आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतातील मुघल शासकांना हिंदू धर्मात आधीपासूनच रुची होती. सुरुवातीच्या काळात हिंदू धर्म समजून घेण्यासाठी मुघल शासक सदैव प्रयत्नशिल होते. अकबराच्या काळात याचे प्रमाण खूप जास्त होते. अकबराने भाषांतर करणाऱ्या लोकांचा एका गटाची निर्मिती करून संस्कृत भाषेतील ग्रंथांचा फारसी भाषेत अनुवाद करायला सुरुवात केली होती.
अकबराचे प्रधानमंत्री अबुल फजल त्यांच्या आईने अकबरी ह्या ग्रंथात लिहतात की हिंदू धर्मग्रंथांच्या अनुवादाला सुरुवात दोन्ही समाजातील ( हिंदू – मुस्लिम) वैर भावना आणि वितुष्ट संपवता येईल ह्या एका उद्देशाने करण्यात आली. दोन्ही समाजात एकरूपता यासाठी हे प्रयत्न केले जात होते.
हिंदू मुस्लिम यांच्यातील मतभेदाला आणि वैराला दोघांच्या आस्थेचा कडवटपणा आणि एकमेकांप्रति असलेली अनभिज्ञता कारणीभूत होती. अकबराने ह्या उद्देशानेच सर्वप्रथम महाभारताच्या अनुवादाची आज्ञा दिली होती.
दिल्लीच्या गादीवर बसल्यासवर अकबराने स्थानिक राजांना युद्धाच्या मैदानात मात दिली होती. परंतु यानंतर त्याने कुटनीती आणि विवाह संबंध यांच्या माध्यमातून हिंदू राजे आणि भारतीय लोकांशी असलेले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न देखील केले होते.
दारा शुकोह हा अकबराचा पणतू होता. शाहजहानचा मुलगा होता. त्याने हिंदू धर्मग्रंथांचा मोठ्या प्रमाणावर आभ्यास केला. परंतु अकबराप्रमाणे त्याचा हिंदू धर्म ग्रंथाच्या अभ्यासाचे कारण हे स्थानिक राजांशी संबंध प्रस्थापित करून राजकारण करणे नव्हते. त्याला धार्मिक सहिष्णुता निर्माण करून कुठल्याही प्रकारची साम्राज्यवादी धोरणं साधायची नव्हती. दारा शुकोहला इतर धर्मियांप्रति प्रचंड आस्था होती. त्याला राजकारण आणि साम्राज्य विस्तारात रस नव्हता.
दारा शुकोहने सर्व धर्मातील ज्ञानी लोकांना एकत्र केलं. हिंदू धर्माच्या खूप खोलवर केलेल्या अध्ययनातून दाराची अशी धारणा झाली होती की काही विशिष्ट प्रथा वगळल्या तर हिंदू मुस्लिम धर्मात जास्त फरक नव्हता.
दारा शुकोह हा एक विद्वान होता. त्याने उपनिषद आणि भारतीय दर्शनांचा खूप चांगला आभ्यास केला होता. तो एक विनम्र आणि उदारमतवादी भूमिकेचा पालक होता. शाहजहानला दाराच्या विद्वात्तेवर आणि त्याच्या भारताप्रतीच्या अनुग्रहावर प्रचंड विश्वास होता. याच विश्वासाच्या भावनेतून त्याचा हाती हिंदुस्थानाचा कारभार सोपविण्याची शाहजहानची तयारी होती. परंतु नियतीला हे मंजूर नव्हते.
सर्व धर्माचे विचार जरी कितीही गुंतागुंतिचे असले तरी सर्व धर्माचे मूळ हे एकच असल्याचे दारा शुकोहचे मत होते. त्याच्या मते धर्मा धर्मातील विविधतेमुळे ते एकमेकांच्या मूळ व्याख्येला समजून घ्यायला असमर्थ आहेत. त्यांची अशी धारणा होती की ज्ञानासाठी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट ही सत्य समजून घेण्यासाठीची उत्कट आणि प्रबळ इच्छा असते. त्याने हिंदू मुस्लिमांच्या एकतेला मजमा उल बहरिन असे नाव दिले होते.
परंतु दारा शुकोहचे हे उदारमतवादी विचार कितीही थोर असले तरी राजकारण आणि युद्ध कौशल्य यांचा दारा शुकोहमध्ये आभाव होता आणि हेच त्याच्या पतनाचे कारण ठरले.
शाहजहान दाराला साम्राज्य सोपवणार हे लक्षात येताच औरंगजेब दक्खनेतून दिल्लीला गेला. त्याने शहाजहानला कैद केले आणि दारा शकोहला जिवंत पकडून त्याचा शिरच्छेद केला.
औरंगजेब हा दारा शुकोहच्या अगदीच विरोधाभासी प्रतिमेचा होता. तो कट्टर इस्लामचा पूजक होता, सोबतच तो एक कुशल राजकारणी आणि युद्धखोर होता. त्याच्या ह्याच गुणांच्या बळावर तो सत्तेत आला. औरंगजेब सत्तेत आल्यामुळे दारा शकोहच्या निमित्ताने इस्लाम धर्मात येऊ घातलेला उदारमतवादी प्रवाह अस्तित्वात आलाच नाही, परंतु औरंगजेबाच्या कट्टर आणि क्रूर धोरणांनी दरी अजूनच रुंदावत गेली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.