आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
वर्षानुवर्षे चालत आलेल्या पध्दतीला विरोध करायचा म्हणजे स्वत:च्या तत्वांवर अमाप विश्वास असावा लागतो. क्रांतीकारी विचारांच्या झाडाची वाढ ते रोपटे असतानाच करण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी आपल्या विचारांची मुळे खोलवर जमिनीत रुतलेली असावी लागतात. म्हणुनच असा क्रांतीकारी बदल घडवून आणणारे खुप कमी व्यक्ती जगात दिसतात.
भारतीय शिक्षणप्रणाली आता कालबाह्य झालीय असे बोलणारे लोक भरपुर आहेत. परंतु आत्ताच्या शिक्षणप्रणालीला पर्याय म्हणुन दुसरी एखादी पध्दत सुचवा असे म्हटले की हे लोक शांत होतात. याच पारंपारीक आणि कालबाह्य शिक्षणपध्दतीला पर्याय म्हणुन आधुनिक शिक्षणाची कास धरायचा सल्ला आणि प्रात्यक्षिक भारताला दाखवलं ते लडाखमधील एका वैज्ञानिकाने.
त्या वैज्ञानिकाचे नाव आहे सोनम वांगचुक. तेच सोनम वांगचुक ज्यांच्यापासुन प्रेरित होऊन थ्री इडीयटस नावाचा सुप्रसिद्ध चित्रपट बनवला गेला.
सोनम वांगचुक यांचा जन्म १९६६ मध्ये लेहमध्ये झाला. गावात शाळा नसल्यामुळे त्यांना ९ वर्ष शाळेची पायरी चढता आली नाही. ९ वर्षाचे झाल्यानंतर त्यांना श्रीनगरच्या शाळेत दाखल करण्यात आले. सुरुवातीपासुनच पारंपारिक शिक्षणात त्यांना रस नव्हता. त्यातच श्रीनगर म्हणजे त्यांना आपल्या गावापेक्षा खुप वेगळे भासत होते. आपल्या काकांच्या घरी राहुन त्यांनी १८ महिने श्रीनगरच्या शाळेत राहुन शिक्षण घेतले.
वडीलांच्या राजकीय कारकिर्दीचा परिणाम म्हणुन ते काश्मीरमध्ये आले. तिथे त्यांना हिंदीसोबतच इंग्लिश आणि उर्दू भाषा हे विषय पण शिकवले जात होते. परंतु सोनम यांना या विषयांचे काहीच ज्ञान नव्हते आणि ते शिकण्याचा रसही नव्हता. सोनम या विषयांच्या तासाला वर्गात कमी आणि बाहेरच जास्त दिसत असत. शिक्षकही त्यांच्यावर राग दाखवत असत. म्हणुन सोनम यांना त्रास होत होता.
यालाच कंटाळुन शेवटी सोनम यांनी एकटेच दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच एकटे प्रवास करत असताना विशेष केंद्रिय विद्यालयात प्रवेश मिळवणे हे एकच ध्येय त्यांच्या समोर होते. सीमेवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यालय होते. दाखला मिळवण्यासाठी सोनमने तेथील प्राचार्याना विनंती केली. सोनम यांची शिकण्याची इच्छा बघुन प्राचार्यांनी त्यांना विद्यालयात प्रवेश दिला.
दिल्लीमध्ये त्यांचं मन लवकर रमलं. येथील शिक्षक त्यांना अभ्यास करण्यासाठी तसेच बाकीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहीत करत होते. इथेच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास सुरुवात झाली. १
०वीत असताना आपल्याला अभ्यासक्रम चांगला कळला नाही म्हणुन पुन्हा परीक्षा देण्याचा विचार त्यांनी केला. पहिला क्रमांक मिळवण्यापेक्षा अभ्यासक्रम पूर्णपणे समजुन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. याचमुळे दहावीचा अभ्यासक्रम पुन्हा शिकण्याचा त्यांनी घेतला. परंतु वडीलांकडुन याला स्पष्ट विरोध असल्याने त्यांनी ५८ टक्के गुण मिळवून परीक्षा उत्तिर्ण केली.
१२ वीची परीक्षा त्यांनी जम्मुच्या मॉडेल अकादमी येथुन दिली. त्यानंतर त्यांनी अवतल आरशावर काम करण्यास सुरुवात केली. आपल्या जवळच्या घरांमध्ये असलेला अंधार घालवण्यासाठी या आरशाचा ते वापर करणार होते. त्यात त्यांना यश आले नाही तेव्हा त्यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला तर ते अवतल आरसा बनवू शकतात असे त्यांच्या काकांनी सांगितले.
आता सोनम यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. श्रीनगरच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे ठरले. त्यांच्या वडीलांनी त्यांना स्थापत्य विभागात प्रवेश घेण्यास सांगितले. परंतू सोनम यांनी वडीलांच्या विरोधात जाऊन यांत्रिकी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. मुलाचा हा निर्णय ऐकुन वडीलांना राग आला. त्यांनी सोनम यांना पैसे न देण्याचा निर्णय घेतला.
अशा वेळी त्यांनी मुलांना शिकवून पैसे उभे करण्याचे ठरवले. ३०० रुपयांची गरज असताना त्यांनी २ महिन्यात १७,००० रुपये उभा केले. विद्यालयात शिकत असतानाच त्यांनी एक टाइपराईटर, सायकल आणि संगीत वाद्य बनवले. त्यातुन त्यांनी सकाळी उठण्यासाठी गजर बनवला. हा गजर त्यांना उठवण्यासाठी चेहऱ्यावर पाणी मारत असे. अशी नवनिर्मितीची आवड त्यांच्यातील पुढच्या वैज्ञानिक दृष्टिकोनास पुरकच ठरणार होती.
१९८७ मध्ये त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली.
पदवी घेतल्यानंतर त्यांनी लडाखमध्ये आपला भाऊ आणि ५ सहकाऱ्यांच्या मदतीने SECMOL (Students Educational and Cultural Movement of Ladakh) ची स्थापना केली. शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी त्यांनी उचलली. यात यश न आल्यामुळे त्यांनी शिक्षणपध्दतीत सुधारणा करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आधी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे ठरवले.
विद्यार्थ्यांना शिकवताना त्या शिक्षणाचा भार वाटायला नको म्हणुन त्यांनी हसत खेळत शिक्षणाची संकल्पना शिक्षकांमध्ये रुजवली. ही पध्दत अतिशय मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली.
नेहमी बर्फाच्छादित असलेल्या लडाखमध्ये उन्हाळ्यात बर्फ वितळल्यानंतर पाण्याची समस्या उभा राहत होती. याच्यावर काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सूर्याची किरणे थेट बर्फावर पडली तर बर्फ जास्त वेगाने वितळतो हे त्यांनी हेरले. यातुन त्यांना ‘ग्लेशियर स्तुप’ची संकल्पना सुचली. बर्फाचे एकावर एक थर साठवत बर्फाचा वितळण्याचा दर त्यांनी कमी केला. यातुनच २०१३ साली त्यांनी १.५ लाख लिटर पाणीच्या बर्फाचा ६ फुट उंच स्तुप बनवला. त्यांच्या या प्रयत्नातूनच त्यांनी लडाखमध्ये १० लाख लिटर पाणी पुरवले आहे.
सोनम फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर देशहिताच्या अनेक कामांसाठी आज ओळखले जात आहेत. आपल्या ज्ञानाचा योग्य फायदा देशाला व्हावा याचा ते पुरेपुर प्रयत्न करत आहेत.
आत्ताच भारत-चीनमध्ये झालेल्या सीमा तणावात सामान्य जनता देशाची मदत कशी करु शकते यासाठी त्यांनी काही व्हीडिओ बनवून प्रदर्शित केले. यात चायनीज उत्पादनांना निर्बंध घालण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
सोनम वांगचुक यांची योग्य स्पष्टीकरण देण्याची पद्धत भारतीय नागरीकांना भावली. चायनीज उत्पादने आपोआप कमी वापरली जाऊ लागली. मोबाईलमधील चायनीज उत्पादनांवर आलेले निर्बंध तसेच ‘ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तानुसार भारतीय ग्राहक चायनीज उत्पादनांचा वापर कमी करत आहेत हे सिध्द झाले आहे.
यावर आपले मत व्यक्त करताना सोनम म्हणतात, “आपण सोडलेले औषध अतिशय योग्य जागी पोहचत आहे. यावेळी लोकांनी दिलेल्या प्रतिसादाचेच हे फळ आहे.”
आपल्या अशा अनेक देशहितांच्या कामासाठी सोनम यांना रेमन मैगसेसे पुरस्कार प्रदान केला गेला आहे. स्वप्न बघताना कसलेही बंधन नसावे हे त्यांचं मत आहे. पोहायचंच असेल तर तळ्यात का? समुद्रात का नाही? ही विचारसरणी घेऊन त्यांनी आपले आयुष्य जगले आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भारत देश नेहमीच त्यांचा ऋणी राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.