आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
पाकिस्तानमध्ये अध्यक्षीय लोकशाही असली तरी तिथला कारभार लष्करी हुकुमशाहीने चालतो. लष्करी हुकुमशाह म्हटले की जनरल जिया उल हकचे नाव डोळ्यासमोर येते. जिया उल हक याने आपल्या अतिरेकी धर्मांध आणि सत्तांध वृत्तीने पाकिस्तानमधील वातावरण गढूळ करून टाकले. आपला स्वार्थ साधण्यासाठी आपल्या धन्याचाही बळी घ्यायला मागे पुढे पहिले नाही.
जनरल जिया उल हकमुळे पाकिस्तानी जनतेला खूप त्रास सोसावा लागला.
स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १२ ऑगस्ट १९२४ रोजी पंजाबमधील जालंधर येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील ब्रिटिशांच्या सैन्यातील जीएचक्यूमध्ये क्लार्क होते. कधी दिल्ली तर कधी शिमला असे त्यांचे कामाचे ठिकाण नेहमी बदलत असे. त्याच्या वडिलांचे नाव होते मुहम्मद अकबर. सैन्यातील नोकरीमुळे त्यांच्या मुलावरही लष्करी जीवनाचा प्रभाव पडणे साहजिक होते. मात्र हा प्रभाव पुढे जाऊन टोकाच्या धार्मिक द्वेषात आणि क्रू*रतेत परावर्तीत होईल याचा अंदाज कोणालाच आला नव्हता.
शिमल्यातच त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजमधून त्याने इतिहासात पदवी मिळवली.
तो कट्टर आणि धर्मांध इस्लामपंथी होता. पण, कॉलेजच्या काळात मात्र त्याचा स्वभाव खूप शांत होता अगदी त्यांच्या वडिलांसारखा.
१९४३ साली तो ब्रिटीश सैन्यात दाखल झाला. ब्रिटीश सैन्याचा भाग म्हणून त्याने दुसऱ्या महायु*द्धातही भाग घेतला होता. दुसरे महायु*द्ध संपल्यानंतर तो घरी आला. त्यानंतर दोनच वर्षांत भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यासोबत फाळणीही आलीच.
पाकिस्तानची निर्मिती झाली जिया उल हक तिकडे निघून गेला.
१९४८ साली कश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमधे मोठे यु*द्ध झाले. जिया यल हकने या यु*द्धातही भाग घेतला होता. १९६५ सालच्या भारताविरुद्धच्या यु*द्धातही तो होताच. १९६६ साली त्याला पदोन्नती मिळाली आणि तो डिव्हिजन कर्नल बनला. १९६९ मध्ये ब्रिगेडियर आणि त्यानंतर जोर्डनदेखील झाला.
याच दरम्यान पाकिस्तानचा तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टोच्या तो संपर्कात आला. जुल्फिकार भुट्टो आणि जिया उल हक यांच्यातील संबंध उत्तरोत्तर दृढ होत गेले. त्याचाच परिणाम म्हणून १९७६ साली जिया उल हक याला थेट जनरल पदी बढती मिळाली. ज्या जुल्फिकार भुट्टोच्या आधाराने तो जनरल पदापर्यंत पोचले पुढे त्याच भुट्टोचा त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी बळी घेतला.
यावेळी पाकिस्तानमधील राजकीय स्थिती बिघडत चालली होती. देशात अशांततेचे वातावरण होते. सैन्य भुट्टोच्या हाताबाहेर चालले होते. सैन्याच्या दबावापुढे झुल्फिकार भुट्टोचे काही चालेनासे झाले. परंतु पाकिस्तानची स्थिती हळूहळू बदलत चालली होती. अशांतता, हिं*सा आणि दैन्य यांचे साम्राज्य पसरले होते.
पुढे सैन्याने विद्रोह केला. ५ जुलै १९७७ रोजी झुल्फिकार अली भुट्टोची सत्ता संपुष्टात आणली आणि त्याठिकाणी सैन्याचे शासन म्हणजेच मार्शल लॉ लागू करण्यात आला. झुल्फिकार आली भुट्टोला अटक करवून जिया उल हकने स्वतःलाच देशाचा अध्यक्ष घोषित केले.
पाकिस्तानची सत्ता हस्तगत करण्यात तो यशस्वी झाला. सत्ता मिळताच आपली ताकद अधिकाधिक कशी वाढेल याकडेच त्याचे लक्ष होते.
त्याने सगळ्यात पहिले तर प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य बरखास्त केले. त्यानंतर एकेक करत तो आपल्या विरोधकांना संपवत गेला.
ज्या भुट्टोच्या सहाय्याने जनरल पद मिळवले त्या भुट्टोशीही गद्दारी केली, त्याच्या अटकेचा कट रचला आणि त्याच्यावर नवाब मोहम्मद अहमद खानच्या ह*त्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. १८ मार्च १९७८ रोजी लाहोर उच्च न्यायालयाने झुल्फिकार अली भुट्टोला शिक्षा सुनावली. त्यानंतर काही दिवसांतच ४ एप्रिल १९७९ रोजी भुट्टोला फासावर लटकवण्यात आले. जिया उल हकच्या विकृतीमुळे पाकिस्तानच्या विकासाला योग्य दिशा देणारे नेतृत्व कायमचे काळाच्या पडद्याआड गेले.
अशाच पद्धतीने त्याने आपल्या हर एक विरोधकाला संपवून टाकले. दिवसेंदिवस त्याच्यातील हुकुमशाह अधिकाधिक क्रूर होत गेला. झुल्फिकार अली भुट्टो निष्पाप आहेत, त्याचा या ह*त्येच्या कटाशी काहीही संबंध नाही हे माहित असणारे अनेक लोक होते. पण, त्याची तोंडे बंद करण्यात आली.
जियाच्या शासन काळात हजारो विरोधक, अल्पसंख्य आणि पत्रकारांना अशाच पद्धतीने संपवण्यात आले. त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. जिया उल हकच्या काळात पाकिस्तानची खूपच पीछेहाट झाली. त्याने पाकिस्तानला एक पूर्ण इस्लामिक देश बनवण्याची शपथच घेतली होती. झुल्फिकार भुट्टोचा जर त्याने काटा काढला नसता तर त्याला ही संधी निश्चितच मिळाली नसती.
पाकिस्तानमधे शरीया कायदा लागू करण्यात आला. हा कायदा सुडाच्या भावनेवर चालतो. म्हणजे खु*नाच्या बदल्यात खू*न, असा हा कायदा होता. पाकिस्तानमधे शिया-सुन्नी यांच्यात हिं*सा भडकवण्यास तोच कारणीभूत असल्याचे मानले जाते. दोन समाजात परस्परविरोधी गैरसमज दृढ करवून देण्यात आले आणि दोन्ही समाजात फक्त दहशतवादी निर्माण झाले.
जिया देश चालवण्यासाठी फक्त मजहबचाच आधार घेत होता. त्यामुळेच पाकिस्तानची अधोगती सुरु झाली.
काळासोबत जाण्याऐवजी पाकिस्तान काळाच्या उलट्या दिशेने मार्गक्रमण करीत होता. सरकार इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी हर एक प्रयत्न करत आहे. आता जनतेने देखील अधिकाधिक अल्लाहने सांगितलेल्या मार्गाने चालावे अशा प्रकारची आवाहने ते सतत आपल्या भाषणातून करत असत.
मजहब आणि अल्लाहचा अपमान हा देहदंडास पात्र ठरवला गेला. जणू पाकिस्तान अधिकाधिक रानटी अवस्थेकडेच मार्गक्रमण करत होता. जिया उल हकच्या काळात पाकिस्तानचे अतोनात नुकसान झाले.
मजहबी नेत्यालाच संसदेत जागा दिली जाऊ लागली. निवडणुका झाल्या तरी त्यात फक्त एकाच मजहबच्या लोकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार होता. मतदार देखील फक्त आपल्याच मजहबमधील उमेदवाराला मत देऊ शकत होते. त्यामुळे गैरमुस्लीम लोक राजकीय आघाडीवर मागेच पडत गेले. लहानपणापासूनच मुलांच्या डोक्यातही फक्त “मजहब” ही एकच बाब भिनवली जाऊ लागली. शाळेतही फक्त मजहबी गोष्टीच शिकवल्या जाऊ लागल्या. विज्ञानाची संगत म्हणजे धर्मद्रोह अशीच व्याख्या तिथे शिकवली जाई.
१७ ऑगस्ट १९८८ रोजी एका विमान अपघातात जिया उल हकचा मृत्यू झाला. या अपघातात अक्षरश: त्यांच्या शरीराचा कोळसा झाला होता. या विमानात त्याच्यासोबत पाकिस्तानचा जनरल, ॲडमिरल, आणि अमेरिकेचे पाकिस्तानी राजदूत आर्नोल्ड लुईस रॅफेलसुद्धा होते. या दुर्घटनेतून कोणीही वाचले नाही.
सरतेशेवटी क्रू*र हुकुमशहाचा अंतही तितक्याच क्रू*रपद्धतीने झाला!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.