आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
महाराष्ट्रात कायमच काका पुतण्याच्या संघर्षांच्या चर्चा चवीने चघळल्या जातात. मग ते बाळासाहेब ठाकरे – राज ठाकरे असो किंवा शरद पवार – अजित पवार किंवा गोपीनाथराव मुंडे – धनंजय मुंडे असोत. खरंतर शरद पवार यांना राजकारणाच्या आखाड्यातील एक तेल लावलेला पहिलवान म्हणून ओळखले जाते. म्हणूनच काका-पुतण्यातील हा वाद खरच किती गांभीर्याने घ्यावा याबद्दलही महाराष्ट्रातील जनता साशंक आहे.
परंतु महाराष्ट्रातील राजकीय मैदान गाजवणारी काका-पुतण्याची ही जोडी नाही. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या काका-पुतण्याच्या जोडीचीही एकेकाळी बरीच चर्चा होती. शिवसेना प्रमुखांनंतर राज ठाकरे यांच्याकडेच बाळासाहेबांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात असे. राज ठाकरे यांची बोलण्याची आक्र*मक शैली, त्यांची देहबोली, त्यांचा बेदरकारपणा, शिवसैनिकांवरची त्यांची पकड आणि दरारा या सगळ्याची तुलना बाळासाहेबांशी होत असे.
याशिवाय, त्या दोघांच्यात बरेच साम्य होते. परंतु, बाळासाहेब आणि राज यांच्यात काही मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचे राजकीय वारसदार म्हणून राजकारणात आले.
राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा स्वतंत्र पक्ष काढला.
त्याआधी उद्धव यांच्या राजकीय कारकिर्दीची कसलीच चर्चा ऐकायला मिळत नव्हती. पण, अपघाताने राजकारणात आलेले उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. ज्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हयातभर बाळासाहेबांनी टीका केली, त्याच पक्षांसोबत युती करून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
परंतु, याच महाराष्ट्रात काका-पुतण्याची अशीही एक जोडी होऊन गेली आहे, ज्यांचे रेकॉर्ड तोडणे कुणालाच शक्य झालेले नाही. ही जोडी म्हणजे वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांची. या काका-पुतण्याच्या जोडीने जे रेकॉर्ड केले ते तोडणे कुणालाच शक्य झालेले नाही.
वसंतराव फुलसिंग नाईक यांनी १९६३ पासून १९७५ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहणारे ते एकमेव मुख्यमंत्री आहेत. नाईक यांचा हा रेकॉर्ड तोडणे कुणालाही शक्य झाले नाही. वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रात हरितक्रांतीचे जनक मानले जाते.
सलग दोनदा मुख्यमंत्रीपद भूषवणारे एक एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत. अर्थात, देवेंद्र फडणवीस यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी, त्यांचा का कार्यकाळ केवळ काही तासांचा होता.
१८ ऑगस्ट १९७९ रोजी वसंतराव नाईक यांचे सिंगापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर होते. त्यांच्यापूर्वी शरद पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
सुधाकरराव नाईक यांच्या कारकिर्दीतच मुंबई साखळी बॉ*म्बस्फो*टाने हादरून गेली होती. यावेळी सुधाकरराव हे महाराष्ट्राची आणि विशेषत: मुंबईची स्थिती हाताळण्यास असमर्थ असल्याचे मानून त्यांना या पदावरून हटवण्यात आले.
त्यांच्यानंतर पुन्हा शरद पवार यांनाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले. त्यावेळी केंद्रात पी. व्ही.नरसिंहराव यांचे सरकार होते आणि शरद पवार या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. परंतु त्यांना मुंबईतील स्थिती हाताळण्यासाठी केंद्रातून पुन्हा राज्यात पाठवण्यात आले.
यानंतर ३० जुलै १९९४ रोजी सुधाकरराव नाईक यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आले. १७ सप्टेंबर १९९५ पर्यंत ते हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदावर कार्यरत होते.
सरपंच पदापासून सुरु झालेली त्यांची राजकीय कारकीर्द राज्यपाल पदापर्यंत पोहोचली. त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबीनेट मंत्री अशी पदेही भूषवली. यातही त्यांनी कृषी मंत्र्यापासून ते गृहनिर्माण मंत्र्यापर्यंतची खाती सांभाळली.
थोडक्यात राजकारणातील असे एकही पद राहिले नसेल जे सुधाकरराव नाईक यांनी भूषवले नसेल.
पुसद विधानसभेतून ते सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मुंबई दंग*लीच्या वेळचे एक अपयशी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ ओळखला जातो. या दं*गलीसाठी न्या. श्रीकृष्णा आयोगने सुधाकरराव नाईक यांच्या सरकारलाच दोषी मानले.
मुंबईतील परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्यात आणि स्पष्टपणे निर्देश देण्यात सुधाकरराव नाईक यांचे सरकार अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर लावण्यात आला.
परंतु, मुंबईतील अंडरवर्ल्डचे राज संपवून तिथे कायदा सुव्यवस्थेचे राज्य निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हणूनही सुधाकरराव नाईक यांच्याकडे पहिले जाते. यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. उल्हासनगरचे आमदार आणि गँगस्टर भाई ठाकूर याला अटक करण्यात त्यांचा वाटा होता. मुंबईतील गुंडाराज संपवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते प्रशासनावर पकड असणारे मुख्यमंत्री होते.
सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रात जल संधारणाची कामे मोठ्या प्रमाणात उभारली. “पाणी अडवा पाणी जिरवा,” या मंत्रातून त्यांनी धरणे, बंधारे बांधण्याचा सपाटा लावला. यामुळेच आज महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आहे.
हरितक्रांतीची वाट धरणाऱ्या वसंतराव नाईक या त्यांच्या काकांपासूनच प्रेरणा घेत सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रात जलक्रांती घडवून आणण्याचा ध्यास घेतला.
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल पद मिळाले असले तरी त्यांचे सगळे महाराष्ट्राकडेच होते. तेथून परत आल्यावर त्यांनी पुन्हा महाराष्ट्रातील जलसंधारणाचा प्रश्न हाती घेतला. कधीकाळी महराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या सुधाकररावांनी महाराष्ट्र जलसंधारण परिषदेचे अध्यक्षपदही स्वीकारले आणि महाराष्ट्रात जलक्रांती अवतरावी म्हणून झटून कामही केले.
वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचे राजकारण हे नुसतेच भपकेबाज आणि दिखाऊपणाचे नव्हते. दोघांचेही त्यांच्या या सर्जनशील कार्यासाठी नेहमीच स्मरण केले जाईल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








