आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतीय इतिहास अनेक महिलांच्या शौर्य कथांनी सजलेला आहे. आपल्या लोकांसाठी, राज्यासाठी आणि देशासाठी कित्येक शूरवीर महिलांनी शत्रूंशी दोन हात केलेले आहेत. प्रसंगी आपला जीव देखील दिला आहे. १२ जुलैला, ‘भूज: द प्राइड ऑफ इंडिया’ नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यानिमित्त महिलांच्या पराक्रमाची गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली. या चित्रपटात अजय देवगण स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारत आहे.
विजय कर्णिक हे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भुज येथील हवाईदलाच्या विमानतळाचे प्रभारी होते. चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाल्यानंतर सर्वांना विजय कर्णिक आणि ‘त्या ३००’ महिलांच्या शौर्याची पुन्हा एकदा आठवण झाली.
कोण होत्या ‘त्या ३००’ महिला? त्यांनी असं काय काम केलं होत, ज्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिक त्यांचा ऋणी आहे!
उर्दू भाषा लादल्यामुळं १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानातील (बांगलादेश) नागरिकांनी पश्चिम पाकिस्तान सरकारविरोधात बंड केलं. काही काळातच या बंडांनं हिंस्र स्वरूप धारण केलं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भारतानं त्यात हस्तक्षेप केला.
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सैन्याला पूर्व पाकिस्तानच्या मदतीला पाठवलं. तेथील नागरिकांना पाकिस्तान सरकारच्या निर्बंधांतून मुक्त करून बांगलादेश या स्वतंत्र देशाची घोषणा करण्यात आली.
पश्चिम पाकिस्ताननं या कारवाईचा निषेध केला आणि कोणतीही चेतावणी न देता अनेक महत्त्वाच्या भारतीय हवाई तळांवर हल्ले केले. ज्या पद्धतीनं इस्त्रायलनं प्रसिद्ध ‘सात दिवसांच्या युद्धात’ इजिप्तविरुद्ध रणनीती वापरली होती तीचं पाकिस्ताननं वापरली. प्रत्यक्ष युद्ध होण्यापूर्वी भारताच्या हवाई दलाचं खच्चीकरण करण्याचा पाकिस्तानचा हेतू होता. हल्ला झालेल्या एअरबेसपैकी सर्वात जास्त फटका भुजला बसला होता.
भुज हे भारत-पाकिस्तान सीमेपासून जवळ असलेलं एक लहानसं शहरवजा ठिकाण आहे. ८ डिसेंबर १९७१च्या रात्री, पाकिस्तानी साबर जेट्सच्या स्क्वॉड्रननं भुजमधील भारतीय हवाई दलाच्या धाव पट्ट्यांवर १४ पेक्षा जास्त ‘नेपलम’ बॉम्ब टाकले. या हल्ल्यात धावपट्टया इतक्या निरुपयोगी झाल्या की त्यावरून भारतीय लढाऊ विमानं उडू शकत नव्हती. पाकिस्तानचा हल्ला रोखण्यासाठी निदान मुख्य धावपट्ट्या तरी दुरुस्त होणं गरजेचं होतं.
दुरुस्तीच्या कामासाठी भारतीय हवाई दलानं(आयएएफ) सीमा सुरक्षा दलाची मदत मागितली होती. मात्र, त्यावेळी बीएसएफला संपूर्ण पाकिस्तानी आक्रमण रोखण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अशा परिस्थितीमध्ये आयएएफनं विजय कर्णिक यांना भुज येथे परिस्थिती हाताळण्यासाठी पाठवलं.
विजय कर्णिक भूजमध्ये आले. धावपट्ट्या दुरुस्त करण्यासाठी त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यासाठी स्थानिक नागरिक मदत करू शकतात, असा निष्कर्ष विजय कर्णिक आणि बीएसएफचे अधिकारी आर के नायर यांनी काढला. मात्र, युद्धाच्या परिस्थितीमध्ये नागरिकांना घराबाहेर काढण मोठं कठीण काम होतं. विजय कर्णिक यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी, माधापार गावचे सरपंच जाधवजीभाई हिरानी यांच्या मदतीनं गावकऱ्यांकडे मदतीची विनंती केली.
विजय कर्णिकांची तगमग पाहून गावातील ३०० महिलांनी हवाईदलाच्या मदतीसाठी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याही मनात देशभक्तीचा लाव्हा खदखदू लागला. या ३०० महिलांनी व्यवहारिकदृष्ट्या अशक्य असलेलं धावपट्टी दुरुस्तीचं काम पूर्ण केलं आणि तेही अवघ्या ७२ तासांमध्ये!
कर्णिकांना गावातील सामान्य महिलांच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास होता. महिलांना घराबाहेर काढून त्यांचाही जीव धोक्यात घातल्याची जाणीव हवाई दलाला होती मात्र, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यावेळी कर्णिक आणि त्यांची टीम दोन पातळ्यांवर युद्ध लढत होतो. मदतीला आलेल्या एखाद्या जरी महिलेचा जीव गेला असता तर कदाचित संपूर्ण देश पुन्हा संकटात सापडला असता. काम करत असताना पुन्हा पाकिस्तानी हल्ला झाला तर कसा आणि कुठे आश्रय घेता येईल, याची माहिती त्यांनी महिलांना दिली होती. त्या महिलांनी देखील मोठ्या धैर्यानं प्रत्येक सूचनांचं पालन केलं.
९ डिसेंबरला भारतीय हवाईसेनेनं गावकऱ्यांकडे मदत मागितली होती. तेव्हा गावातील महिलांनी लष्कराच्या वाहनात चढण्यापूर्वी स्वत:च्या सुरक्षिततेचा किंवा कुटुंबीयांचा एकदाही विचार केला नव्हता. कारण त्यावेळी देशाला त्यांची सर्वात जास्त गरज होती. भुजमधून आपल्या हवाईसेनेच्या विमानांनी पुन्हा भरारी घेतलीचं पाहिजे, असा निर्धार या ३०० महिलांनी केला होता. “या कामात आपला जीव जरी गेला असता तरी चाललं असतं, कारण सैनिक नसूनही देशासाठी बलिदान देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं असतं”, अशी भावना वालबाई सेघानी या महिलेनं व्यक्त केली होती.
त्यावेळी मदतीसाठी आलेल्या वालबाई या महिलेचा मुलगा केवळ १८ महिन्यांचा होता. त्यांनी त्याला शेजाऱ्यांच्या हवाली केलं होतं. दिवस-रात्र देशाच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या सैन्यातील आपल्या भावांना मदत पाहिजे होती, इतकी एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात होती.
विजय कर्णिक आणि हवाई दलाच्या प्रत्येक जवानानं या महिलांची खूप काळजी घेतली होती. बॉम्ब हल्ल्यात निकामी झालेली धावपट्टी पुन्हा कार्यरत करणं नक्कीच कठीण काम होतं. मात्र, हवाई दलातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी कामाला सुरुवात केली. जेव्हा-जेव्हा पाकिस्तानी बॉम्बर्स जवळ येण्याची जाणीव होई तेव्हा-तेव्हा सायरन वाजवून महिलांना सतर्क केलं जाई.
शत्रूंच्या विमानांना दिसू नये म्हणून महिलांनी शेवाळी रंगाचे कपडे घातले होते. सायरन वाजला की, त्या तत्काळ सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेत. जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा वापर व्हावा यासाठी त्यांनी पहाटेपासून सायंकाळी अंधार पडेपर्यंत काम केलं होतं.
दुरुस्त झालेली धावपट्टी पुन्हा शत्रूंच्या नजरेत येऊ नये म्हणून त्याच्यावर शेणाच्या गोवऱ्यांचं आच्छादन टाकलं होतं. पहिल्या दिवशी महिलांनी सुकडी आणि मिरची खाऊन तग धरला. त्यानंतर मात्र, एक दिवस जवान आणि महिला सर्वांना उपाशीपोटी झोपावं लागलं होतं. कारण, अन्नधान्याचा साठाच संपला होता. तिसऱ्या दिवसापासून मात्र, आसपासच्या मंदिरांनी मदत केली. त्याठिकाणी आलेला प्रसाद आणि फळं हवाई दलाचे जवान महिलांसाठी जेवण म्हणून घेऊन आले.
चौथ्या दिवशी दुपारी ४ वाजता भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी दुरुस्त केलेल्या धावपट्टीवरून भरारी घेतली आणि महिलांच्या कष्टांचं सार्थक झालं!
युद्ध थांबल्यानंतर भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या महिलांसाठी बक्षिस देऊ केलं होतं. ‘आम्ही आमच्या देशासाठी नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडलं’, असं म्हणत या महिलांनी बक्षिस नाकारलं. तीच रक्कम गांधींनी माधापार गावाच्या विकासासाठी दिली. या महिलांच्या शौर्याचं कौतुक म्हणून केंद्र सरकारनं माधापार गावात ‘वीरांगना स्मारक’ नावाचं एक युद्ध स्मारक उभं केलेलं आहे.
संपूर्ण देश संकटात असताना, भारतीय हवाई दलाच्या खांद्याला खांदा देऊन माधापार गावातील ३०० महिलांनी काम केलं. प्रयत्नांची पराकाष्ठा करून धावपट्टी दुरुस्त केली. त्यांच्या देशप्रेमामुळेच भारत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊ शकला, यात शंकाच नाही!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.