आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आपल्या देशातील पंजाबमध्ये आजवर कित्येक शूरवीरांचा जन्म झाला आहे, ही भूमी पराक्रमी व्यक्तींची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. पंजाबमधील शूरवीरांच्या कथा तर अगदी जगभर प्रसिद्ध आहेत. याच पंजाबमध्ये एक असा योद्धा होऊन गेला की ज्याच्याबद्दल ऐकल्यावर आपल्या अंगावर अक्षरशः शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.
बाबा दीपसिंह हे आजवरच्या इतिहासातील एक असे अतुलनीय योद्धा आहेत ज्यांनी आपलं डोकं धडापासून वेगळं झालं असतानासुद्धा लढणं थांबवलं नाही. याच कारणाने त्यांचं नाव पंजाबच्या इतिहासात आजही सन्मानाने घेतलं जातं.
बाबा दीपसिंह यांचे आई-वडील त्यांच्या वडिलांच्या भावासोबत आणि आई जिओनीजी यांच्यासोबत अमृतसरमधील पहुविंड या गावात राहत होते. मोठे भाऊ भगतू शेतीत काम करत. देवाच्या कृपेमुळे त्यांच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती फक्त त्यांना एक दुःख होतं की दिपसिंग यांच्या आईवडिलांना काही संतती प्राप्त होतं नव्हती.
यामुळे ते नेहमी परमेश्वराला प्रार्थना करायचे की देवाने त्यांना एखादं तरी मुल पदरात द्यावं. एके दिवशी त्यांना एक संत महात्मा भेटले ज्यांनी त्यांना सांगितले की तुमच्या पोटी एक अतिशय गुणवान मूल जन्माला येईल. त्याचे नाव हे दीपसिंह ठेवा असे त्या महात्म्यानीच सांगितलं.
पुढे जाऊन त्या संतांचं बोलणं खरं झालं आणि बाबा दीपसिंह यांचा जन्म झाला. बऱ्याच वर्षांनी घरात लहान बाळ आल्याने एकुलता एक असलेल्या बाबा दीपसिंह यांचं लहानपणी अगदी आनंदी वातावरणात गेलं. घरच्यांनी त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी जाणवू दिली नाही
पुढे जेव्हा दीपसिंग १२ वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे आईवडील त्यांना आनंदपूर साहिब इथे घेऊन गेले. इथेच त्यांची भेट शिखांचे दहावे गुरू श्री गुरू गोविंदसिंह यांच्याशी झाली. यानंतर ते काही दिवस आपल्या घरच्यांसोबत तिथे राहिले, आश्रमात सेवा केली.
जेव्हा घरी जाण्याची वेळ आली तेव्हा गुरू गोविंदसिंहांनी दीपसिंह यांना तिथेच सोडून जाण्याचे त्यांच्या आईवडिलांना सांगितले आणि गुरूंची ही आज्ञा दोघांनी पण मान्य केली.
आनंदपूर साहिबमध्ये दीपसिंहजी यांनी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शीख तत्त्वज्ञान आणि गुरुग्रंथ साहिब यांचे ज्ञान प्राप्त करून घेतले. त्यांनी गुरुमुखीबरोबरच इतरही अनेक भाषा शिकल्या. अगदी स्वत: गुरु गोविंदसिंहजींनी त्यांना घोडेस्वारी, शिकार आणि शस्त्रास्त्रे चालवण्याचे शिक्षण दिले.
हस्ते वैशाखीच्या शुभ मुहूर्तावर अमृताला स्पर्श केला आणि शीख समाजाला कायम सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतली.
यानंतर बाबा दीपसिंह गुरुगोविंदसिंह यांच्या आदेशाने ते आपल्या गावी परत आपल्या घरी आले. एक दिवस गुरुजींचा एक सेवक बाबा दीपसिंह यांच्याकडे आला. त्यानी बाबांना सांगितले की गुरुजींनी डोंगरावरच्या राजांशी युद्ध करण्यासाठी आनंदपूर साहिबचा किल्ला सोडून डोंगराच्या किल्ल्याकडे चाल केली आहे. या युद्धामुळे गुरुजींच्या आईंचे निधन झाले आहे तसेच त्यांची चारही मुले अस्वस्थ झाली आहेत.
बाबा दीपसिंह यांना ही गोष्ट समजताच ते लगेचच गुरुजींना भेटायला निघाले. बाबा दीपसिंह आणि गुरुजी यांची तळवंडी येथील दमदमा साहिबमध्ये भेट झाली.
गुरूंना भेटल्यानंतर बाबा दीपसिंहजी यांना असे कळले की चामकौरच्या युद्धात गुरुजींचे दोन पुत्र अजितसिंह आणि जुंझारसिंह शहीद झाले असून त्यांचे २ लहान पुत्र जोरावरसिंह आणि फतेहसिंह यांना सरहिंद येथे वजीरखान याने निर्घृणपणे मारून टाकलं आहे.
आपल्या जाण्यापूर्वी गुरु गोविंदसिंह यांनी गुरु ग्रंथसाहिब पूर्ण केले आणि ते बाबा दीपसिंह जी यांच्याकडे सोपवत त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांना दिली. बाबा दीपसिंहजी यांनी गुरु ग्रंथसाहिबमध्ये लिहिलेल्या सर्व ओव्या आणि शिकवणी आपल्या स्वत: च्या हातांनी पुन्हा लिहिल्या आणि गुरु ग्रंथसाहिबच्या अनेक प्रती तयार केल्या.
यापैकी प्रत्येकी एक प्रत श्री अकाल तख्तसाहिब, श्री तख्त पटनासाहिब, श्री तख्त हजूरसाहिब आणि श्री तख्त आनंदपूरसाहिब यांना पाठविली. या व्यतिरिक्त बाबा दीपसिंहजी यांनी अरबी भाषेत एक प्रत तयार केली आणि मध्य पूर्वला पाठविली.
बाबा दीपसिंह यांनी आपल्या समुदायासाठी अनेक युद्धात सहभाग घेतला. त्यापैकीच १७०७मध्ये बाबा दीपसिंहजी यांनी बाबा बंदासिंह बहादूर यांच्यासोबत पंजाबच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घेतला, पण १७१६ मध्ये शीख समाज दोन गटात विभागला. यांपैकी एक समुदाय बंदही खालसा होता, जो बंदासिंह बहादूरला शेवटचा सच्चा शीख मानत तर दुसरे टट खालसा जे गुरुजींनी रचलेल्या ग्रंथसाहिबला आपला गुरु मानत.
पुढे हा संघर्ष एवढा विकोपाला गेला की या दोन समाजात श्री हरमंदिर साहिबच्या हक्कांवरुन भांडणे झाली. यावेळी बाबा दीपसिंहनी मध्यस्थी करत दोन गटांमध्ये असणारे भांडण संपवण्याचे काम केले. त्यांनी दोन चिठ्यांवर पंथांचे नाव लिहिले आणि त्या तलावात फेकल्या. जी चिठ्ठी तरंगेल त्या गटाला मंदिराचे हक्क मिळतील. तट खालसाची चिठ्ठी तरंगली. साहजिकच बंदही खालसाला आपले हक्क सोडावे लागले.
जेव्हा १७५५ मध्ये भारतातील मोगलांची दहशत वाढली तेव्हा लोकांनी बाबा दीपसिंहजीकडे धाव घेतली. यावेळी अहमदशाह अब्दाली या अफगाण राज्यकर्त्याने भारतात मोठी नासधूस चालवली होती. अब्दालीने दिल्लीसह आसपासच्या अनेक शहरांमधून सोनं, हिरे आणि इतर वस्तूंची लूटमार तर केलीच पण जाताना हजारो लोकांना बंदी बनवून सोबत घेऊन गेला.
जेव्हा बाबा दीपसिंहजी यांना हे कळालं तेव्हा ते आपल्या सैन्याची एक तुकडी घेऊन अब्दाली ज्या ठिकाणी लपला होता तिथे पोहचले. लुटीचा माल आणि बंदी केलेले नागरिकांना घेऊन ते परत आले.
हा अपमान सहन न झाल्याने रागाच्या भरात अब्दालीने निश्चय केला की तो शीख समुदायाचा पूर्णपणे नाश करेल.
१७५७ मध्ये अब्दालीचा सेनापती जहांखान सैन्यासह हरमंदिर साहिब नष्ट करण्यासाठी अमृतसरला पोहोचला. हरमंदिर साहिब वाचवताना अनेक शीख सैनिक मारले गेले. त्यावेळी बाबा दीपसिंह दमदमा साहिबमध्ये होते. जेव्हा त्यांना या हल्ल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तत्काळ आपल्या सैन्यासह अमृतसरच्या दिशेने कूच केली.
या युद्धाच्या वेळी ते ७५ वर्षांचे होते. अमृतसर सीमेवर पोचल्यावर बाबा दीपसिंह यांनी सर्व शीखांना ही सीमा पार करण्यास सांगितले. केवळ पंथमार्गासाठी बलिदान देण्यास तयार असलेल्या शीखांनीच या सीमा पार करा असा आदेश दिला. पंथासाठी केलेले हे आवाहन ऐकताच सर्वांनी सीमा ओलांडली.
अखेर दोन्ही सैन्य गोहरवाल गावात एकमेकांना समोर येऊन भिडले. युद्धाचा बिगुल सुरू होताच सैन्य रणांगणावर उतरले. बाबा दीपसिंह आपल्या १५ किलोग्रॅम वजनाच्या तलवारीसह शत्रूवर तुटून पडले आणि अचानक मुघल सेनापती जमालखान बाबाजींच्या समोर आला. त्या दोघांमध्ये बराच काळ युद्ध चालू होते.
सरतेशेवटी दोघांनीही तलवारीने पूर्ण ताकदीने एकमेकांवर वार केले यातच त्या दोघांचेही डोके धडापासून वेगळे झाले.
बाबाजींचे डोके धडापासून वेगळे पाहून एका तरुण शीख शिपाई जोरात ओरडला आणि त्याने बाबाजींना आवाज दिला यावेळी त्याने दिपसिंग बाबांना आपल्या शपथेची आठवण करून दिली.
यानंतर बाबा दीपसिंहजींचे धड पूर्णपणे उभे राहिले. त्यांनी आपले डोके वर उचलले आणि आपल्या तळहातावर ठेवत तलवारीने शत्रूंवर वार करत श्री हरमंदिर साहिबच्या दिशेने चाल केली.
बाबाजींना पाहून उपस्थित शिख सैनिक प्रचंड प्रोत्साहित झाले तर शत्रू भीतीने सैरावैरा पळून गेले. शेवटी बाबा दीपसिंहजी श्री हरिमंदिर साहिब येथे पोहोचले आणि त्यांच्या स्वतःला प्रदक्षिणा घालूत आपले प्राण अर्पण केले.
बाबा दीपसिंहजी यांचे हे बलिदान संपूर्ण शीख पंथांचे आदर्श बनले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.