आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
पंजाबमध्ये वेगळ्या खलिस्तानच्या मागणीला जोर चढला होता. या खलिस्तानी अतिरेक्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आसरा घेतला. अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची मोहीम आखण्यात आली. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या कार्यवाहीत अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. ऑपरेशन ब्ल्यू स्टारमुळे अतिरेक्यांना चांगला धडा मिळेल अशी अपेक्षा होती पण झाले उलटेच!
ऑपरेशन ब्ल्यू स्टार या जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मोहिमेमुळे शिख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. या मोहिमेला पाठींबा देणारे कॉंग्रेस नेते, याची पाठराखण करणारे राजकारणी, या मोहिमेची अंमलबजावणी करणारे जनरल अरुण कुमार वैद्य आणि लष्कराला ही मोहीम राबवण्याचा आदेश देणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी, सगळ्यांनाच याची मोठी किंमत चुकवावी लागली. जनरल अरुण कुमार वैद्य हे भारताचे पहिले असे लष्कर प्रमुख आहेत ज्यांची दहशतवाद्यांनी हत्या घडवून आणली.
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार”सारखी महत्वाकांक्षी मोहीम राबवणाऱ्या जनरल वैद्य यांच्या प्रेरक आणि थरारक प्रवास जाणून घेऊया या लेखातून.
अरुण वैद्य हे मुळचे मुंबईचे. घरी लष्करी सेवेचा वारसा असलेले अरुणकुमार १९४४मध्ये सैन्यात दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात अनेक भारतीय जवानांनी जगाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली, अरुणकुमार वैद्यही याला अपवाद नव्हते.
दुसऱ्या महायुद्धातील बर्मा विरुद्धची लढाई खूपच प्रसिद्ध आहे. या युद्धात अरुणकुमार यांनीही आपले योगदान दिले होते. भारत-पाक दरम्यानच्या १९७५ सालच्या युद्धात ते भारताच्या सशस्त्र तुकडीचे प्रमुख होते.
‘बॅटल ऑफ चायवाला’ हे आशिया खंडात लढल्या गेलेल्या युद्धापैकी एक मोठे युद्ध होते. या युद्धातही अरुण कुमार वैद्य सहभागी होते. त्यांना दोन वेळा महावीर चक्र या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८३ साली ते भारताचे लष्कर प्रमुख म्हणून निवडले गेले. याच काळात पंजाबमध्ये खलिस्तानवादी अतिरेक्यांच्या हिंसक कारवायांनी उच्छाद मांडला होता.
अमृतसरचे सुवर्ण मंदिर हे शिखांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र स्थळ. याच सुवर्ण मंदिरात या अतिरेक्यांनी आसरा घेतला. मोठ्या संख्येने अतिरेकी सुवर्ण मंदिरात जमा झाले होते. या अतिरेक्यांचे नेतृत्व करणारे भिंद्रनवालेही या अतिरेक्यासोबत सुवर्ण मंदिरातच उपस्थित होता. भिंद्रनवालेचा काटा काढून खलिस्तानवादी चळवळ खिळखिळी करणे हा सरकारचा मुख्य उद्देश होता.
या अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी लष्कराने ऑपरेशन ब्ल्यू स्टार नावाची मोहीम आखली. ३ जून ते ६ जून १९८४ तीन दिवस ही मोहीम सुरु होती.
अतिरेक्यांना शरण येण्याचे आवाहन करूनही फरक पडला नाही तेव्हा मंदिरात घुसून आत बसलेल्या अतिरेक्यांवर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. दोन्ही बाजूंनी गोळ्यांचा भडिमार सुरु होता. संपूर्ण सुवर्ण मंदिर रक्तात न्हाऊन निघाले होते.
लष्कराच्या या मोहिमेत अनेक अतिरेकी आणि त्यांचा म्होरक्या भिंद्रनवाले या मोहिमेत मारला गेला. हेच ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे यश मानण्यात आले. पण, यानंतर परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी चिघळतच गेली.
वेगळ्या पंजाबच्या मागणीला पाठींबा देणारे अनेक शीख भारतात आणि भारताबेहरही उपस्थित होते. या ऑपरेशनमध्ये शिखांच्या पवित्र स्थळाचे नुकसान झाले होते. अकाली दलाला हानी पोहोचली होती त्यामुळेच शीख समुदायाच्या सरकारविरोधी भावना आणखीनच तीव्र झाल्या. त्यानंतर शिखांचा जो देशभर आकांडतांडव दिसून आला तो कधीच विसरला जाणार नाही असा होता. ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही एक अशी मोहीम होती जी यशस्वी होऊनही अयशस्वी ठरली असे म्हणावे लागेल. कारण त्याचे पडसाद दीर्घकाळ उमटले होते.
भारतीय लष्कराने केलेल्या या कृत्याचा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही अशी शपथच या खलिस्तानी अतिरेक्यांनी घेतली. याचाच भाग म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची करण्यात आलेली हत्या. इंदिराजींचे अंगरक्षक हे शीखच होते, याच अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
इंदिराजींनंतर याच कडीतील दुसरी हत्या होती जनरल अरुणकुमार वैद्य यांची.
खलिस्तानी अतिरेक्यांकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या सुचना त्यांनाही मिळत होत्या. पण, त्यांनी कधीच या धमक्यांना भीक घातली नाही. खलिस्तानवाद्यांकडून त्याच्या जीवाला धोका आहे हे सरकारलाही माहीत होते तरीही अरुणकुमार वैद्य यांच्या सुरक्षेसाठी फक्त एक हवालदार त्यांच्यासोबत तैनात करण्यात आला होता.
लष्करातून निवृत्त झाल्यानंतर अरुणकुमार आपल्या कुटुंबासह पुण्यात स्थायिक झाले. १० ऑगस्ट रोजी १९८६ रोजी आपल्या पत्नीसोबत ते बाजारात खरेदी करण्यासाठी गेले होते. आपल्या कारमधून घरी परतत असतानाच अचानक त्याच्या गाडीसमोर एक दुचाकी येऊन उभी राहिली. या दुचाकीवर दोन तरुण बसले होते. त्यातील मागच्या तरुणाने त्यांच्यावर बरोबर नेम साधला. जनरलअरुण कुमार यांच्यावर नऊ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
जोपर्यंत ते धाराशायी होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर गोळीबार सुरूच राहिला. त्यांच्या गळ्यावर आणि छातीवर एकूण नऊ गोळ्या लागल्या होत्या.
त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नीही होत्या. त्याही या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या.
स्वातंत्र्य भारतात एका लष्करप्रमुखाची अशा प्रकारे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हत्या होण्याची ही पहिलीच घटना होती. अरुणकुमार यांच्या हत्या करणाऱ्या त्या दोन तरुणांचे नाव होते जिंदा आणि सुखा.
अरुणकुमार यांची हत्या करून हे दोघेही मारेकरी पसार झाले. पोलिसांनी प्रयत्न करूनही या दोघांचा काहीच मागमूस लागत नव्हता. अरुण कुमार यांच्या हत्येनंतर दोघेही एका बँक लुट प्रकरणात पोलिसांच्या हाती सापडले. ९ ऑक्टोबर १९९२ मध्ये दोघांनाही पुण्यातील येरवडा जेलमध्ये फासावर लटकवण्यात आले.
जिंदा आणि सुखा दोघेही अतिरेकी शीख ऑर्गनायझेशन खलिस्तान कमांडो फोर्स (KCF) चे सदस्य होते. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या या संघटनेचे सदस्य या नात्याने या दोघांनी अनेक हिंसक कारवायात सहभाग घेतला. दोघांवरही अनेक आरोपाखाली गुन्हे दाखल झालेले होते.
हरजिंदर म्हणजेच ‘जिंदा’ हा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा होता. ऑपरेशन ब्ल्यू स्टार पार पडले तेव्हा जिंदा कॉलेजमध्ये शिकत होता, पण या ऑपरेशन नंतर त्याने शिक्षण सोडले आणि तो खलिस्तानी अतिरेक्यांना सामील झाला. सुखदेव सिंह म्हणजेच ‘सुखा’ हा राजस्थानचा होता. त्याचे आईवडीलही शेतकरीच होते. ‘ब्ल्यू स्टार’नंतर तोही खलिस्तानी अतिरेक्यांच्या गटात सामील झाला.
या दोघांनी फक्त अरुणकुमार वैद्य यांचीच हत्या केली असे नाही तर कॉंग्रेसच्या इतर दोन वरिष्ठ नेत्यांवरही यांनी सूड उगवला होता.
स्वतंत्र खलिस्तानची मागणी आता मागे पडली असली तरी या अतिरेकी चळवळीने दिलेले घाव कधीच पुसले जाणार नाहीत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.