आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
इतिहास वाचयला जितका सहज आणि आनंद देणारा असतो तितकाच तो संशोधनासाठी किचकट आणि गुंतागुंतीचा असतो. इतिहाससंशोधन करण्याची विविध साधनं, कागदपत्रं, पुरावे, बखरी, यांचा अभ्यास करून ऐतिहासिक घटनाक्रम मांडणे व सबंध इतिहास उभा करणे हे काही सोपं काम नाही.
कादंबरीकाराने सांगितलेला इतिहास आणि इतिहासकाराने सांगितलेल्या इतिहासात फरक असतो. कादंबरीकार इतिहासाचं कल्पनारंजन करू शकतात पण इतिहासकारांना तसं करून चालत नाही.
एखाद्या व्यक्तीचं चित्रण करण्यासाठी त्याच्या सर्व पैलुंना जगासमोर आणण्यासाठी इतिहासकाराला सबळ संदर्भांचा आधार द्यावा लागतो.
भारतात इतिहासलेखनाच्या बाबतीत अनेक इतिहासकारांची नावं प्रामुख्याने घेतली जातात. त्यात मराठ्यांचा आणि मुघलांच्या इतिहासाचं लेखन करणाऱ्या लोकांत जे तीन नाव प्रामुख्याने घेतली जातात ते म्हणजे रियासतकार गो. स. सरदेसाई, रघुबीर सिंघ आणि सर यदुनाथ सरकार.
या तिन्ही लोकांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर इतकं विपुल लेखन केलं आहे की आजही कुठल्या नव्या इतिहाससंशोधकाला या तीन इतिहासकारांच्या संदर्भांना सोडून मध्ययुगीन इतिहासावर लेखन करता येत नाही.
यदुनाथ सरकार यांनी केलेल्या इतिहास संशोधनाच्या कार्याने भारतातील इतिहासाचं स्वभावचित्रच बदलून टाकलं होतं. त्यांनी केलेल्या निष्पक्ष इतिहास मांडणीने ते डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंच्या इतिहासकारांच्या टीकेचे धनी बनले.
पण त्यांनी मांडलेल्या इतिहासाचं खंडन करणारी साधनं त्यांचे टीकाकार कधीच देऊ शकले नाहीत आणि ज्यांनी त्यांनी लिहलेल्या इतिहासाचे खंडन केले त्याने कधी त्यांच्यावर द्वेषपूर्ण टीका केली नाही.
इतिहास लेखनातील दीपस्तंभ म्हटलं जावं असं कार्य यदुनाथ सरकारांनी इतिहास लेखनात केलं आहे.
महाराष्ट्राच्या मातीत वीर म्हणून गौरविल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहचवण्याचं कार्य यदुनाथ सरकारांनी केलं. त्यांनी १९१९ साली लिहलेल्या शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथाने शिवरायांच्या चरित्राला जगभरात ओळख मिळवून दिली.
सुरतेची लुट केल्याच्या रागातून उत्तर भारतात ‘एक लुटेरा’ असं संबोधन जे लोक छत्रपतींसाठी वापरायचे, त्यांचा सबंध दृष्टीकोन बदलण्याचे कार्य यदुनाथ सरकारांनी केले आहे.
भारतावर दीर्घकाळ शासन करणारा मुघली शासक आणि छत्रपती शिवरायांचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या औरंगजेबाच्या इतिहासाचे पुनर्लेखन करून त्या संदर्भातील फारसी कागदपत्रे वाचून काढत पाच खंडात औरंगजेबाचे चरित्र लिहण्याचं एक अत्यंत उदात्त कार्य सर यदुनाथ सरकारांनी केलं आहे.
औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याचा अंत कसा झाला आणि त्याची कारणं काय होती, यावर यदुनाथ सरकारांनी विपुल लेखन केलं. त्यांनी ‘फॉल ऑफ मुघल एम्पायर’ या नावाने ४ खंडाचं पुस्तक लिहलं आहे.
मुघलांच्या काळातील अर्थव्यवस्था, त्यांचे ब्रिटिशांशी असलेले संबंध, नादिरशहा याबरोबरच जयपूर शहराचा इतिहास, भारतीय सैन्याचा इतिहास असे विपुल लेखन यदुनाथ सरकारांनी केले.
यदुनाथ सरकारांचा जन्म १० डिसेंबर १८७० रोजी बंगालच्या कांचमारिया गावात एका जमीनदाराच्या पोटी झाला. त्यांनी कोलकाताच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून आपले एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते.
१८९३ साली ते कोलकात्याच्या रिपन कॉलेजला इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे ते कोलकात्याच्याच प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
इतिहासात असलेल्या रसामुळे त्यांनी इतिहासाची संसाधनं वाचायला सुरूवात केली. त्यांनी आयुष्याची पंचवीस वर्षे इतिहास अभ्यासावर खर्च केले.
त्यांनी १९१७ ते १९१९ साली बनारस हिंदू विद्यापीठात आधुनिक इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यांच्या इतिहास लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मुघलांच्या इतिहासकारांप्रमाणे इतिहासाची मोडतोड न करता सरळ समोर आणला, त्यांनी औरंगजेबाचं उभं केलेलं रूप, मार्क्सवादी इतिहासकारांना रुचलं नाही.
औरंगजेबाची क्रू*रता आणि त्यांचं विघातक कार्य याचा परिचय जगाला यदुनाथ सरकारांनी करून दिला. औरंगजेबाच्या शिया मुस्लिमांप्रती असलेल्या व्यवहारावर यदुनाथ सरकारांनी तीव्र शब्दात टीका केली आहे.
यदुनाथ सरकारांनी शिवचरित्रातील मुस्लिमांच्या योगदानावर भाष्य केली असल्याने, हिंदुत्ववाद्यांनी देखील त्यांना फारसं आपलंस केलं नाही. पण यामुळे त्यांच्या संशोधनावर आणि त्यांनी केलेल्या इतिहासाच्या मांडणीवर परिणाम झाला नाही.
यदुनाथ सरकारांनी केलेली इतिहासाची मांडणी निरपेक्ष होती, म्हणूनच ती टीकेची धनी बनली.
यदुनाथ सरकारांचे रियासतकार गो.स. सरदेसाईंशी चांगले संबंध होते. रियासतकारांनी मध्ययुगीन इतिहासावर केलेल्या विपुल लेखनाचे ते चाहते होते. रियासतीचं इंग्रजी भाषांतर करण्याचा आग्रह यदुनाथ सरकारांनी रियासतकारांच्या मागे धरला होता. त्यांनी रियासतकारांना मुघल साम्राज्याची साधने अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली होती. त्याचप्रमाणे सरदेसाईंनी पेशवे दफ्तर यदुनाथ सरकारांना खुले करून दिले.
असं म्हणतात की यदुनाथ सरकार कितीतरी वेळ रियासतकारांच्या ग्रंथालयात पुस्तके आणि ऐतिहासिक दस्तावेजांचे वाचन कऱण्यात घालवत असत.
शिवाजी महाराजांचे इंग्रजी चरित्र लिहण्यासाठी रियासतकरांनी मोठी मदत यदुनाथ सरकारांना केली होती.
यदुनाथ सरकार यांचे इतिहास संशोधन क्षेत्रातले योगदान इतके मोठे होते की याची दखल ब्रिटनचा राजा जॉर्ज पंचमने घेतली होती. त्यांना १९२९ साली ‘ऑर्डर ऑफ द एम्पायर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना ‘सर’ हा किताब बहाल करण्यात आला होता.
यदुनाथ सरकारांचे जीवन हे संपूर्णपणे इतिहासाला समर्पित जरी होते, तरी त्यांनी अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. ते १९२६ साली कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
त्याआधी १९२३ साली त्यांना बहुप्रतिष्ठित अशा रॉयल सोसायटीचे मानद सदस्यत्व मिळाले. ते ब्रिटिश विधान परिषदेचे सदस्य होते.
यदुनाथ सरकार हे खऱ्या अर्थाने इतिहासमहर्षी होते. त्यांच्या मृत्यूनंतर इतिहास संशोधनाच्या कार्यावर कुठलाही परिणाम होऊ नये आणि ते निरंतरपणे सुरु रहावे अशी तरतूद त्यांनी केली होती.
१९ मे १९५८ साली जेव्हा यदुनाथ सरकारांचे निधन झाले तेव्हा त्यांचं राहतं घर सरकारला देऊ केलं. आज त्यांच्या कल्पनेनुरुप समाजशास्त्र अभ्यासाचे केंद्र तिथे आहे. त्यांचं खाजगी ग्रंथालय आज इतिहास अभ्यासकांची पंढरी बनलं आहे.
या महान इतिहासकाराने एखाद्या उदात्त हेतूला उराशी बाळगून आयुष्य त्याला वाहण्याची एक अत्यंत उदात्त अशी प्रेरणा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या नवतरुणांना दिली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.