आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जायफळ हे स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचे व्यंजन. फिल्टर कॉफी करायची असेल तर जायफळाची पूड घालतात, पुरणपोळीच्या पुरणात किंचित जायफळ घातले तरी तिचा स्वाद दसपटीने वाढतो. एवढेच नाही तर डोकेदुखी, पोटदुखी या विकारांवरही जायफळ उपयुक्त आहे. त्यामुळे त्याला आजीच्या बटव्यात देखील स्थान आहे.
आशियाच्या पूर्वेस असलेल्या मोल्यूका बेटात फार पूर्वीपासून जायफळाची लागवड केली जात असून ते त्यांचे मूलस्थान आहे. आता दोन्ही गोलार्धांतील उष्ण कटिबंधीय देशांत त्यांची लागवड करतात. मलायात मोठी लागवड आहे. भारतात तमिळनाडू राज्यात (निलगिरी, कोईमतूर, सालेम, तिनेवेल्ली, मदुराई, कन्याकुमारी इ. जिल्ह्यांत) लागवड केलेली आहे. गरम व ओलसर हवा जायफळाच्या लागवडीसाठी अनुकूल मानली जाते म्हणून अशा ठिकाणी शास्त्रीय उद्यानात आणि कोकण, कारवार, केरळ व आसाम येथेही जायफळाची झाडे लावलेली आढळतात.
कॉफी, चहा, नारळ, सुपारी व रबर यांच्या मळ्यांत जायफळ मिश्रपीक म्हणून लावतात. पण जायफळाला इतिहासात एका तहाच्या वेळी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते, हे तुम्हाला माहिती आहे का? केवळ जायफळाच्या हव्यासापोटी मॅनहॅटनसारखे उपनगर डचांनी ब्रिटिशांना देऊन टाकले होते. त्याचीच ही रंजक गोष्ट.
मॅनहॅटन हा न्यूयॉर्कमधला एक गजबजलेला परिसर. पण या मॅनहॅटनचा इतिहास हा बराच गुंतागुंतीचा आणि मालमसाला असलेला असा आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ही गोष्ट त्या काळातील आहे, जेव्हा युएस म्हणजेच अमेरिका छोट्या-छोट्या वसाहतींच्या स्वरूपात अस्तित्वात होती. या वसाहतींना न्यू इंग्लंड असे म्हटले जात असे. या वसाहती, तसेच त्यांनी व्यापलेला भूभाग या सगळ्याचा मोह केवळ ब्रिटिशांनाच होता असे नाही तर डच लोक देखील या सत्तास्पर्धेत सहभागी होऊ पाहात होते.
जेव्हा ब्रिटिश लोक व्हर्जिनिया, मॅसेच्युसेट्स यासारख्या ठिकाणी आपली मुळे रुजवू पाहात होते, त्याच वेळी आज न्यूयॉर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी एक वसाहत आकार घेत होती. त्या वसाहतीला न्यू नेदरलँड्स असे नाव होते. ही प्रामुख्याने डच लोकांची वसाहत होती आणि न्यू ॲम्स्टरडॅम ही या वसाहतीची राजधानी होती. हे न्यू ॲम्स्टरडॅम मॅनहॅटन नावाच्या बेटाच्या दक्षिण टोकापाशी वसलेले होते.
मॅनहॅटन हे न्यूयॉर्कच्या अतिशय प्रसिद्ध पाच परगण्यांपैकी एक होते. डच लोकांची ही वसाहत स्थापन झाली आणि ब्रिटिशांच्या पोटात दुखू लागले. साहजिकच आहे; साम्राज्यविस्तार आणि सत्तास्पर्धेच्या या खेळात त्यांना इतर कोणीही नाक खुपसायला नको होते. त्यामुळे १६६४ मध्ये न्यू नेदरलँड्समध्ये चार ब्रिटिश जहाजे उतरली आणि न्यू नेदरलँड्सला शरण येण्यास सांगितले. विशेष म्हणजे डचांनी काहीही प्रतिकार केला नाही. एकही गोळी न झाडता, रक्ताचा एकही थेंब न सांडता ते शरण आले आणि ब्रिटिशांनी या वसाहतीचे न्यूयॉर्क असे नामकरण केले.
मात्र तिकडे नेदरलँड्समध्ये न्यू नेदरलँड्सचा अशा प्रकारे झालेला पाडाव चांगलाच जिव्हारी लागला. त्यातून दुसरे अँग्लो-डच यु*द्ध सुरू झाले. तसे पाहता १६५० ते १७८० या काळात डच आणि ब्रिटिश यांच्यात अधूनमधून भडके उडत होते. युरोप आणि उर्वरित जग यांच्यामध्ये असलेल्या सागरी मार्गांवर वर्चस्व प्रस्थापित करणे ही इंग्लंड आणि डच रिपब्लिक दोघांचीही महत्त्वाकांक्षा होती. ही महत्त्वाकांक्षा हेच त्यांच्यातल्या संघर्षाचे मूळ कारण होते. दुसरे अँग्लो डच यु*द्ध दोन वर्षे चालले. त्यामध्ये दोन्ही बाजूंकडील ५२ जहाजांचे नुकसान झाले आणि १२००० पेक्षा जास्त सैनिक कामी आले.
या यु*द्धाचा शेवट ब्रेडा कराराने झाला या करारान्वये मॅनहॅटन बेटाचा ताबा ब्रिटिशांकडे आला. त्याच्या बदल्यात दक्षिण पॅसिफिक समुद्रातील रून हे बेट डचांच्या स्वाधीन करण्यात आले. हे रून बेट आजच्या इंडोनेशियाच्या पश्चिमेला आहे मॅनहॅटन बेटापेक्षा भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या पूर्णतः वेगळे आहे. परंतु या बेटावर एक खास गोष्ट होती ती म्हणजे या बेटावरील जायफळाची लागवड!
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार हा जगाच्या अर्थव्यवस्थेला वळण देणारा निर्णायक घटक होता. आज मसाल्याचे पदार्थ घरात हातासरशी उपलब्ध होत असले तरी तेव्हा परिस्थिती वेगळी होती. विशेषत: युरोपात या मसाल्याच्या पदार्थांना मागणी होती. परंतु तेथे त्यासाठी आवश्यक असलेले हवामान आणि इतर भौगोलिक परिस्थिती नव्हती. त्यासाठी त्यांना मसाल्याच्या पिकांची लागवड करणाऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागत असे. त्यामुळे अर्थातच युरोपात मसाल्याचे पदार्थ हा मौल्यवान आणि किमती ऐवज मानला जात असे.
या सर्व मसाल्याच्या पदार्थांमध्ये जायफळ हा राजा होता. रून बेटे वगळता इतरत्र कुठेही जायफळाची फारशी लागवड होत नसे. त्यामुळे या बेटाचे युरोपियन लोकांना विशेषतः डचांना महत्त्व होते. त्यामुळे या यु*द्धात विजय मिळाल्यावर रून बेटासाठी मॅनहॅटन बेटांचा ताबा त्यांनी हसत हसत सोडला. दुसऱ्या अँग्लो डच यु*द्धात डच विजयी झाल्याने ब्रेडा कराराच्या अटी आणि शर्ती देखील त्यांच्या म्हणण्यानुसार ठरवण्यात आल्या.
जायफळाला केवळ मसाल्याच्या पदार्थांचा राजा एवढाच दर्जा नव्हता. ते औषधी म्हणून देखील प्रसिद्ध होते. त्याकाळच्या लोकांचा असा समज होता की गॅसेसपासून प्लेगपर्यंतच्या सर्व विकारांवर जायफळ हा रामबाण इलाज आहे. त्या काळात प्लेग हा अतिशय घातक रोग समजला जात असे. त्यामुळे जायफळाचे महत्त्व युरोपियनांच्या दृष्टीने अनन्यसाधारण होते. त्यामुळे रूनच्या बदल्यात मॅनहॅटन हा किफायतशीर व्यवहार होता.
पुढे रून बेटांचा ताबा घेतल्यानंतर डच इतर युरोपियनांसारखे, साम्राज्यवादी शासकांसारखेच वागले. तेथे स्थायिक असलेल्या बँडानीज रहिवाशांवर डच लोकांनी अनन्वित अ*त्याचार केले त्यांना शरण न येणाऱ्या आणि त्यांच्याशी संघर्ष करू पाहणाऱ्या स्थानिक लोकांच्या त्यांनी क*त्तली केल्या. जे वाचले त्यांना आपले गुलाम बनवले, सत्तास्पर्धेने आंधळे झालेले राज्यकर्ते जे करतात तेच डच लोकांनीपण केले. आज जगभरात मॅनहॅटनचा इतका रुबाब आहे, की ते उपनगर केवळ जायफळासाठी डच लोकांनी ब्रिटिशांना विकले होते यावर विश्वास बसत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.