आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपला भारत हा असा देश आहे जिथे विविध जातीधर्माचे लोकं राहतात. असे म्हणले जाते की भारतात १८ पगड जातींचे वास्तव्य आहे. आता एवढे जातीधर्म आले म्हणजे साहजिकच वैचारिक, अध्यात्मिक संप्रदाय येणारच.
तर आज आपण अशाच एका संप्रदायाची सुरुवात जिथे झाली, त्या ठिकाणाची माहिती घेणार आहोत. हे एक असं ठिकाण आहे जिथे नाथसंप्रदायाची पायाभरणी झाली.
सहसा हिंडणे-फिरणे वगैरे शब्द समोर आले की आपल्या मनात काय येतं? डोंगर, समुद्रकिनारा किंवा एखादी विशिष्ट जागा. खूपदा तर असही होतं की आपण शांतीच्या शोधात असतो, आपल्याला एकांत अनुभवायला जायचं असतं आणि जे की आजच्या घडीला खूप अवघड आहे. जर तुम्हाला सुद्धा असं एकांतात शांततामय वातावरणात फिरायला जायचं असेल तर आमचा हा लेख तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरेल, कारण या लेखाच्या माध्यमातून आपण गोरखनाथ मंदिर, त्या परिसराची व नाथसंप्रदायाची माहिती घेणार आहोत.
दिल्लीपासून ७०० किलोमीटर अंतरावर असणारं उत्तरप्रदेशातील गोरखपूर हे शहर. या शहरात तुम्ही रेल्वे, विमान किंवा बस अशा हव्या त्या वाहनाने जाऊ शकता. हे शहर अजूनही एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ती गोष्ट म्हणजे गीताप्रेस. गीताप्रेस ही एक अशी प्रेस आहे ज्यांची पुस्तकं घराघरात वाचली जातात.
असं म्हणलं जातं की नाथ समुदाय हा भगवान महादेवांनी स्थापन केलेला समुदाय आहे. गुरु मच्छिन्द्रनाथ हे महादेवाचे शिष्य होते व नंतर त्यांनी आपले ज्ञान शिष्य गोरखनाथ यांना दिले.
हा एक असा समुदाय होता ज्या समुदायात १२ शाखा होत्या. या समुदायाच्या लोकांना कानाला छिद्र पाडावे लागत असल्याने त्यांना कानफाटे किंवा गोरखनाथांचे अनुयायी असल्याने गोरखनाथी म्हणून ओळखलं जायचं. नंतर गोरखनाथांच्या अनुयायांनी आपल्या नावात नाथ लावणे सुरू केले. इथे ब्राह्मणांच्या सोबतच एक असा समाज स्थापन झाला की ज्यात बौद्ध व शैव लोक मोठ्या संख्येने अस्तित्वात होते.
गोरखनाथांनी आपल्या सगळ्या अनुयायांना घेऊन एक मार्ग तयार केला. या मार्गावर मुस्लिम धर्मीय सुद्धा मोठ्या संख्येने होते. त्यांनी ब्राह्मण्यवाद व बौद्ध धर्मात असणारी कट्टरता या गोष्टींना विरोध केला. त्यांनी हिंदू-मुस्लिम एकतेची पायाभरणी केली. आणि जातीपातीशी जोडलेल्या गोष्टींना विरोध केला. हे एक कारण होतं की ज्याने नाथसंप्रदायात खूप सारे लोक येऊन जोडले गेले. हे असे लोकं होते ज्यांनी आपल्या आयुष्यात खूप भेदभावाचे चटके सहन केले होते.
गोरखनाथ बाबांचे काही वाक्यं असे होते की त्या वाक्यांवर ओशो मनभरून प्रवचन देत असतं. याच गोराखनाथांचा संत कबीर, सुफी कवी मुल्ला दाऊद यांच्यासारख्या संतांवर प्रभाव होता.
ओशो असं सांगायचे की महाकवी सुमित्रानंदन पंत यांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता. भारताच्या धार्मिक बाबतीत असे कोण लोकं होते ज्यांचे नाव आज अजरामर आहे असा तो प्रश्न होता. यावर ओशोंनी कृष्ण, पतंजली, बुद्ध, नागार्जुन, कबीर, गुरु नानक, मीरा, रामकृष्ण यांची नावे घेतली होती. या नंतर सुमित्रानंदन यांनी असं सांगितलं की यातले मला फक्त ३ महत्वाचे नावं सांगा. तर यावर ओशो म्हणाले की ते शक्य नाही. यावर पंतांनी असे का म्हणून विचारलं, तेव्हा ओशो सांगतात की जर गोरखनाथ नसते तर कबीर, मीरा, नानक, वजीद, फरीद असं कोणीच नसलं असत. म्हणून केवळ ३ नावे अशक्य आहेत.
अंतरात्म्याचा शोध घेऊन त्याचं ऐकायचं व त्याची अनुभूती घ्यायची ही गोरखनाथ यांची शिकवण असल्याने सर्व धर्मात त्यांचे शिष्य होते.
नाथ परंपरेची स्थापना गुरू मच्छिन्द्रनाथ यांनी केली. त्यांनी स्थापन केलेला हा मठ गोरखपूर जिल्ह्यात आहे. नंतर तिथे हे मंदिर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी तयार करण्यात आलं होतं आणि विशेषतः हे मंदिर त्या जागेवर आहे जिथे ते वास करत होते. गुरू मच्छिन्द्रनाथ हेच नाथसंप्रदायाला जन्म देणारे गुरू आहेत व नंतर त्यांनी गोराखनाथांना आपले शिष्य करून योगविद्या देण्याचे आश्रम अनेक ठिकाणी उघडले.
या जागेला तपस्थळीची ख्याती प्रसिद्ध आहे. असे म्हणले जाते की मच्छिन्द्रनाथांनी शक्तीपीठ देवीपाटण येथे तपश्चर्या केली होती. त्यांना देवीपाटण व पाटेश्वरी पिठाच्या स्थापनेचे सुद्धा श्रेय जाते.
शक्तीपीठ देवीपाटण, नेपाळचा चौघडा व गोरखनाथ मंदिर या तिन्ही जागा आज आहेत, पण गोरखनाथ मंदिर यात जास्त महत्वपूर्ण आहे. कारण आजही तिथे गोरखनाथांची समाधी आहे व तिचे दर्शन घेण्यास लोक दुरून येत असतात.
या मंदिराशी एक खूप चांगली गोष्ट म्हणजे अशी की इथे मकरसंक्रांतीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने लोकं येतात. इथे मोठा भंडारा असतो व गोरखनाथ बाबांना खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी सर्वात आधी नेपाळच्या राजघराण्याकडून बाबांना खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो व हे पर्व संपल्यानंतर मग राजाच्या घरी प्रसाद पाठवला जातो. ही परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आली आहे.
गोरखपूर मध्ये असणाऱ्या या मंदिराचा इतिहास बराच आकर्षक आहे. ही जागा नाथसंप्रदायाचे प्रतिनिधित्व करते. इथे आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती मिळते. आध्यात्मिक समाधान मिळवायचे असेल तर इथे नक्की या आणि स्वर्गीय शांततेची अनुभूती घ्या.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.