आमिर खानचा ‘लगान’ चित्रपट प्रत्येकालाच आठवत असेल. आमिरचा ‘छूके दौर कचरा’ हा डायलॉग तर अगदी गल्लीतली पोरं देखील गमतीनं वापरतात. क्रिकेट हा त्याकाळी ब्रिटिशांचा खेळ होता. भारतीय त्यापासून अनभिज्ञ होते. कर माफ व्हावा म्हणून आमिर खान आणि त्याचे मित्र ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यास तयार होतात, अशी गोष्ट चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलं. याकाळात त्यांनी भारतीयांचे अतोनात हाल केले मात्र, काही अशा गोष्टीही आहेत ज्या केवळ ब्रिटिशांमुळे भारतीयांना माहिती झाल्या. ‘क्रिकेट’ त्यापैकीच एक! ब्रिटिशांकडून शिकूनच हळूहळू भारतीयांनीदेखील क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आता क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ झालाय. इतकंच काय क्रिकेटला आपल्याकडे धर्म मानलं जातं.
जसं क्रिकेट आपण ब्रिटिशांकडून शिकलो तसंच आपण आपल्या क्रिकेट बोर्डाचा लोगोदेखील त्यांच्याकडूनच घेतलेला आहे. आश्चर्य वाटलं ना!
लोगोचा इतिहास जाणून घेण्याअगोदर आपण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ब्रिटिश काळात भारतात क्रिकेट नियंत्रणासाठी केंद्रीय प्रशासकीय संस्था नव्हती. युनायटेड प्रांत, दिल्ली, पंजाब, बडोदा, मध्य भारत, कलकत्ता आणि इतर बर्याच संघांनी त्यांचे स्वतःचे क्रिकेट क्लब तयार केले होते. पटियालाचे महाराज स्वत: क्रिकेट खेळाडू होते. त्यामुळे ‘इंपेरियल क्रिकेट कॉन्फरन्स'(आताची आयसीसी)मध्ये भारताचा एक संघ सामील व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्याच प्रयत्नांतून १९२८ ला भारतात क्रिकेट बोर्डाची स्थापना झाली.
तेव्हापासून आजतागायत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत ती येते. डिसेंबर १९२८ मध्ये ‘तामिळनाडू सोयायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट’ अंतर्गत नोंदणीकृत संस्था म्हणून क्रिकेट मंडळाची स्थापना केली गेली. ग्रॅन्ट गोवन हे पहिले अध्यक्ष होते तर अँथनी डी मेलो हे त्याचे पहिले सचिव होते. बीसीसीआय ही राज्य क्रिकेट संघटनांचं शिखर मंडळ आहे. प्रत्येक राज्यातील क्रिकेट संघटना त्यांचे प्रतिनिधी निवडतात आणि यांच्यातूनच बीसीसीआय प्रमुखाची निवड होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियम हे बीसीसीआयचं मुख्यालय आहे. बीसीसीआयची स्वतःची राज्यघटना आहे. त्यात खेळाडू व प्रशासकांसाठी नियम व मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे(आयसीस)वर त्याचा मोठा प्रभाव आहे. कुठल्याही खर्चासाठी आणि निधीसाठी बीसीसीआय केंद्र सरकारवर अवलंबून नाही. त्यांची स्वत:ची आर्थिक गणिते आहेत. २०१९-२० या आर्थिक वर्षात बीसीसीआयची अंदाजे कमाई ३ हजार ७३० कोटी रुपयांपेक्षाही जास्त होती. एकट्या इंडियन प्रिमीयर लीगमधूनच त्यांना २ हजार ५०० कोटी रुपयांचे मिळाले होते. ९५० कोटी रुपये आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून तर, ३८० कोटी रुपये आयसीसीमध्ये असेलेल्या भागीदारीमधून मिळाले होते.
सर्वात श्रींमत आणि स्वायत्ता संस्था असलेल्या बीसीआयचा ‘लोगो’ मात्र, भारतीय कल्पनेतून तयार झालेला नाही. ‘लोगो’ ही कुठल्याही संस्थेची पहिली ओळख असते. त्या विशिष्ट गोष्टीवरून संपूर्ण संस्था ओळखली जाते.
बीसीसीआयचा लोगो ‘ऑर्डर ऑफ स्टार ऑफ इंडिया’ या पुरस्काराच्या चिन्हावरून बनवण्यात आला आहे. हे चिन्ह भारतातील वसाहत काळात ब्रिटीशांचे राज चिन्ह होते.
‘ऑर्डर ऑफ स्टार ऑफ इंडिया’ हा पुरस्कार महाराणी व्हिक्टोरियानं १८६१पासून सुरू केला होता. १८५७ च्या उठावा दरम्यान जे भारतीय राजे राणीशी एकनिष्ठ राहिले त्यांना खूश करण्यासाठी हा पुरस्कार होता.
राणी व्हिक्टोरियानं सुरू केलेला हा पुरस्कार सर्वात मानाचा समजला जाई. तीन गटांमध्ये त्याची वर्गवारी करण्यात आलेली होती. नाईट ग्रँड कमांडर, नाईट कमांडर आणि कम्पॅनिअन, असे तीन गट होते. अंडाकृती सोन्याच्या आकारात राणी व्हिक्टोरियाचा पुतळा कोरला आहे. त्याच्या बाजूने फिकट निळ्या रंगावर हिऱ्यांनी ‘हेव्हन्स लाइट अवर गाईड’ हे ब्रिदवाक्य लिहिले होते आणि त्याला निळ्या-पांढऱ्या रंगाची रिबिन लावण्यात आली होती. या पुरस्काराचं मानचिन्ह ब्रिटिश व्हाईसरॉयच्या भारतातील झेंड्यावर देखील दिसते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा पुसस्कार बंद करण्यात आला. महाराजा अलवार हे या पुरस्काराचे शेवटचे मानकरी होते. २००९मध्ये त्यांचे निधन झाले.
जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर लक्षात येईल की, भारतीय क्रिकेटपटूंच्या जर्सीवर असेलेल्या बीसीसीआय लोगोच्या वर तीन तारे आहेत. असे तारे ‘ऑर्डर ऑफ स्टार ऑफ इंडिया’ पुरस्काराच्या मानचिन्हावर होते. याशिवाय लोगोचा आकार आणि डिझाईन देखील या मानचिन्हाशी कमालीची मिळती जुळती आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा लोगो बदलता आला असता मात्र, तसे केले नाही. याबाबत केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ), क्रीडा आणि कायदा मंत्रालयाकडे विचारणाही केली आहे. तिरंगा किंवा अशोक चक्रावरील चार सिंह लोगोमध्ये वापरता येतील.
ब्रिटिशांच्या राजचिन्हाशी साधर्म्य असणारा लोगो वापरणे म्हणजे त्यांच्याच देशाचे प्रतिनिधित्व केल्यासारखे आहे, असेही आयोगाने म्हटले आहे. याशिवाय, देशातील सर्व संस्था माहिती अधिकाराच्या अखत्यारित आणलेल्या असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अद्याप याच्या बाहेर का ठेवले आहे? असा प्रश्न देखील माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाकडे उपस्थित करून त्याबाबत स्पष्टीकरण मागितलेले होते. मात्र, अद्याप याबाबतीत कुठलाच निर्णय झालेला नाही.
परदेशी असलेला क्रिकेट हा खेळ आत्मसात करून सध्या भारत त्यात वर्चस्व गाजवत आहे. काळाच्या ओघात खेळाच्या नियमांमध्ये, जर्सीमध्ये अनेकदा बदल झाले. ब्रिटिशांनी दिलेला लोगो मात्र, आजही जपून ठेवण्यात आलाय.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.