आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
१९९६ मध्ये जर माकपने पंतप्रधानपदासाठी ज्योती बसू यांच्या नावाला सहमती दर्शवली असती, तर माकपची आजची स्थिती काही वेगळीच असती. माकपचा जागतिकीकरणाच्या धोरणाला विरोध होता. तेंव्हा जर बसू पंतप्रधान झाले असते तर त्यांनाही हिच धोरणे रेटावी लागतील जे त्यांच्या तत्वांच्या विरुद्ध होते म्हणून त्यांनी पंतप्रधानपदाचा दावा सोडून दिला. पण ही माकपची सर्वात मोठी चूक होती असे म्हटले गेले.
ज्योती बसू २३ वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. परंतु एवढ्या वर्षांतही त्यांनी राज्याचा म्हणावा तसा विकास केला नाही असेही म्हटले जाते. १९९६ साली कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते.
भाजपला १६२ जागांवर विजय मिळाला होता तर कॉंग्रेस १३६ जागांवर होती. कोणत्याच एका पक्षाला सरकार स्थापन करणे अशक्य होते. म्हणूनच भाजप विरोधात तिसरी आघाडी बनणार असेल तर कॉंग्रेस त्यांना पाठींबा देईल असे कॉंग्रेसने जाहीर केले.
भाजपच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी यांना दोन मतदारसंघातून विजय मिळाला होता. तर कॉंग्रेसचे पी. व्ही. नरसिंहराव दोन ठिकाणाहून निवडून आले होते. शिवाय, जनता दल ४६, सीपीएम ३२, तमिळ मनिला कॉंग्रेस २०, द्रमुक १७, तेलगूदेशम १७ असे चित्र होते. या व्यतिरिक्त सीपीआय १२, बसपा ११, समता पार्टी ०८, अकाली दल ०८ आणि आसाम गण परिषदेला ०५ जागा मिळाल्या होत्या.
यावेळी हरकिशन सिंह सुरजित तिसऱ्या आघाडीचे सूत्रधार म्हणून पुढे आले. वी. पी. सिंग यांनी पंतप्रधान पदासाठी स्पष्ट नकार दिला. आता प्रश्न हा होता की पंतप्रधानपदाचा दावेदार म्हणून कोणाचे नाव घोषित करायचे? शिवाय, तिसऱ्या आघाडीतील सर्व पक्षांनी या नववार सहमती दर्शवणेही गरजेचे होते.
तेंव्हा व्ही. पी. सिंग यांनीच देशातील सर्वात अनुभवी नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांचे नाव पुढे केले.
त्यावेळी माकप-३२, भाकप-१२, आरएसपी-४, फॉरवर्ड ब्लॉक-३ आणि केरल कॉंग्रेस-मणी-१ अशा रीतीने पुरोगामी गटाकडे संख्याबळ जास्त होते. आता माकपलाच यावर अंतिम निर्णय घ्यायचा होता.
मात्र, माकपने हा प्रस्ताव अमान्य केला. पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून ज्योती बसू यांचे नाव घोषित करण्यापूर्वी माकपने आपल्या सेन्ट्रल कमिटीची बैठक बोलावली. या कमिटीत मिळालेल्या बहुमतावरून पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून ज्योती बसू यांचे नाव माघारी घ्यावे असे ठरले.
कारण, ज्योती बसू जर पंतप्रधान झाले तर त्यांना जागतिकीकरण आणि भांडवली नितीनियामाचे पालन करावे लागेल. जे पक्षाच्या तत्वाविरोधात होते. माकपला हे अजिबात मान्य नव्हते. म्हणून त्यांनी ज्योती बसू यांना पंतप्रधान बनवण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला.
ज्योती बसू यांच्या पतंगाची दोरी त्यांच्याच पक्षाने कापली होती. अर्थात, पक्षाचे यामागे काहीही राजकारण असले तरी राष्ट्रीय स्तरावर ज्योती बसू हे एक मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणूनच ओळखले गेले. शिवाय, त्यांनीच स्वतःला बंगाल पुरतेच मर्यादित वर्तुळात बंदिस्त केले होते.
ज्योती बसू यांच्या विरोधकांच्या मते ज्योती बसू यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची प्रगती रोखली होती. पश्चिम बंगालमधील बुद्धिमान लोकांवरही त्याच्या कार्यकाळाचा विपरीत परिणाम झाला. त्यांच्या गुणांना आणि प्रतिभेला योग्य वाव मिळाला नाही.
सुमोन चक्रवर्ती यांनी ज्योती बसू यांच्यावर टीका करताना एकदा म्हटले होते की, बंगालमधील औद्योगीकरण त्यांनी संपवून टाकले. ज्याचा शिक्षण व्यवस्थेवरही परिणाम झाला. बसू यांच्या कार्यकाळात बंगालमध्ये बौद्धिक दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती, असाही आरोप सुमोन चक्रवर्ती यांनी केला.
राज्याची आर्थिक चाक त्यांच्याच कार्यकाळात रुतून बसले. त्यांनी मनात आणले असते तर दोन दशकांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण बंगालचा कायापालट केला असता.
१९५६ मध्ये डॉ. बिधान चंद्र राय यांनी पश्चिम बंगालमध्ये दुग्ध क्रांती घडवून आणली होती. जे काम गुजरातच्या ‘आनंद’साठी वर्गीज कुरियन यांनी केले तेच काम राय यांनी पश्चिम बंगालमध्ये फार पूर्वी केले होते.
स्वातंत्र्यानंतर राय यांनी बंगालची जी अभूतपूर्व प्रगती केली होती तिचे सर्वत्र कौतुक होत होते. परंतु बंगालमध्ये ज्या जमिनी सुधारणा झाल्या त्याचे श्रेय मात्र निश्चितच बसू यांना दिले गेले पाहिजे.
ज्योती बसू यांचे व्यक्तिगत जीवन मात्र अत्यंत साधे होते. त्यांच्या साध्या राहणीमानाचे सर्वत्र भरपूर कौतुक होत असे. ज्योती बसू यांना आमदार म्हणून २५० रुपयाचे मानधन मिळत असे त्यातीलही मोठी रक्कम ते पक्षाच्या कामासाठी दान करत असत. डाळ भात आणि तळलेले वांगे (बेगुन भाजा) इतका त्यांचा साधा आहार होता.
ज्योती बसू तत्वाचे किती पक्के होते आणि त्यांचे व्यक्तिगत जीवन किती साधेपणाने भरलेले होते याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. असेही बोलले जाते की ज्योती बसू यांना त्याच्या वडिलांनी चहा पिण्यास मनाई केली होती. वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत त्यांनी चहा पिला नव्हता. आयुष्यातील पहिला चहाचा कप त्यांनी एकविसाव्या वर्षी घेतला.
ज्योती बसू हे उच्च मध्यम वर्गीय कुटुंबातील होते. त्यांचे वडील डॉक्टर होते. कलकत्त्यातील लॉरेटो स्कूलमधून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. कलकत्त्याच्याच प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी पदवी पूर्ण केली. वकिलीच्या शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तिथेच ते कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात आले.
भारतात आल्यानंतर ते पूर्णत: कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. १९४६ साली ते बंगाल विधानसभेसाठी निवडले गेले. बिधान चंद्र राय पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते तेंव्हा ज्योती बसू विरोधी पक्ष नेते होते. त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत असे.
सुरुवातीला बंगालच्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर तब्बल २३ वर्षे ते बंगालचे मुख्यमंत्री होते. इतक्या मोठ्या कालवधीसाठी मुख्यमंत्री पदावर राहणे हा देखील एक रेकोर्ड आहे.
२००० साली प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणातून संन्यास घेतला.
ज्योती बसू यांनी आयुष्यभर भांडवलशाहीला विरोध केला. मात्र त्यांचाच मुलगा आज एक उद्योगपती आहे. ज्योती बसू हे साध्या राहणीसाठी ओळखले जात तर त्याच्या मुलगा मात्र ऐषोआरामाचे जीवन जगतोय.
ज्योती बसू यांच्यानंतर त्यांचा वारस म्हणून त्याच्या कुटुंबियांच्या वतीने राजकारणात कोणीही आले नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.