आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
नुकत्याच आलेल्या हंसल मेहतांच्या SCAM १९९२ या वेबसिरीजमध्ये स्वामी म्हणून असलेले पात्र, चंद्रास्वामीचे असल्याचे बोलले जात आहे. आर्थिकदृष्ट्या संकटात सापडल्यावर हर्षद मेहताने त्याच्याकडे मदतीची मागणी केली होती.
चंद्रास्वामी नावाच्या तांत्रिकाचे भारत सरकारमधील मंत्र्यांशी आणि राजकीय नेत्यांशी फार चांगले संबंध होते. राजीव गांधी असो की नरसिंह राव, चंद्रास्वामीचे सर्वांशी चांगले संबंध होते. त्याला इंदिरा गांधींचा गुरु मानले जाते. असे म्हणतात की इंदिरा गांधींनी चंद्रास्वामीला आश्रमासाठी जमीन देखील दिली होती. चंद्रशेखर राव यांच्याशी असलेले त्याचे संबंध कधीच लपून राहिले नव्हते.
भारतातीलच राजकीय नेते नाहीतर, परदेशातीलही अनेक नेत्यांशी त्याचे चांगले संबंध होते. यात इराकचा माजी हुकुमशहा सद्दाम हुसेन, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर, बहरीनचे शेख इसा बिन सलमान आणि ब्रुनेईच्या सुलतानाचा समावेश होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी देखील त्याचे चांगले संबंध होते.
काही लोक म्हणतात की चंद्रास्वामी गुजरातचा होता. पण त्याचा जन्म राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात १९४८ साली झाला होता. त्याचा परिवार आधी गुजरातमध्ये वास्तव्यास होता खरा पण, चंद्रास्वामीच्या जन्माअगोदरच ते राजस्थानला स्थायिक झाले. चंद्रास्वामीच्या वडिलांच्या व्यवसायासंबंधित माहिती उपलब्ध नसली तरी अनेक लोक म्हणतात ते एक सावकार होते.
बालपणापासूनच चंद्रास्वामीला तांत्रिक साधनेत रस होता आणि आपला पूर्णवेळ त्यासाठी देण्यास सुरुवात केली. फार कमी वयात त्याला तांत्रिक म्हणून प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली. वयाच्या २३ व्या वर्षी तो काशीला गेला, तिथे त्याने तंत्रमंत्राची शिक्षा घेतली. यानंतर यातच तो पूर्णपणे गढून गेला.
काही काळातच एक प्रसिद्ध ज्योतिषी म्हणून चंद्रास्वामीला नावलौकिक मिळाला. अनेक राजकीय नेत्यांनी त्याच्यासमोर डोके टेकवायला सुरुवात केली. पण खरंतर चंद्रास्वामीला तांत्रिक विद्येतील जरादेखील ज्ञान नव्हते.
२३ सप्टेंबर १९९५ मध्ये सीबीआयने चंद्रास्वामीच्या विरोधात खटला दाखल केला. यानंतर काही हैराण करणारे तथ्य समोर आले. यानंतर चंद्रास्वामी आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील व्यवहारांबाबत अनेक गुपिते समोर आली. याचा खुलासा त्याच्या निकटवर्तीय बबलूने केला होता. तो म्हणाला होता की दाऊदने तीन टप्प्यात चंद्रास्वामीला मोठी रक्कम दिली होती. १९८९ च्या अदनान खागोशी आणि दाऊदच्या डीलमध्ये चंद्रास्वामी मध्यस्थ होता. गृहमंत्रालयातील ओळखीच्या बळावर चंद्रास्वामीने दाऊदच्या विरोधातील खटल्यांची धार कमी केली होती.
बबलूच्या आरोपांना सत्य मानायला सीबीआय तयार नव्हती, पण कालांतराने हवाला रॅकेट चालवणाऱ्या उस्मान घनीला अटक करण्यात आली, त्याने दिलेल्या जबाबामुळेच बबलूच्या दाव्यात तथ्य असल्याचे लक्षात आले. घानी याला गुजरातच्या अँटी टेररिस्ट स्क्वाडने अटक केली होती. त्याने चंद्रास्वामीशी असलेले संबंध मान्य केले. त्याने सांगितले की दाऊदचा सहकारी असलेल्या बिपीन दिवाणने त्याची आणि चंद्रास्वामीची भेट घालून दिली होती. बिपीन दिवाणचा उल्लेख बबलूने देखील केला होता. यामुळे संशय बळावला पण ठोस पुरावे नव्हते. दुसरीकडे चंद्रास्वामीने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. चंद्रास्वामीचे म्हणणे होते की ज्यावेळी दाऊद आणि माझ्या भेटीची चर्चा सुरु आहे, त्यावेळी मी दुबईत नव्हतो.
दाऊदशी असलेले संबंधच नाहीतर इतर अनेक गुन्ह्यात चंद्रास्वामीचा हात असल्याची बाब समोर आल्यावर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळायला सुरुवात करण्यात आली. त्याच्यावर काही नवीन खटले भरण्यात आले.
बबलूने त्याच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले होते की जनाधार पत्रिकेच्या राजेंद्र जैनच्या कारमध्ये बॉम्ब लावण्यापासून ते नित्यानंद आणि नारायण मुनी या दोन साधूंच्या अपहरणापर्यंत अनेक कटांमध्ये चंद्रास्वामी सहभागी होता. राजेंद्र जैन यांना ब्लॅकमेल करण्याचा आरोपाखाली त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं, पण तो तिथून देखील पुराव्या आभावी निसटण्यात यशस्वी ठरला होता.
बबलूने आपल्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिल्यामुळे तो एक स्वघोषित अपराधी सिद्ध झाला होता. आता या अपराध्याला आश्रय दिला म्हणून ज्यावेळी पोलीस चंद्रास्वामीला अटक करायला पोहचली, त्यावेळी त्याने ‘बबलू अपराधी आहे याची आपल्याला कल्पना नाही’ अशी बतावणी केली. इतकंच नाही, बबलू हा आपल्याकडे फक्त दहा महिने राहिला होता असे देखील खोटे सांगितले. पण प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी होती. त्याच्या शेजाऱ्याने दिलेल्या ऍफिडेव्हिटमध्ये बबलू आश्रमात दोन वर्ष राहिल्याची माहिती देण्यात अली होती.
१९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसने आरोप केला होता की चंद्रास्वामीने अदनान खगोशीच्या मदतीने लिट्टेला हत्यार पुरवल्याचा आरोप केला होता. लिट्टेने राजीव गांधींची हत्या घडवून आणली होती. चंद्रास्वामीच्या विरोधात प्रवर्तन निर्देशालयाने चौकशी केली.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने देखील त्याच्या आश्रमावर छापेमारी केली होती. त्याच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली. ही बंदी २००९ साली उठवण्यात आली. त्याच्यावर लंडनस्थित लोणच्याचा व्यापारी लखुभाई पाठक यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याने पाठक यांना एक लाख रुपये घेऊन गंडवल्याचे समोर आले. याशिवाय त्याच्यावर परदेशी चलन अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
चंद्रास्वामी नेहमी आपल्या राजकीय संबंधांमुळे अनेक प्रकारच्या गुन्ह्यातून स्वतःची सुटका करून घेत. त्याच्यावर अनेक वेळा जेलमध्ये जाण्याचीसुद्धा वेळ आली होती, पण तो कायमच वाचवला गेला.
१९९६ पर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु होते पण नंतर मात्र त्याच्या नशिबाने पलटी खाल्ली. त्याच्यावर अनेक गुन्हांचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्याची दिल्लीच्या तिहार जेलमध्ये रवानगी करण्यात आली. २०११ साली चंद्रस्वामींना नऊ कोटींची दंड भरावा लागला होता. वयाच्या ६९व्या वर्षी चंद्रास्वामींचे निधन झाले आणि अनेक रहस्येदेखील त्याच्यासोबत गेली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.