आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
चीन आणि भारत यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. भारत आणि चीन दरम्यान दोनदा युद्धही झाले आहे. तरीही चीन सातत्याने भारताची कुरापत काढत असतो. जगात महासत्ता अशी प्रतिमा बनवण्यासाठी आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करणे हा तर चीनचा आवडता छंद आहे. भारताच्या सीमेवरही चीनी सैनिक सतत आक्रमक कारवाया करत असतात.
चीनची आक्रमकता आणि विस्तारवादी भुमिका जगजाहीर आहे. चीन आणि भारतातील सीमावाद आजही चिघळलेला आहे. यावरून वातावरण प्रचंड तापलेले आहे. चीनने केलेल्या आक्रमणामुळे भारतात चीनविरोधी वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यावर चीनी मालावर बहिष्कार, चीनी ऍपवर बहिष्कार अशीही अनोख्या पद्धतीने आंदोलने करण्यात आली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारताविरोधात कटकारस्थान करणाऱ्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय गेल्या स्वातंत्र्यदिनी व्यक्त केला. भारतीय सीमेवर जर काही गैरवर्तन होत असेल, आगळीक होत असेल तर अशा घटना आता भारत सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
याआधी १९६७ सालीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे संसदेत खासदार होते. त्यांनी चीनविरोधात एक अनोखे आंदोलन केले. यामुळे तर चीन आणखीनच संतापला.
१९६७ साली चीनने भारतीय सैनिकांवर चोरीचा आरोप लावला. भारतीय सैनिकांनी चीनच्या ८०० मेंढ्या आणि ५९ याक चोरल्याचा बिनबुडाचा आणि अर्थहीन आरोप चीनने केला होता.
चीनच्या या आरोपात काहीही तथ्य नव्हते. या हास्यास्पद आरोपावर अटलजींनी असेच विनोदी अंगाने उत्तर दिले.
अटलजींचे हे उत्तर मात्र चीनला चांगलेच झोंबले होते. अटलजींनी चीनला या अनोख्या आंदोलनातून चांगलीच अद्दल घडवली. या आंदोलनामुळे आपलेच हसे झाल्याचे पाहून चीनचा तिळपापड झाला होता.
तीन वर्षापूर्वीच भारताचा चीनने पराभव केला होता. चीनला वाटत होते, याही वेळी भारतावर आपण सहज मात करू. भारताची कुरापत काढण्यासाठी चीनला काहीना काही कारण हवे होतेच. तेंव्हा चीनचा सिक्कीमवर डोळा होता. त्याला सिक्कीमवर कब्जा मिळवायचा होता. सिक्कीम भारताच्या सुरक्षा कक्षेत येणारे राज्य होते. पण, त्यावेळी सिक्कीम भारताचा भाग नव्हता.
१९६७ साली चीनशी युद्ध केल्यानंतर इंदिरा गांधींनी हे छोटेसे राज्य चीनपासून आपले संरक्षण करू शकणार नाही, याची खात्री पटल्याने सिक्कीमला भारताशी जोडून घेतले. १९६७ साली भारतीय सैनिकांनी चीनला चांगलीच धूळ चारली होती.
अटलजींच्या या अनोख्या आंदोलनाने लालबुंद झालेल्या चीनने भारत सरकारला एक पत्र पाठवले. या पत्रात चीनने आरोप केला होता की, भारतीय सैनिकांनी चीनच्या ८०० मेंढ्या आणि ५९ याक चोरले आहेत. भारत सरकारने हे आरोप फेटाळून लावले.
यावर जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी एक अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाने चीन चांगलाच चिडला होता. या आंदोलना आडून भारताने चीनची चांगलीच खिल्ली उडवली होती. चीनचे साऱ्या जगासमोर हसे झाले होते. खरे तर चीनने अशा प्रकारे भारतावर अर्थहीन आरोप करण्यामागचे कारण वेगळेच होते.
चीन आपल्या सर्वच शेजारी राष्ट्रांवर वरचष्मा राखू पाहतो. इतर देशात आणि तिथल्या कारभारातही चीनचा हस्तक्षेप असतो. हे छोटे देश चीनची ही दादागिरी सहन करतात. चीनने तिबेटी नागरिकांवर केलेले अत्याचार लपून राहिलेले नाहीत.
चीनच्या तावडीतून सुटलेले तिबेटी नागरिक भारताच्या आश्रयाला येत होते. या नागरिकांना भारत आश्रय देत असल्याची बाब चीनला अजिबात पटली नव्हती. त्यामुळे दुखावलेल्या चीनला भारताला धडा शिकवायचा होता.
अटलजींनी ८०० मेंढ्या जमवल्या. या ८०० मेंढ्या घेऊन ते सरळ दिल्लीतील चीनी दूतावासासमोर जाऊन उभे राहिले. या मेंढ्यासोबत काही फलकही होते. ज्यावर लिहिले होते, “मुझे खा लो, लेकीन दुनिया बचालो.” अटलजींच्या या आंदोलनाने चीनचा चांगलाच पारा चढला.
चीनने तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांना आणखी एक पत्र लिहिले. यावेळी त्यांचा आरोप असा होता की अटल बिहारी वाजपेयींनी चीनचा अपमान केला आहे. भारताचे नागरिक चीनचा अपमान करत आहेत आणि भारत सरकार या नागरिकांना पाठीशी घालत आहे, असा आरोप चीनने केला.
भारतानेही यावर जशास तसे उत्तर पाठवले. भारताने लिहिले की, काही भारतीय नागरिकांनी ८०० मेंढ्या घेऊन चीनी दूतावासासमोर आंदोलन केले ही गोष्ट खरी आहे. परंतु या आंदोलनात सरकारची कसलीच भूमिका नव्हती.
चीनने भारताला युद्धाची धमकी दिली त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. भारतीय नागरिकांना शांतता हवी आहे, त्याच हेतूने आणि सद्भावनेने हे आंदोलन करण्यात आले.
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, भारताने तीन तिबेटी नागरिकांना भारतात आसरा दिला होता. यावर चीनने असा आरोप केला की, भारताने तीन तिबेटी नागरिकांना कैद केले आहे. यावर भारताने उत्तर दिले, इतर तिबेटी शरणार्थीप्रमाणेच हे नागरिक देखील शरणार्थी म्हणून भारतात आले आहेत.
ते इथे स्वतःच्या इच्छेने आले आहेत. त्यांना जेंव्हा वाटेल तेंव्हा ते तिबेटला परत जाऊ शकतात. हे शरणार्थी देखील इतर अनेक शरणार्थ्याच्याप्रमाणेच विनापरवानगी भारतात घुसले होते. या तीन नागरिकांमध्ये दोन महिलादेखील होत्या.
या तिबेटी नागरिकांनी भारतात येऊन भारतीय पोलिसांत चीनी अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली होती. हे चीनी अधिकारी आणि त्यांचे सैनिक कसे अत्याचार करत याबद्दलही या तीन नागरिकांनी सर्व हकीकत भारतीय पोलिसांत सांगितली होती. चीनने भारतात आलेल्या सर्व तिबेटी नागरिकांना चीनच्या हवाली करण्याची धमकीही दिली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.