आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
असं म्हणतात की या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक असतात जे जगण्यासाठी खातात तर दुसरे खाण्यासाठी जगतात. तर सांगायची गोष्ट अशी की मी दुसऱ्या प्रकारातला माणूस आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. अर्थातच अभिमान वाटावं असं त्यात काही नाही. पण खाताना विचार करून खाणारे लोक पाहिले की स्वतःलाच समाधान वाटतं.
आजचा आमचा हा लेख खाद्यभ्रमंती या विषयावर आहे आणि या खाद्यभ्रमंतीमध्ये आपण जाणार आहोत अहिल्यानगर शहरातल्या मांसाहारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॉटेल संदीप येथे. हे हॉटेल एवढं प्रसिद्ध का आहे हे जर तुम्हाला जाणून घेऊया.
अहिल्यानगर शहराला पुरातन काळापासून ऐतिहासिक वारशासोबतच अत्यंत सुंदर अशी खाद्यसंस्कृतीसुद्धा लाभली आहे. आणि त्याचे नमुने तुम्हाला अहिल्यानगर शहरात पहायला मिळतात.
अशाच अहिल्यानगर शहरातील खाद्यसंस्कृतीचा एक घटक म्हणजे हॉटेल संदीप. पुण्याच्या बाजूने शहरात जाताना केडगाव नावाचा भाग आहे तिथे हे हॉटेल आहे. साधारण एक एकर जागेत असणारं हे हॉटेल तिथल्या मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहे.
अहिल्यानगर शहराचा केडगाव हा एक भाग आणि या भागात ३२ वर्षांपासून दर्जेदार खाद्यसेवा पुरवणारे हे संदीप हॉटेल. या हॉटेलची सुरुवात झाली ती १९८७ साली. त्या काळात जेव्हा लोकांचं जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याचं प्रमाण खूपच कमी होतं.
हॉटेलचे मालक भानुदास कोतकर यांनी सुरवातीला या छोट्याश्या जागेत दोन मजली बिल्डिंग बांधली. या बिल्डिंगमध्ये वरती राहण्याची सोय होती तर खाली जेवण्याचा हॉल होता.
हॉटेल महामार्गावर असल्या कारणाने आपल्याकडे येणारे ग्राहक हे केवळ शहारातीलच नाही तर बाहेरगावातून येणारे खवय्येसुद्धा आहेत ही गोष्ट हॉटेलच्या मालकांना माहिती होती. या ग्राहकांना आपण कसं आकर्षित करू शकतो यावर त्यांनी जास्त लक्ष दिलं.
जे पदार्थ इतर कुठेही मिळत नाही ते पदार्थ आपल्या ग्राहकांना द्यायचे हा त्यांनी मनाशी निर्धार केला आणि नवनवीन पदार्थांच्या चाचण्या घेतल्या. यातले काही पदार्थ अत्यंत चवदार होते, तर काही पदार्थ वायासुद्धा जायचे. असे बरेच प्रयोग होत असत आणि याच प्रयोगातून निर्माण झाली ती हॉटेल संदीपची प्रसिद्ध असणारी मटण डिश ज्याला उक्खर असं म्हणलं जातं.
उक्खर म्हणजे काय तर मटणाच्या भाजीत जे मांसाचे तुकडे असतात ज्यांना पीस वगैरे म्हटलं जातं अश्या या मटणाच्या फोडींच्या भाजीला उक्खर असे म्हणतात.
हा उक्खर नावाचा पदार्थ तयार करताना बोकडाचे मटण उकडले जाते व उकडताना त्यात हळद घातली जाते ज्यामुळे त्याला पिवळा रंग येतो. या पदार्थाला तयार करताना त्यात आचारी त्यांचे स्वतःच्या सूत्राने तयार केलेले स्पेशल मसाले वापरतात ज्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते. हे उक्खर तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत गावरान तूप घालून खाऊ शकता.
या हॉटेलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे मिळणाऱ्या अप्रतिम काळ्या मसाल्यातल्या महाराष्ट्रीयन भाज्या. हा काळा मसाला म्हणजे तुम्हाला फक्त नगरमध्येच मिळणार. कांदा पूर्ण भाजून त्याची पेस्ट केली जाते, आणि त्या ग्रेव्हीमध्ये काही विशिष्ट मसाले वापरून ही काळ्या मसाल्यातली भाजी तयार होते. या भाजीवर गावरान तुप टाकून भाकरीसोबत खायला एक वेगळीच मजा आहे.
इथली अजून एक वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टींची उपलब्धता आणि ग्राहकांना मिळणारी सेवा. तुम्हाला इथे ५ प्रकारच्या रोटी मिळतात. (या ५ मध्ये भाकरीसुद्धा समाविष्ट आहे) तुम्हाला गावरान तुपाची वाटी दिली जाते. इथे तयार होणाऱ्या भाज्या या शक्यतो ग्राहक तूप घालून खातात हे गृहीत धरून भाज्या केल्या जात असल्याने त्या भाजीत तूप घातल्यावर त्याची चव कितीतरी पटीने बदलते.
हॉटेलच्या बाबतीत ग्राहकांना सर्वांत महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे तिथे त्यांना मिळणारी सर्व्हिस. या सर्विसच्या बाबतीत मला तरी नाही वाटत की अवघ्या महाराष्ट्रात इथल्या स्टाफचा कोणी हात धरू शकेल. इथे तुम्हाला प्रशस्त हवी तशी बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. जेवण खोलगट व्यवस्थित परातीसारख्या असणाऱ्या पितळी असं म्हणाल्या जाणाऱ्या प्लेटमध्ये वाढलं जातं. इतकंच काय तर गरमागरम भाकरी तुमच्या ताटात कुस्करूनसुद्धा दिली जाते.
इथे असणारा प्रतिसाद पाहून जे शुद्ध शाकाहारी ग्राहक आहेत त्यांच्यासाठी त्याच भागात १०० मीटरच्या अंतरावर याच मालकांनी अजून एक शुद्ध शाकाहारी हॉटेल बांधलंय. तिकडेसुद्धा ग्राहक आले तेसुद्धा व्यवस्थित चालतं पण तरी सुद्धा या हॉटेलच्या ग्राहकांवर त्याचा काहीच फरक पडला नाहीये.
संदीप उद्योग समूहाचे हॉटेल संदीप सोबतच आणखी सुद्धा ३ हॉटेल आहेत आणि ते नगर पुणे महामार्गावरच असून पण इथे जेवण केलेले लोकं पुन्हा इथेच येतात
लोक पुण्यातल्या वैशाली/ रूपाली यांच्यासारख्या रेस्टॉरंटचं वेटिंगच्या बाबतीत उदाहरण देत असतात पण इथे एकाच वेळी ४०० लोक जेवण करू शकतील एवढी व्यवस्था असूनसुद्धा संध्याकाळी इथे वेटिंग असतं. ग्राहक इथे कितीही वेळ थांबावं लागलं तरी थांबतात पण दुसरीकडे जात नाहीत. यावरून तुम्हाला याची लोकप्रियता लक्षात येईल.
त्या काळात केवळ एका बिल्डिंगमध्ये असणारं हे हॉटेल आता अतिशय प्रशस्त झालं आहे. वाढते ग्राहक पाहता लॉज बंद करून तिथेसुद्धा डायनिंग हॉल झाला आहे. सुरवातीला १० गुंठ्याच्या जागेत असणारे हे हॉटेल आता एक एकराच्या जागेत प्रशस्त पार्किंगसह विस्तारलं आहे.
या हॉटेलमध्ये १०० टेबल असून एका टेबलावर साधारण ४ लोक बसतात आपण हा हिशेब केला तर एकाच वेळी सुमारे ४०० लोक जेवतील एवढं प्रशस्त हॉटेल आहे. इथे असणारा १५० लोकांचा स्टाफ रोज येणाऱ्या किमान २००० लोकांना तृप्त करतो.
जर आपण आर्थिक दृष्टीने याकडे पाहायचं झालं तर एक माणूस हॉटेलमध्ये जेवला तर साधारण ३०० रुपये इतका खर्च सहज होतो. आणि असे २००० लोक जर रोज जेवण करत असतील तर सरासरी सहा लाख रुपये इतकी उलाढाल इथे एका दिवसात होत असावी असं दिसतं. या आकड्यांवरून तुम्हाला कदाचित याच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल.
जेव्हा तुम्ही अहिल्यानगर मार्गे प्रवास कराल तेव्हा इथे एकदा नक्की भेट द्या व अप्रतिम मांसाहारी जेवणाचा आस्वाद घ्या.
पत्ता – हॉटेल संदीप, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.