आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
उत्क्रांती ही अनेक वर्षांपासून, युगांपासून होत आलेली प्रक्रिया आहे. प्रत्येक पिढी दर पिढीत अत्यंत सूक्ष्म बदल होत राहतात व त्या प्रजातीच्या रचनेत बदल होत राहतात. माणूस आधी माकड होता. बदलत्या परिस्थितीनुसार त्याने काही बदल स्वीकारले व आज माणुस नावाच्या प्राण्याची किचकट रचना बघायला मिळते.
पण, हे बदल आजही होत आहेत का ? तर हो! फक्त फरक एवढाच आहे की अगदी सुरुवातीच्या काळात बदल शारिरिक व बौद्धिक अशा दोन्ही पातळ्यांवर होत, व आता फक्त बौद्धिक दृष्टीने होतात. उदा. माकडाचा माणूस होताना शरीर ताठ होणं, पचनक्रियेत बदल होणं व इतर काही बौद्धिक बदल होत गेले. त्यातूनच अनेक प्रजाती निर्माण झाल्या. आतासुद्धा जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या आजूबाजूला हे बदल आपल्याला जाणवतील.
काही वर्षांपूर्वी माणसाला मोबाईल ही संकल्पना नवीन होती. त्यामुळे आजही काही लोकांना मोबाईल वापरताना त्रास होतो. पण लहान मुलांना आपण सहज मोबाईल हाताळताना पाहतो. ‘आजकालची मुलं खूपच हुशार आहेत’ असं बरेचदा कौतुकाने म्हणतो. तर या मागचं मुख्य कारण उत्क्रांती आहे.
उत्क्रांती ही सतत होत राहणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक सूक्ष्म जीव जंतूंपासून ते हत्तीपर्यंत सगळ्या प्राण्यांमधे ही प्रक्रिया होत असते. ‘उत्क्रांती’ ही निसर्गाने जीवांना बहाल केलेले एक वरदानच म्हणावं लागेल.
शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या पृथ्वीवर जीवनाची उत्क्रांती एकमेव रहस्य आहे. जी प्रजाती निसर्ग, वातावरण व आजूबाजूच्या प्रसंगानूरूप स्वतःमधे बदल घडवते तीच प्रजाती टिकते. ‘द सर्वाइवल ऑफ फिटेस्ट’ अर्थात सशक्त प्राणिच जगू शकतो. पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात अनेक प्राणी आणि जीव होते. ज्याचे स्वरूप व रचना आज जी बघायला मिळते त्यापेक्षा खूप वेगळी होती व असे ही काहि प्राणी होते जे बदल स्वीकारू नाही शकले व त्यांचा नाश झाला. उदा. डायनोसोर. त्यामुळे उत्क्रांती या प्रक्रियेला जीवचक्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जिवांचा एकमेकांसोबत व निसर्गाशी असे दोन मुख्य संघर्ष निसर्गात अस्तित्वात आहेत. जिवांचा जीवांशी संघर्ष अनेक कारणांमुळे असतो. खाद्यासाठी, पाण्यासाठी, संयोगासाठी, घरासाठी व अनेक कारणांमुळे हा संघर्ष चालतो. काही संघर्ष एका प्रजातीतच मर्यादित असतात, तर काही पूर्ण इकोसिस्टममध्ये व्यापलेले असतात. वाघ आपलं खाद्य मिळवण्यासाठी हरणाशी संघर्ष करतो, तर एक हरीण गवत मिळवण्यासाठी आपल्या प्रजातीतील इतर हरणांसोबत संघर्ष करतो.
या संघर्षात टिकून राहण्यासाठी सक्षम व सुदृढ असणं आवश्यक आहे आणि सुदृढ होण्याची संधी उत्क्रांती देते. ही प्रक्रिया केवळ चांगले बदल आत्मसात करेल असं आवश्यक नाही. त्यामुळे आज ही जैवविविधता आपल्याला बघायला मिळते. सर्व प्राण्यांचा मुळ ‘अंश’ आहे, तिथूनच आयुष्याची सुरवात झाली. तिथून बदल होत गेले व फाटे फुटत ही जैवविविधता निर्माण झाली.
आजही अनेक नवीन प्रजाती निर्माण होत आहेत व त्याचा शोध लावून त्यांची नोंद केली जाते. ही काही वर्षांत घडलेली प्रक्रिया नाही तर अनेक युगं ही प्रक्रिया चालत आली आहे व आज ते बदल आपण अनुभवू शकतो. माणसाच्या पोटात वाढणारा व त्याला आजारी करणारा एक सूक्ष्म जीवाणू कसा बदलत गेला यावर अनेक प्रयोग झाले. माणूस त्यांना संपवण्यासाठी जी औषधं घ्यायचा त्यांच्या विरोधात त्या जीवाणूमधे प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे.
असं अनेक शरीरातील व निसर्गातील जिवांच्या बाबतीत आढळून आलं आहे. त्यात लक्षणीय बदल दिसून आले आहेत ‘झुरळ’ या किटकात.
झुरळ मानवी वस्तीमध्ये राहणारं एक आर्थोपोड आहे. त्यांची शरीररचना अत्यंत किचकट असून आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात आपण रोज झुरळ बघतो. झुरळ हा एक आजार पसरवणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला मारण्यासाठी अनेक उपाय आपण करतो. कीटनाशक फवारेसुद्धा वापरतो. पण हे सगळे रसायन किती उपयोगाचे आहेत यावर प्रश्न चिन्हं उभं करणारा एका प्रयोग समोर आला आहे. झुरळात झालेले बदल नुकतेच अभ्यासले गेले. त्यात काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत.
जर्मनीत आढळणाऱ्या झुरळांवर हा प्रयोग झाला. प्रयोगासाठी काही झुरळांवर कीटनाशकांचा उपयोग केला गेला. तेव्हा असं लक्षात आलं की झुरळांनी कीटनाशकाविरूद्ध प्रतिकार शक्ती निर्माण केली आहे.
एवढंच नाही तर ती प्रतिकारशक्ती एका पिढी पासून ते दुसऱ्या पिढीला हस्तांतरित होत आहे. प्रतिकारशक्ती आपल्या गुणसूत्रांवर असलेल्या अत्यंत सूक्ष्म अशा जीन्स अर्थात जनुकांवर अवलंबून असते. प्रजनन प्रणालीमार्फत या गुणसूत्रांत बदल होतात व पुढच्या पिढीपर्यंत पोहचतात. हा प्रयोग ‘सायंटिफिक जर्नलमधे प्रकाशित झाला आहे.’
त्यात असा देखिल उल्लेख आहे की ही वाढती प्रतिकार शक्ती नक्कीच धोकादायक आहे. कारण झुरळाला कीटनाशकाने संपवणे अशक्य आहे.
वैज्ञानिकांच्या असं लक्षात आलं की त्यांची संख्या कमी करणं आता सोपं नाही. एक मादी एका वेळी जवळपास २००-३०० अंड्यांना जन्म देते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणं आपल्या हातात नाही. तेव्हा कीटनाशक बदलत राहणं हाच एकमेव उपाय आहे. त्याच बरोबर काही भौतिक उपाय जसं काही प्रकारचे जाळे व इतर अवजारांचा विचार व्हावा.
जिथे शक्य असेल तिथे स्वच्छता राखून काळजी घ्यावी. अन्यथा झुरळ उत्क्रांतीच्या मार्गावर पुढे जात राहील व मानवासाठी धोका निर्माण करेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.