आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
८ डिसेंबर २०२१ ची सकाळ. भारताचे प्रथम ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जनरल बिपीन रावत आपल्या पत्नी आणि अन्य ऑफिसर्ससह तामिळनाडूमधील ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’ या संस्थेत एका कार्यक्रमासाठी रवाना झाले. या कार्यक्रमासाठी तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे देखील उपस्थित राहणार होते. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज हे तामिळनाडूमधील निलगिरी पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या वेलिंग्टन या ठिकाणी आहे. तिथे जाण्यासाठी जनरल रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि काही ऑफिसर्सनी सुलूर येथील एअरबेसहून Mi-17V5 या हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले.
काही वेळाने हवामान खराब होऊ लागलं, खराब हवामानामुळे दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी होऊ लागली. कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि क्षणांत संपूर्ण हेलिकॉप्टर उ*द्धवस्त झाले. या अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या अन्य ऑफिसर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर कार्यरत असलेल्या बिपीन रावत यांच्या मृत्यूने संपूर्ण देशात आश्चर्याची लहर निर्माण झाली. सीडीएस जनरल बिपीन रावत नेमके कोण होते, आणि ते देशासाठी एवढे महत्त्वाचे असेट का होते हे जाणून घेण्यासाठी हा विशेष लेख..
बिपीन रावत मूळचे उत्तराखंडचे. मार्च १९५८ मध्ये जन्मलेल्या बिपीन रावत यांच्या घरातच सैन्याची परंपरा आहे. त्यांचे वडील लक्ष्मण सिंग रावत यांचे १९५१ साली 11 गोरखा रायफल्समध्ये कमिशन झाले. १९८८ साली लेफ्टनंट जनरल असतानाच ‘डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ अर्थात सैन्य उपप्रमुख या पदावरून त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांचे शालेय शिक्षण डेहराडूनमधील ‘कॅम्ब्रियन हॉल स्कुल’ आणि शिमला येथील ‘सेंट एडवर्ड्स स्कुल’ येथून झाले.
एक सैन्याधिकारी
सर्व लष्करी अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांनी पुण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा अकादमी अर्थात एनडीएमधून आणि डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून आपले प्रशिक्षण पूर्ण केले. इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये त्यांना सर्वोच्च मनाची ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ देण्यात आली. हा सन्मान जेंटलमन कॅडेटला दिला जातो. हा कॅडेट सर्व क्रीडाप्रकार, सर्व प्रकारचे प्रशिक्षण आणि ड्रिल्समध्ये सर्वोत्तम असतो.
भारतीय सैन्यात निवृत्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाला त्याच युनिटमध्ये परत पाठवण्याची गौरवशाली प्रथा आहे. त्यानुसार रावत यांना १६ डिसेंबर १९७८ रोजी ’11 गोरखा रायफल्स’ या रेजिमेंटच्या पाचव्या बटालियनमध्ये (5/11 GR) सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांची लष्करी कारकीर्द सुरु झाली. १९८७ साली भारत आणि चीनदरम्यान ‘सुमदुरोन्ग चू’ याठिकाणी सौम्य चकमकी झाल्या. या वेळी बिपीन रावत यांची तुकडी त्याच ठिकाणी तैनात होती. यानंतर दोनच वर्षांत अर्थात १९८० साली त्यांना लेफ्टनंट पदावर बढती मिळाली.
पुढच्या प्रत्येकी चार वर्षांत पदोन्नती होत होत ते २०१४ साली ते लेफ्टनंट जनरल बनले. याच वर्षी त्यांची नियुक्ती ‘III कॉर्प्सचे’ ‘जनरल ऑफिसर कमांडिंग’ म्हणून करण्यात आली. त्यांनतर २०१६ साली त्यांची नियुक्ती सदर्न कमांडच्या कमांडिंग-इन-चीफ या पदावर करण्यात आली. त्याच वर्षी ते लष्कर उपप्रमुख बनले.
सैन्यात राहून घेतलेला उत्तर आणि ईशान्य भागाचा प्रचंड अनुभव तसेच प्रतिभेच्या जोरावर त्यांची नियुक्ती लष्कर प्रमुख या पदावर करण्यात आली. २०१७ साली त्यांना पुन्हा बढती मिळाली आणि ते जनरल बनले. या पदावर असताना त्यांनी अनेक द*हश*तवादी ह*ल्ल्यांचा फक्त यशस्वी सामनाच केला नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सैन्याची कामगिरी आणखी सोपी करण्याचा देखील प्रयत्न केला. ३१ डिसेंबर २०१९ साली ते या पदावरून पायउतार झाले.
जनरल रावत हे तामिळनाडूमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि फोर्ट लीव्हनवर्थ, कॅन्सस येथील ‘युनायटेड स्टेट्स आर्मी कमांड अँड जनरल स्टाफ कॉलेज’ (USACGSC) मधील हायर कमांड कोर्सचे पदवीधर देखील होते.
अनुभव
बिपीन रावत यांना सुरुवातीपासूनच उंचीवरच्या यु*द्धतंत्राचा अर्थात ‘हाय अल्टीट्युड वॉरफेअर’चा दांडगा अनुभव मिळत राहिला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावली, त्यांना मिळालेले ‘परम विशिष्ट सेवा मेडल’, ‘उत्तम युद्ध सेवा मेडल’, ‘अति विशिष्ट सेवा मेडल’ आणि असेच अनेक पुरस्कार या गोष्टीची ग्वाही देतात.
जनरल रावत सर्व गोष्टींमध्ये सर्वोत्तम होते. पण तरीही त्यांनी कधीही सैन्यामध्ये “नोकरी” म्हणून काम केले नाही. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले होते, “भारतीय सैन्य म्हणजे नोकरी मिळवण्याचे साधन नाही. तुम्हाला भारतीय सैन्यात यायचं असेल तर तुमच्याकडे अवघड परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता असायलाच हवी.” त्यांनी याच भूमिकेतून कायम काम केलेले दिसते.
सी. डी. एस.
१९९९ साली झालेल्या कारगिलच्या यु*द्धानंतर “कारगिल रिव्ह्यू कमिटी” या नावाने समिती तयार करण्यात आली. या समितीने आपल्या अहवालात सरकारला राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी अनेक सल्ले दिले आहेत. यांपैकी एक महत्त्वपूर्ण मुद्दा होता भूदल, वायुदल आणि नौदल यांच्यामध्ये समन्वय राहावा यासाठी एका व्यक्तीची आणि संस्थेची स्थापना करण्याची शिफारस. या शिफारसींनुसारच २००१ साली इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफची स्थापना करण्यात आली.
तीनही दलांचे कामकाज अधिक कार्यक्षम आणि सुलभ करणे, संरक्षण सामग्रीच्य सर्व खरेदी प्रस्तावांमध्ये संरक्षण मंत्र्यांना मार्गदर्शन करणे तसेच एखादे संरक्षण साहित्य विकत घ्यायचे असल्यास तिन्ही दलांमध्ये समन्वय साधून योग्य तो पर्याय निवडणे अशा जबाबदाऱ्या इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफकडे आहेत. याशिवाय डिफेन्स सायबर एजन्सी, डिफेन्स स्पेस एजन्सी, आर्म्ड फोर्सेस स्पेशल ऑपरेशन डिव्हिजन आणि आर्म्ड फोर्सेस स्ट्रॅटेजिक मिसाईल कमांड या शाखा देखील इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफच्या नेतृत्वाखाली काम करतात.
याच पार्श्वभूमीवर २४ डिसेंबर २०१९ रोजी संसदेमध्ये ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ हे पद तयार करण्याचे मान्य करण्यात आले. सीडीएस हे संरक्षण मंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम करतात, तसेच सीडीएस हे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात. लष्कर, वायुदल आणि नौदल यांच्यामध्ये समन्वय साधून राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सीडीएसची असते.
याशिवाय कोणत्या दलाने कोणत्या सुरक्षा सामग्रीला प्राधान्यक्रम देऊन त्या घेतल्या पाहिजेत हे ठरवण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर असते. या पदावर नियुक्त करण्यासाठी भारत सरकारसमोर तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याहून अधिक प्रतिभावान व्यक्त्तिमत्त्व मिळालेच नसेल. पण त्यांनी असं काय केलं होतं, की एवढी मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आली. त्यांनी सैन्यदलांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा आणल्या.
रिफॉर्मिस्ट रावत:
१९६२ साली चीनबरोबर झालेल्या यु*द्धात भारताचा दारुण पराभव झाला. या यु*द्धातील अनेक लढायांमध्ये वेळेवर रसद न पोहोचल्याने आपण मोठा भूभाग आणि शेकडो सैनिक गमावून बसलो. हीच चूक परत होता कामा नये यासाठी जनरल बिपीन रावत यांनी आपल्या कार्यकाळात विशेष प्रयत्न केले.
भविष्यातील सर्व यु*द्धे एकाच वेळी तिन्ही दलांद्वारे लढली जातील. आपल्या सशस्त्र दलांना यशस्वी ऑपरेशन्स करण्यास सक्षम करण्यासाठी, यु*द्धाच्या सर्व टप्प्यांवर त्यांना योग्य रसद पुरवणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन, जनरल बिपिन रावत यांनी मुंबईमध्ये थर्ड जॉइंट लॉजिस्टिक नोड सुरु केला. हा नोड यु*द्धकाळात सशस्त्र दलांना दारुगोळा, रेशन, इंधन, सामान्य गरजांच्या वस्तू, भाड्याने घेतलेली वाहतूक, विमान वाहतूक, कपडे, सुटे सामान आणि त्यांच्या कार्यानुसार त्यांना ज्याची गरज आहे ते सर्व पुरवण्याचे काम करेल.
कुप्रसिद्ध बोफोर्स घोटाळ्यानंतर भारतीय सैन्य आधुनिक तोफखाना खरेदी करण्यात संकोच करत होतं. पण जनरल रावत यांच्या नेतृत्वाखाली सरकारने भारतातच सुरक्षा सामग्री बनवण्यास प्रोत्साहन दिले आणि ‘एल अँड टी’ कंपनीची ‘के-9 वज्र’ नावाची तोफ भारतातच बनवली जाऊ लागली.
थिएटर कमांड्स:
इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ ही एक केंद्रीय संस्था आहे, जिथून तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्यात येतो. अशाच प्रकारची प्रणाली प्रत्येक विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात कार्यान्वित करणे म्हणजे थिएटर कमांड्स. विशिष्ट भौगोलिक क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी सर्व तिन्ही दलांची संसाधने एकाच कमांडरच्या अंतर्गत एकत्र करणे याला थिएटर कमांड्स म्हणून ओळखले जाते. याची देखील शिफारस कारगिल नंतर तयार झालेल्या कमिटीने केली होती. सीडीएस जनरल बिपीन रावत यासाठी देखील आग्रही होते.
जनरल बिपीन रावत यांनी सलग ४ दशके लष्करी सेवा दिली. त्यांच्या या प्रचंड कारकिर्दीचा आढावा काही शे शब्दांमध्ये घेणं अशक्य आहे.
भारताचे वार्षिक डिफेन्स बजेट ७२ बिलियन डॉलर्स अर्थात सुमारे ७ हजार २०० कोटी असूनही Mi-17V5 सारख्या अतिशय महत्त्वपूर्ण हेलिकॉप्टरचा अपघात होतो ही दुर्दैवी बाब आहे. फक्त Mi-17V5 च नाही तर भारतीय वायुसेनेतील MiG-21 ही विमाने देखील सतत अपघातग्रस्त होत असतात. अशा अपघातांमध्ये रावत यांच्यासारखे बहुमोल रत्न कायमचे गमावणे हे देशासाठी प्रचंड नुकसानदायक आहे.
आज जरी सीडीएस जनरल बिपीन रावत आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेले विचार, प्रेरणा आणि दिशा आपल्यासोबत आहेत. कारण वीरांना कधीही मरण येत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.