आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगभरात क्रिकेट आवडीने बघितला जातो. खासकरून भारत आणि पाकिस्तान देशात क्रिकेटचे फॅन फॉलोवर्स मोठ्या प्रमाणावर आहेत. या दोन देशांमधील क्रिकेट सामन्याच्या वेळी अक्षरशः खेळपट्टीवर यु*द्धाचे स्वरूप प्राप्त होते. सुरुवातीपासूनच भारतीय क्रिकेट संघात सर्व जातीधर्माच्या खेळाडूंचा समावेश होता. झहीर खान, मोहम्मद कैफ आणि मोहम्मद अझरुद्दीन सारख्या खेळाडूंनी भारतीय संघाच्या आजपर्यंतच्या कामगिरीत मोलाचे योगदान दिले आहे. मोहम्मद अझरुद्दीन हा प्रतिभावान खेळाडू भारतीय संघाचा कर्णधार पण राहिला आहे.
तसाच पाकिस्तान संघात पण हिंदू खेळाडूंचा समावेश असतो. त्यात प्रामुख्याने अनिल दलपत आणि यष्टीरक्षक दानिश कानेरीया यांचा समावेश होतो. अनिल दलपत यांनी पाकिस्तान संघाकडून चांगली कामगिरी केली. पण त्यांना लवकरच संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पाकिस्तान संघामध्ये मुस्लिम खेळाडूंचा भरणा जास्त होता. त्यात अनिल दलपत हे एकमेव हिंदू खेळाडू होते.
त्यावेळी असा आरोप करण्यात आला होता की, अनिल दलपत हे हिंदू असल्यामुळे कर्णधार युनूस खान याने त्यांना संघाबाहेर काढले होते.
अनिल दलपत यांच्यानंतरही हिंदू खेळाडू पाकिस्तान संघाकडून खेळत राहिले. त्यात अग्रक्रमाने नाव घ्यायचे ठरले तर पहिले नाव दानिश कानेरीया हे डोळ्यापुढे येते. पाकिस्तान संघातून खेळताना गोलंदाजीमध्ये दानिश कानेरीयाने मोठे योगदान दिले आहे.
दानिशचे पूर्वज गुजरात येथील होते. त्याच्या जन्माआधीपासूनच गुजरात राज्यातील सुरत शहराशी त्यांचे पिढीजात संबंध होते. त्याच्या घरचे जन्माने गुजराती होते. पण ते पाकिस्तानमधील कराची येथे स्थायिक झाले होते. दानिशचा जन्मही तिथेच झाला. शाळेत शिकत असतानाच आवड म्हणून दानिशने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि नंतर हळूहळू करिअर म्हणून क्रिकेटवर लक्ष केंदित केले.
खेळातील चांगली कामगिरी पाहून पाकिस्तान क्रिकेट संघात त्याची निवड करण्यात आली. चांगला परफॉर्मन्स देऊनही संघामध्ये आपले स्थान निर्माण करण्यात दानिशला बराच वेळ लागला. पाकिस्तान संघांत त्याला सर्वात जास्त सहकार्य कोणी केले असेल तर ते नाव होते राशिद लतीफ.
दानिशने १७व्या वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जवळपास १०२ क्रिकेट सामने खेळले.
त्यानंतर २००० साली पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघाच्या सामन्यातून त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली.
पाकिस्तान संघाकडून खेळताना दानिशने क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात स्पिनर म्हणून केली. दानिश हा पाकिस्तानचा चौथा गोलंदाज होता ज्याने क्रिकेट कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त बळी मिळवले होते.
६१ कसोटी सामन्यांमध्ये त्याने २६१ बळी घेतले. त्याच्या नावावर गोलंदाजीमधील अनेक विक्रम आहेत.
पण, कसोटी सामन्यांच्या प्रमाणात फारच कमी एकदिवसीय सामने दानिश खेळला आहे. पाकिस्तान संघातून खेळताना दानिशने इंग्लंडमधील स्थानिक स्पर्धा काऊंटी क्रिकेटमधून खेळायला सुरुवात केली. याच काऊंटी क्रिकेटमधून खेळताना मॅच फिक्सिंगमध्ये त्याला अटक करण्यात आली.
दानिश मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्यामुळे पाकिस्तान संघाकडून त्याच्या खेळण्यावर पण प्रश्नचिन्ह उभे राहिले.
इंग्लंडमध्ये २००९ साली इसेक्स संघाकडून खेळताना त्याला मॅच फिक्सिंगमध्ये आरोपी करण्यात आले. त्यानंतर दानिशच्या काऊंटी क्रिकेट खेळण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली.
इंग्लंड क्रिकेट बोर्डापुढे दानिशने मॅच फिक्सिंगची कबुली दिली नाही.पण, त्यानंतर त्याने ९ वर्षांनी कबूल केले की मॅच फिक्सिंग त्यानेच केली होती.
मध्यंतरी शोएब अख्तरने दानिशबद्दल बोलताना हा दावा केला होता की, दानिश पाकिस्तानी हिंदू असल्यामुळे त्याला दरवेळी टार्गेट करण्यात आले. यावेळी पाकिस्तानी खेळाडू जावेद मियाँदाद आणि इंझमाम उल हक यांनी शोएब अख्तरच्या आरोपांना प्रखर विरोध केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार हे खोटं आहे.
आता हे किती खरं किती खोटं हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डलाच माहिती पण, पाकिस्तानात राहणाऱ्या अल्पसंख्यांक हिंदू समाजाची होरपळ आजपर्यंत होत आलेली आहे हे मात्र खरं. दानिशच्या रूपाने अगदी चांगल्या चांगल्या हिंदू खेळाडूंचे पण शोषण होत असल्याचे दिसून आले, तिथे इतर सामान्य लोकांची काय कथा? यावरून तरी बाकी जग गुणवत्तेवर चालते आणि पाकिस्तान मात्र अजूनही धर्मावर, असेच म्हणावे लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.