आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
राजस्थानमधील सामाजिक कार्यकर्त्या भंवरी देवी यांनी बाल विवाहाच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांचे शोषण करण्यात आले, त्यांच्यावर जुलूम करण्यात आले, पण त्यांनी कधी हार मानली नाही. सरतेशेवटी त्यांनी सुप्रीम कोर्टाला लहान मुलींच्या लैंगिक शोषणावर दिशा निर्देश देण्याचा विचार करण्यास भाग पाडले होते.
आज स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटूनही बालविवाहाची कुप्रथा बंद करण्यात आपण यशस्वी झालेलो नाही. आजही भारताच्या ग्रामीण भागात ही प्रथा सुरू आहे.
ही कथा आहे या कुप्रथेविरुद्ध संघर्ष करून एका कायद्याच्या रूपाने भारतीय महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या एका संघर्षशील महिलेची…
भंवरी देवी या एक सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी महिला विकास कार्यक्रमाअंतर्गत “आशा सेविका” म्हणून काम केले आहे. त्या गावोगावी जाऊन त्यांच्यात साफ सफाई, परिवार योजन आणि स्त्री-शिक्षण या विषयावर जनजागृतीचे काम करत होत्या.
स्त्री-भ्रूणह*त्या, हुंडा आणि बालविवाह अशा कुप्रथांच्या विरोधात त्यांनी जनजागृतीचे कार्य केले.
राजस्थानमध्ये बालविवाहाची प्रथा फार सामान्य होती. आजही तिथे मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. अगदी दोन महिन्यांच्या लहान बाळांचे देखील लग्न लावून दिल्याच्या घटना राजस्थानमध्ये घडल्या होत्या.
भंवरी देवी स्वतः बालविवाहाच्या शिकार होत्या. त्यांचे देखील वयाच्या ६व्या वर्षी लग्न निश्चित करण्यात आले होते. त्यांच्या पतीचे वय त्यावेळी फक्त ९ वर्ष होते.
भंवरी देवींना त्यांच्या संघर्षासाठी नीरजा भानोत मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बीजिंगच्या चौथ्या वैश्विक महिला कॉन्फरन्समध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २००२ साली राजस्थान सरकारने त्यांना ५० हजार रुपये आर्थिक राशी भेट म्हणून दिली होती. त्यांच्या जीवनावर आधारित बवंडर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कीर्ती मिळाली.
एका गावातील दहा वर्षीय गुज्जर मुलीचा विवाह रोखल्यामुळे तो समाज भंवरी देवींवर नाराज होता. त्यावेळी गुज्जर समाजाने एकत्रित येऊन भंवरी देवी आणि त्यांचे पती लाल प्रजापत यांच्यावर लाठी ह*ल्ला केला.
भंवरी देवींवर त्यांनी अमानुषपणे बला*त्कार केला होता. भंवरी देवींनी आपल्या जबाबात म्हटले होते की, त्यांना गुर्जरांचा त्रास सहन करावा लागेल, याची पूर्वकल्पना होती. तरीदेखील परिस्थिती बघता जे योग्य वाटलं तेच त्यांनी केलं.
खटला चालू होता त्यावेळी भंवरी देवींना मोठा अपमान सहन करावा लागला होता. न्यायाच्या आशेने त्यांनी ज्या न्याय मंदिराचे दार ठोठावले होते, तिथे त्यांच्या विपरीत निकाल कोर्टाने दिला होता. त्यांच्यावर बला*त्कार करणाऱ्यांना देखील कोर्टाने ९ महिन्यांची शिक्षा करून सोडून दिले होते. आरोपींना सोडवण्यासाठी अत्यंत विचित्र युक्तिवाद करून देखील न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्याने लोक हैराण झाले होते.
या खटल्यावेळी एक न्यायाधीश म्हणाले,
“गावचा सरपंच बला*त्कार करू शकत नाही, वेगवेगळ्या जातीचे पुरुष एका बला*त्कारात सामील होऊ शकत नाहीत, ६०-७० वर्षांचे म्हातारे बला*त्कार करू शकत नाही. एक पुरुष आपल्या नातेवाईकासमोर बला*त्कार करू शकत नाही. एक उच्च मानण्यात येणाऱ्या जातीचा पुरुष दुसऱ्या जातीच्या महिलेवर बला*त्कार करू शकत नाही कारण त्या स्त्रीला तो अपवित्र मानतो, शिवाय भंवरी देवींनी बला*त्काराच्या वेळी कुठला आवाज केला नव्हता.”
ज्यादिवशी हा निकाल बाहेर आला, त्यावेळी त्याची भारतातच नव्हेतर जगभरात आलोचना करण्यात आली. भंवरी देवींना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक धरणे, प्रदर्शने करण्यात आले. अनेक महिला संघटना व एनजीओंनी याविरोधात आवाज उठवला.
भंवरी देवींचा आजदेखील न्यायासाठी संघर्ष सुरू आहे. परंतु या प्रकरणामुळे सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. या महिलांच्या सुरक्षेसाठी एका कायद्याची आवश्यकता होती. या केसला मुख्य आधार मानून विशाखा समवेत अनेक संघटनांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी संविधानातील कलम १४, १९ आणि २१ नुसार महिलांना कुठेही काम करण्याची मुभा असल्याचे नमूद केले होते. याबरोबरच कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
१९९७ साली सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन लैंगिक शोषणाच्या व्याख्येत बदल करत विशाखा गाईडलाईन्सच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांसाठी नियम बनवून घेतले. २०१३ साली संसदेत विशाखा जजमेंटच्या आधारावर एक कायदा पारित करण्यात आला, ज्याच्या माध्यमातून कामावर जाणाऱ्या महिलांना संरक्षण पुरवण्यात आले.
भंवरी देवींवर बला*त्काराच्या घटनेला पाच वर्षे उलटली, त्यानंतर पाच आरोपींना कैद करण्यात आले. जयपूरच्या विशाखा संघटनेने भंवरी देवींना न्याय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. खटला चालू असताना पाच वेळा न्यायाधीश बदलण्यात आले होते. १९९५ साली बला*त्काराच्या आरोपींची मुक्तता करण्यात आली होती. त्यापैकी दोन गुन्हेगारांचा मृत्यू झाला आहे.
भंवरी देवींच्या प्रकरणावरून काम करणाऱ्या महिलांना कशा प्रकारच्या शोषणाचा सामना करावा लागतो, याची कल्पना येते. गेली २२ वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या भंवरी देवींकडे बघितल्यावर त्यांच्या संघर्षशीलवृत्ती समोर आपण नतमस्तक होतो. त्यांचा न डगमगणारा आत्मविश्वास व हार न मानण्याची वृत्ती प्रेरणादायी आहे.
विशाखासारख्या अनेक संघटनांनी भंवरी देवींना साथ दिली होती. त्यांनी व इतर महिला संघटनांनी काम करणाऱ्या महिलांना संरक्षण देण्यासाठी नव्या कायद्याची मागणी केली होती.
ज्यावेळी महिलांच्या हक्कांच्या संघर्षाची चर्चा होईल, त्यावेळी भंवरी देवींच्या या संघर्षगाथेची कायम आठवण काढली जाईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.