आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आपण आजवर अनेक रहस्यमयी कथा ऐकल्या असतील. कित्येक कथांमागील कार्यकारण भाव कळणं अत्यंत अवघड असतं किंवा कित्येकदा अन्य काही कारणांनी त्या घटनेमागील कारण शोधणं अशक्य होऊन बसतं, अशा घटनांना हमखास रहस्यमयी घटनांचं नाव दिलं जातं. अशा रहस्यमयी घटना साहित्याचा भाग होऊन जातात आणि साहित्याचा भाग झाल्याने त्यांना आणखी मनोरंजक बनवण्यासाठी त्यात बीभत्स रसाचा प्रयोग केला जातो.
कथा-कादंबऱ्यांमधून सांगितलेल्या अशा आख्यायिका लोकप्रिय होतात आणि त्या घटनेभोवती ‘पॅरानॉर्मल’ गोष्टी फेर धरू लागतात, फक्त कल्पनांमध्ये. अशा प्रकारची एक प्रसिद्ध रहस्यमयी कथा, बर्म्युडा ट्रँगलची कथा आपण जाणतोच. आजच्या या लेखात अशाच एका ठिकाणाबद्दल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. प्रत्यक्षात अशी एक रहस्यमयी घटना घडली ती रशियात.
साठ वर्षांपूर्वी रशियातील डेटालॉव्ह खिंडीत असाच प्रकार घडला आणि आजवर त्या भयंकर रात्री खरोखर काय घडले याचा लोकांना प्रश्न पडला आहे. या गूढ प्रकरणामुळे गेल्या काही दशकांपासून लोकांनी नैसर्गिक आपत्तीपासून ते काही अतिशय हास्यास्पद गोष्टींपर्यंत सर्व सिद्धांत मांडले. यामध्ये यतीचा ह*ल्ला, सोव्हिएत संघातील हुकूमशाही राजवटीचा कट अशा अनेक गोष्टींचा समावेश होता.
सर्वार्थाने समृद्ध असलेल्या सोव्हिएट रशियामध्ये मातृभूमीसाठी काहीतरी करणे ही विशेष कामगिरी मानली जात असे. अशा यशस्वीतेच्या वातावरणामध्ये दहा महत्वाकांक्षी पण त्याचबरोबर कुशल गिर्यारोहकांना ‘प्रतिष्ठित ग्रेड ३’ गिर्यारोहक प्रमाणपत्र मिळवायचे होते. त्यासाठी त्यांनी एका अत्यंत अवघड आणि अतिशय धोकादायक गिर्यारोहणाची तयारी केली होती. या गिर्यारोहकांचे नेतृत्व तेवीस वर्षीय ‘इगॉर डेटालॉव्ह’कडे होतं. या टीमचे बाकी सदस्य आपल्या लीडरपेक्षाही लहान, विशीच्या वयातले होते.
२५ जानेवारी १९५९ रोजी त्यांची टीम ‘इव्हडेल’ या शहरात पोहोचली. त्यांनतर ते जवळच्या गावातून आपल्या ठिकाणाला जाण्यासाठी मार्गस्थ झाले. रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर २७ जानेवारीच्या पहाटे त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. ‘गोरा ओटोर्टेन’ पर्वताच्या दिशेने ट्रेक सुरू झाल्यानंतर एका दिवसातच, गटाच्या एका सदस्याने सांधेदुखीची तक्रार केली. युरी युदीनला जन्मापासून हृदयाचा त्रास होता आणि ट्रेकदरम्यान सांधेदुखी झाल्यामुळे त्याने माघारी जाण्याचे ठरवले. आता या टीममध्ये नऊ सदस्य होते. त्यांनतर त्यांच्याबरोबर जे काही घडलं ते पाहून युरीने कदाचित सांधेदुखी झाली यासाठी देवाचे आभार मानले असतील.
गिर्यारोहकांची ही टीम फक्त हौशी लोकांची नव्हती. यातील ट्रेकर्स हे कार्यक्षम तर होतेच शिवाय त्यांना आधीच्या ट्रेक मोहिमांचा दांडगा अनुभव होता. त्यामुळे टीममधील सदस्यांच्या कुटुंबाना आणि त्यांच्या शिक्षण संस्थेतील सहकाऱ्यांना ते भयंकर हिमवादळापासून स्वसंरक्षण करू शकतील याची पूर्ण खात्री होती. त्यामुळे या सर्वांनाच हे गिर्यारोहक आठ दिवसांनी परततील अशी अपेक्षा होती.
पण तसं न झाल्याने २० फेब्रुवारीला एक शोधमोहीम पाठवण्यात आली. लवकरच शोध मोहिमेमधील या सदस्यांबरोबर सैन्य आणि स्थानिक पोलिसांनीही शोध मोहिमेला मदत करण्यास सुरुवात केली. शोध सुरु झाल्यानंतर सहा दिवसांनी शोधमोहिमेतील सदस्यांना एका तंबूचे अवशेष सापडले. तंबू आतून कापलेला होता आणि तंबूची एकूण अवस्था पाहून घाईघाईत तंबू सोडून दिला आहे असे दिसत होते. या तंबूच्या जवळपास काही पावलांचे ठसेसुद्धा होते. या पावलांच्या ठशांचा शोध घेतल्यानन्तर आणि त्या दिशेने गेल्यानंतर शोधमोहिमेतील सदस्यांना त्या नऊ गिर्यारोहकांचे मृतदेह सापडले. हे लोक एकतर हायपोथर्मिया किंवा शरीरावर प्रचंड आघात झाल्याने मरण पावल्याचा अंदाज होता.
सहा जणांचा मृत्यू हायपोथर्मियामुळे झाला होता तर इतर तीन जणांचा मृत्यू जबरदस्त शारीरिक आघाताने झाला होता. एका मृताच्या कवटीवर मोठा आघात झाला होता, दोघांच्या छातीत गंभीर दुखापत झाली होती आणि एकाच्या कवटीला लहान चीर पडली होती. चार मृतदेह खाडीत, वाहत्या पाण्यात पडलेले आढळले आणि यापैकी तीन मृतदेहांचे डोके, चेहऱ्याच्या मऊ टिशूज खराब झाल्या होत्या, दोन मृतदेहांचे डोळे गायब होते, एकाची जीभ गायब होती आणि एकाच्या भुवया गायब होत्या, हे सर्व सोव्हिएत अधिकार्यांनी केलेल्या तपासणीत आढळून आले होते. तपासणीत “नैसर्गिक शक्ती” मृत्यूला कारणीभूत ठरली असा निष्कर्ष काढण्यात आला. या अचानक झालेल्या मृत्यूंसाठी अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत.
अधिकृत अहवालानुसार, गटातील सर्व सदस्यांचा मृत्यू थंडीत गोठण्यामुळे झाला होता किंवा रात्रीच्या वेळी ते पाय घसरून पडल्याने छातीला आणि डोक्याला जबरदस्त मार लागला होता. आजवर समोर आलेल्या कोणत्याही सिद्धांताने प्रत्येकाला पडलेल्या या प्रश्नांचे उत्तर दिलेले नाही, ते प्रश्न म्हणजे, टीमने तंबूची सुरक्षितता एवढ्या घाईघाईत सोडून ते बाहेर इतक्या थंडीत का गेले असावेत? टीममध्ये सुरुवातीला दहा सदस्य होते, तर पाच जण मावतील इतका लहान तंबू का होता? मृतांपैकी एकाचे डोळे आणि जीभ का गायब होती?
बहुतेक लोकांना पटणारा सिद्धांत होता: टीमला हिमस्खलन होत असल्याचे समजले. त्यामुळे आपण बर्फाने चिरडले जाऊ असे त्यांना वाटले, म्हणूनच ते घाईघाईने तंबू कापून, तंबूच्या बाहेर पळाले. शास्त्रज्ञांनी आणि भौगोलिक तज्ज्ञांनी या भूप्रदेशाचा अभ्यास केला, पण त्यांना कोठेही हिमस्खलनाची चिन्ह दिसली नाहीत. किंबहुना या प्रदेशात हिमस्खलन होणे हे जवळ जवळ अशक्यच होते. पण तरीही जर हिमस्खलनाची थिअरी खरी मानली, तरी शोधमोहिमेतील लोकांना जे पायांचे ठसे दिसले ते हिमस्खलनानंतर दिसलेच नसते.
दुसरा सिद्धांत होता तो आदिवासींच्या टोळीने त्यांना मारण्याचा, या प्रदेशात ‘मानसी’आदिवासींचे अस्तित्व आहे. त्यांना त्यांच्या प्रदेशात अन्य कोणाचीही उपस्थिती आवडत नव्हती. पण हा सिद्धांतसुद्धा फेटाळला गेला, कारण ज्या भागात मृतदेह सापडले तो भाग अतिशय दुर्गम आणि अवघड असल्याने त्याठिकाणी कोणताही आदिवासी येणे कठीण होते.
तसेच मृतदेहांवर ज्या प्रकारच्या जखमा होत्या, त्या जखमा ‘मानसी’ आदिवासींच्या शस्त्रांमुळे होणाऱ्या जखमांपेक्षा कित्येक पटीने वेगळ्या होत्या. याच तर्काच्या आधारे प्राण्यांच्या ह*ल्ल्याची थिअरीसुद्धा फेटाळली जाऊ शकते. अशाच प्रकारे काहींना हास्यास्पद वाटेल असा यतीच्या ह*ल्ल्याचा सिद्धांत मांडला जातो. यतीची ही लोककथा रशियन लोकांच्या जीवनाचा एक भाग बनली आहे.
गिर्यारोहक हे गुप्त लष्करी ठिकाणी पोहोचले असावेत आणि त्यांनी असे काही पहिले, जे त्यांनी किंवा कोणी अन्य व्यक्तीने ते पाहणे तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही अपेक्षित नव्हते. कदाचित त्यांनी सोव्हिएट रशियाचा गुप्त लष्करी प्रकल्प किंवा तत्सम काही पहिले असेल आणि म्हणूनच त्यांनी याची वदंता कोठेही करू नये यासाठी त्यांना संपवण्यात आले. रशियन सरकारनेही यासंबंधी संपूर्ण तपासावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष सैनिकांची नेमणूक केली होती. तसेच शोधमोहिमेत असलेल्या टीमला लवकरात लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास घाई केली गेली.
पण हुकूमशाही राजवट असलेल्या सोव्हिएट रशियामध्ये प्रत्येक गोष्टीत सरकारचा किंवा सैन्याचा हस्तक्षेप असणे हे अतिशय सामान्य होते. याशिवाय या संपूर्ण प्रकरणात सरकारी सहभाग सिद्ध होईल असा भक्कम पुरावा नाही. जर सैन्याने या गिर्यारोहकांच्या टीमला संपवलं असतं तर बंदुकीच्या गोळ्या किंवा चाकूचे घाव त्यांच्या अंगावर असते, पण तसंही कुठे दिसत नाही.
या घटनेनन्तर तब्बल साठ वर्षांनी जोहान गुआमे याने स्वतः याविषयीचे इन्व्हेस्टीगेशन सुरु केले. जोआन गुआमे हा स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लॉसानेच्या (इपीएफएल) स्नो अँड अव्हालांच सिम्युलेशन लॅबोरेटरीचा (एसएलएबी) प्रमुख आणि या संस्थेत प्राचार्य होता. त्याने टीमच्या मृत्यूचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्यासाठी त्या रात्रीच्या परिस्थितीचे ‘सिम्युलेशन’ करायचे ठरवले.
यासाठी त्याने इतर अनेक शास्त्रज्ञांना आपल्या रिसर्च टीममध्ये सामील करून घेतले. जरी त्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्याठिकाणी हिमस्खलन होणे शक्य नव्हते तरी ‘कॅटाबॅटिक’ वाऱ्यामुळे लहानसे हिमस्खलन झाले असावे, यामुळे तंबुवर मोठा बर्फाचा गोळा पडला असावा, या गोळ्यामुळे तंबूत उपस्थित गिर्यारोहकांना आणखी मोठे हिमस्खलन होण्याची भीती वाटली असेल आणि याच भीतीने त्यांनी घाईघाईत तंबू सोडला.
हा नवा वैज्ञानिक सिद्धांत तर्काच्या आधारे तत्कालीन परिस्थिती सिद्ध केली आहे. पण अजूनही पायाच्या ठसे असल्याने या सिद्धांताला सर्वमान्यता मिळू शकली नाही. डेटालॉव्ह पासवर त्यादिवशी काहीतरी भयंकर घडले होते हे एका गिर्यारोहकांचे डोळे आणि जीभ गायब असण्यावरून सिद्ध होते. अजूनही याचे गूढ उकलेले नाही. त्यामुळे रशियातील या घटनेला खऱ्या अर्थाने ‘रहस्यमयी घटना’ मानली जाऊ शकते. गिर्यारोहक इगॉर डेटलॉव्ह वरूनच या खिंडीचे नामकरण करण्यात आले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.