून ते आजतागायत हा टाईप रायटर भिडे कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनून राहिला आहे.
टाईप रायटरने फक्त भिडे कुटुंबियांवरच मोहिनी केली होती असे नव्हे तर, सुशिक्षित तरुणही स्वत:कडे टाईप रायटर असणे प्रतिष्ठेचे समजत असत.
भारतात गोदरेजने पहिल्यांदा टाईपरायटर बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला कंपनीला या मशीनचे काही भाग आयात करावे लागत. संपूर्ण मशीन भारतातच बनवून तयार करण्याला एक दशकाचा कालावधी उलटावा लागला.
अगदी १९४७ मध्येच भारतात पूर्णतः स्वदेशी बनवटीचे टाईप रायटर बनवले जाऊ लागले. तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी ही मशीन म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले प्रतिक आहे असेही म्हटले होते.
भारतात टाईप रायटर बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे ही एक फार मोठी उपलब्धी होती. खुद्द गोदरेजच्या वेबसाईटवरही हा अनुभव शेअर करण्यात आला आहे. भारतात त्याकाळी संरक्षण विभागापासून ते अनेक सरकारी कार्यालयात टाईपरायटर मशीनला प्रचंड मागणी होती.
गोदरेजने हळूहळू या क्षेत्रातील परदेशी कंपन्यांचे वर्चस्व संपुष्टात आणले. नंतर श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, अंगोला अशा देशातही गोदरेजचे टाईपरायटर निर्यात केले जाऊ लागले.
२०००नंतर हळूहळू संगणकाची भारतात एन्ट्री व्हायला लागली आणि टाईपरायटर मागे पडत गेला. याचा परिणाम असा झाला की गोदरेज सोडून इतर सगळ्या कंपन्यांनी टाईपरायटरचे उत्पादन बंद केले.
शेवटी २०११ साली गोदरेजनेही तब्बल १२००० रुपयांना आपला शेवटचा टाईपरायटर विकून कारखाना बंद केला.
आज टाईपरायटर इतिहासजमा झाले असले तरी, कॅलिफोर्निया स्थित एका इंजिनीअरने आधुनिक भारताची पायाभरणी करणाऱ्या या मशीनची आठवण म्हणून गोदरेजच्या वेगवेगळ्या टाईपरायटरचे भाग एकत्र करून कमळाची प्रतिकृती बनवली आहे.
गोदरेजच्या टाईपरायटर बनवल्या जाणाऱ्या कार्यालयाचे रुपांतर आज फ्रीज मन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये करण्यात आले असले तरी, टाईपरायटर युगाची आठवण म्हणून त्यांनी ही १३ फुटाची प्रतिकृती त्याठिकाणी स्थापन केली आहे.
टाईपरायटरचा सुवर्णकाळ संपला असला तरी, आजही ही प्रतिकृती त्या काळाचे प्रतिनिधित्व करत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.