आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
काही दिवसांपूर्वी भारत हा जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. लोकसंख्येबरोबरच रोजगाराच्या समस्या देखील वाढतात, परिणामी शहरे मोठी होतात. भारतातील अनेक शहरांचे चेहरे-मोहरे गेल्या दोन दशकांत प्रचंड बदलले आहेत. रोजगारांच्या वाढत्या गरजांमुळे गाव अथवा छोट्या शहरांतून मोठ्या शहराकडे येणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
शहरांमध्ये वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर दुचाकींचा वापर होतो. दुचाकींचा वापर होत असतानाच त्याच्याबरोबरच हेल्मेट वापरणे अत्यावश्यक आहे. आजवर याच हेल्मेटने कित्येकांचे जीव वाचवले. हेच हेल्मेट्स मोफत वितरित करण्याचे काम करतात दिल्लीतील राघवेंद्र कुमार.
हेल्मेट मॅन ऑफ इंडिया – राघवेंद्र कुमार
राघवेंद्र रोज सकाळी आपलं मिशन पूर्ण करण्यासाठी निघतात. त्यांचं एकच उद्दिष्ट असतं, ज्या दुचाकीस्वारांकडे हेल्मेट्स नाहीत, त्यांना मोफत हेल्मेट्स पुरवणे. आपल्या कारमध्ये हेल्मेट्सचा स्टॉक ठेऊन ते ग्रेटर नोएडाच्या रस्त्यांवर फिरतात. प्रत्येक कारच्या मागच्या बाजूला कोणी आपल्या जाती-धर्माचं गुणगान करतं, तर कोणी काही वेगळं डिझाईन करतं. कुमार यांच्या कारच्या मागच्या काचेवर मात्र हेल्मेट्सचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या याच कामामुळे त्यांना ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ अशी बिरुदावली देखील दिली गेली आहे.
दिल्ली, कानपुर, लखनौ, मेरठ, नोएडा आणि आसपासच्या आणखी काही ठिकाणी त्यांनी ५६ हजारांहून अधिक हेल्मेट्सचे वितरण केले आहे. त्यांच्या या मिशनचा लोकांना देखील प्रचंड प्रमाणावर फायदा होत असल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी विक्रम सिंग यांचा अपघात झाला. विक्रम आपल्या गाडीवरून पडले आणि डिव्हायडरला धडकले, त्यामुळे त्यांच्या हेल्मेटचे दोन तुकडे झाले होते. विक्रम सिंग यांचे प्राण राघवेंद्र कुमारांनी दिलेल्या हेल्मेटमुळे वाचले.
नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या मते, २०२१ या एकाच वर्षात दीड लाख लोकांचा जीव रस्ते अपघातांमुळे झाला होता.
‘हेल्मेट मॅन’ची सुरुवात
मोफत हेल्मेट वाटण्याचे काम सुरु केल्यावर, राघवेंद्र कुमार आपली नोकरी सांभाळून फावल्या वेळेत हे काम सांभाळत असत. याशिवाय ते जेव्हा नोएडाहून बिहारला आपल्या मूळ गावी जात असत, तेव्हा जर कोणी त्यांना विदाउट हेल्मेट गाडी चालवताना दिसलं तर ते त्या व्यक्तीला हेल्मेट मोफत देत असत. २०१६ साली मात्र त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ याच कामासाठी देऊ केला.
सुरुवातीला कुमार यांनी आपल्या बचतीचे पैसे हेल्मेट्स खरेदी करण्यासाठी वापरले. पण सध्या मोजक्या शेतजमितिनीतून मिळणारे उत्पादन आणि देणग्या यांच्या बळावर ते आपलं काम करत आहेत. हे काम करण्यासाठी त्यांनी २०१८ साली नोएडामधील फ्लॅट देखील विकला. याशिवाय त्यांच्या पत्नीने देखील आपले दागिने विकून या मोहिमेसाठी हातभार लावला आहे. लोकांना फक्त हेल्मेट्स देण्यासाठी म्हणून राघवेंद्र एवढी मेहनत का घेत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याच्यामागेही एक कष्टदायक कथा आहे.
मूळचे बिहारचे असलेले राघवेंद्र कुमार उच्च शिक्षणासाठी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मूळचा बिहारमधील मधुबनीचा कृष्ण कुमार त्यांचा रूममेट बनला. ज्यावेळी राघवेंद्र कुमार इंजिनिअरिंग करत होते, तेव्हा कृष्ण कुमार नोएडाच्या ‘लॉयड लॉ कॉलेज’मध्ये कायद्याचा अभ्यास करत होते. राघवेंद्र कुमार शिक्षणाबरोबरच पार्ट टाइम जॉब देखील करायचे. जेव्हा ते रूमवर परत येत असत, तेव्हा कृष्ण त्यांची एखाद्या भावाप्रमाणे काळजी घेत असे.
२०१४ साली कृष्ण कुमार दिल्लीहून आपल्या घरी परतत असताना त्यांचा यमुना एक्सप्रेसवेवर अपघात होऊन मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांचे कुटुंबच उ*द्ध्वस्त झाले. राघवेंद्र म्हणतात, “कुटुंबातील धाकटे मूल गमावणे हे अकल्पनीय नुकसान आहे. मी त्याकुटुंबियांच्या डोळ्यातील वेदना पाहू शकलो आणि त्याच दिवशी मला माझ्या आयुष्यातील उद्देश सापडला.” या घटनेमुळे २०१४ पासून राघवेंद्र यांनी मोफत हेल्मेट्स वितरित करण्यास सुरुवात केली.
हे काम करताना राघवेंद्र कुमार यांना विविध अनुभव आले. त्यापैकी एक अनुभव म्हणजे हेल्मेट्स खरेदी करण्याचा. पटण्यातील एका हेल्मेटच्या दुकानात जाऊन त्यांनी किती हेल्मेट्स उपलब्ध आहेत याची चौकशी केली. दुकानात त्यावेळी दोन लाख हेल्मेट्सचा स्टॉक होता. राघवेंद्र कुमार यांनी सगळे हेल्मेट्स पॅक करायला सांगितले तेव्हा ते चेष्ठा-मस्करी करत असतील असे दुकानदाराला वाटले. जेव्हा राघवेंद्र कुमार यांनी त्या दुकानदाराला आपल्या मोहिमेबद्दल सांगितले तेव्हा त्याला परिस्थितीचे गांभीर्य समजले आणि त्याने देखील कुमार यांच्या उपक्रमाला दाद दिली.
२०२० साली राघवेंद्र कुमार यांनी ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे राघवेंद्र कुमार यांना ‘हेल्मेट बँक’ या सुविधेची सुरुवात करायची आहे. या सुविधेच्या माध्यमातून जे विद्यार्थी घरून हेल्मेट आणण्यास विसरतील त्यांना मोफत हेल्मेट दिले जाईल. ज्यांना गरज आहे ते हेल्मेट उधार घेऊ शकतात आणि ते आठ दिवसांत परत करू शकतात किंवा ते री-इश्यू करू शकतात. नोएडामधील शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेर सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.
पुस्तकांच्या बदल्यात हेल्मेट्स
वस्तुविनिमयाची पद्धत आपल्याकडे जुनी आहे. पण राघवेंद्र कुमार यांनी अशीच काहीशी पद्धत सुरु केली. आपला मित्र कृष्ण कुमारच्या अपघातानंतर काही महिन्यांनी जेव्हा ते त्याच्या घरी गेले, तेव्हा त्यांना इयत्ता बारावीची काही जुनी पुस्तके धूळ खात पडलेली आढळली. त्या पुस्तकांचा वापर करणारं कोणीच नव्हतं. कुमार यांनी ती पुस्तके घेतली आणि पटण्यातील एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला दान देऊन टाकली. काही महिन्यांनंतर त्याच मुलाचे वडील कुमार यांच्याकडे आभार मानण्यासाठी आले. त्या मुलाने परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं होतं.
याच वेळी कुमार यांना हेल्मेट्सच्या बदल्यात पुस्तके घेण्याची कल्पना सुचली. कुमार यांच्या मते, या नवीन पिढीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याने ते अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके दान करून हेल्मेट घेण्यास प्रोत्साहित करतात. त्यांनी हेल्मेट मोफत घेतल्यास त्यांचे पालक ते वापरू शकतात. राघवेंद्र कुमार ही पुस्तके ग्रंथालयांना देखील देतात. त्यांच्या याच उपक्रमामुळे सुमारे १४०० ग्रंथालयांना फायदा झाला आहे.
राघवेंद्र कुमार त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरूनही रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक अभिनेते आणि राजकारण्यांनी या कार्यासाठी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना “प्राईड ऑफ आशिया पुरस्कार २०२३” देखील प्रदान करण्यात आला आहे.
त्यांचे हे कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे..
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.