आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात छोडो भारत आंदोलनाला फार महत्त्व आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेलं हे सर्वांत मोठं आंदोलन होतं. महात्मा गांधींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य भारतीय ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधातील या राष्ट्रव्यापी आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
‘छोडो भारत’च्या क्रांतिकारी नाऱ्याने ब्रिटिश राजवटीला हादरवून सोडले होते. पण तुम्हाला माहिती आहे का या आंदोलनाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या ‘छोडो भारत’ या नाऱ्याचे जनक महात्मा गांधी नव्हते, हा नारा जरी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध करणारे व जनतेच्या मनात राष्ट्रीयत्वाचे चैतन्य जागृत करण्याचे काम जरी महात्मा गांधींनी केले असले तरी या विश्वप्रसिद्ध नाऱ्याचे जनक महात्मा गांधी नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात शेतकरी आणि कामगारांच्या जनांदोलनाला आकार देणारे थोर स्वातंत्र्यसेनानी ‘युसूफ मेहर अली‘ होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान देणाऱ्या या नेत्याबद्दल आज आपण जाणून घेऊ..
युसूफ मेहर अली यांचा जन्म २ सप्टेंबर १९०३ साली झाला. त्यांचे वडील मुंबईत मोठे व्यापारी होते. त्यांच्या आजोबांनी मुंबईतील पहिल्या स्वदेशी सूतगिरणीची स्थापना केली होती. घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असलेल्या युसूफ मेहर अली यांना बालपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीचे आकर्षण होते. शाळेत असतांना अनेक युवा क्रांतीकारकांबद्दल त्यांनी वाचले होते.
मुंबईत आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. एका श्रीमंत घरात जन्माला आलेल्या युसूफ मेहर अलींनी कायमच गरीब, शोषित आणि वंचितांच्या समस्येवर आवाज उठवण्यासाठी काम केले. स्वातंत्र्य संग्रामात आपला सक्रिय सहभाग नोंदवत असतानाच युसूफ मेहर अली यांनी आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबईच्या एलिफिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयात बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर शासकीय महाविद्यालयातून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.
दरम्यान १९२८ साली ब्रिटिश सरकारच्या वतीने भारतात सात सदस्यीय सायमन आयोगाचे आगमन झाले. भारताशी निगडित संवैधानिक रचनेत फेरबदल करण्याच्या दृष्टीने हा आयोग भारतात आला होता.
पण भारताच्या भविष्यासंबंधित महत्वपूर्ण निर्णय घेण्याचे दायित्व ज्या आयोगावर सोपविण्यात आले होते, त्या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता.
सर्व ब्रिटिश सभासद असलेल्या या आयोगाच्या शिफारसी भारतीयांना नामंजूर होत्या. लोकांच्या मनात या आयोगाच्या विरोधात संतापाचे वातावरण होते. याच आयोगाच्या विरोधात युसूफ अलींनी ‘बॉम्बे युथ लीग’ ही संघटना स्थापन केली आणि यानंतर सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन पुकारले. या आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मुंबईच्या बंदरावर मोठ्या संख्येने लोकांना जमवण्यास सुरुवात करण्यात आली.
ब्रिटिशांना युसूफ अलींच्या योजनेची माहिती मिळाली आणि त्यांनी या त्यांच्या योजनेला उधळून लावण्यासाठी तयारी सुरु केली. पण हे क्रांतिकारी तरुण मागे हटले नाहीत. त्यांनी बंदरावर गर्दी केली. त्यांनी सायमन आयोगाला काळे झेंडे दाखवले. मोठमोठ्याने ‘सायमन गो बॅक’चे नारे त्या तरुणांनी दिले, यामुळे संपूर्ण परिसर आणि ब्रिटिश सरकार हादरले. या आंदोलनाची माहिती सर्वदूर पसरली.
महात्मा गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील ‘सायमन गो बॅक’च्या घोषणेचा पुनरुच्चार केला. यानंतर ब्रिटिशांच्या विरुद्ध देशभरात युसूफ मेहर अलींनी दिलेला हा ‘सायमन गो बॅक’चा नारा प्रसिद्ध झाला. युसूफ मेहर अलींची वाढती लोकप्रियता इंग्रज सरकारसाठी डोकेदुखी ठरली होती. याविरोधात इंग्रज सरकारने कारवाईचा बडगा उगारला आणि युसूफ अलींवर वकिली करण्यास कायदेशीर बंदी घालण्यात आली.
अनेक राष्ट्रप्रेमी वकिलांनी या प्रकरणात युसूफ अलींची बाजू घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फारसे यश आले नाही. इंग्रज सरकारला वाटले की आता युसूफ मेहर अली माघार घेतील आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होणार नाहीत. पण भलतेच घडले. युसूफ मेहर अली अधिकच ताकदीने ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधात पेटून उठले.
‘सायमन गो बॅक’ आंदोलनानंतर युसूफ मेहर अलींनी तरुणांचे संघटन करण्यास सुरुवात केली. सविनय कायदेभंग आंदोलनात देखील त्यांनी सहभाग नोंदवला.
दांडी यात्रेत सहभागी होत युसूफ अली हे इतर अनेक काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसमवेत जेलमध्ये जाऊन बाहेर आले. १९३० साली त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि चार महिने तुरुंगात रवाना करण्यात आले. ही शिक्षा भोगून बाहेर आल्यावर ते शांत बसतील असं इंग्रजांना वाटलं पण त्यांचा काही काळातच भ्रमनिरास झाला.
युसूफ अलींनी ब्रिटिशांच्या राजवटीविरोधात जो एल्गार पुकारला, त्यामुळे ब्रिटिशांनी १९३२ साली त्यांची अजून एकदा तुरुंगात रवानगी केली. पण यावेळी हा तुरुंगवास युसूफ मेहर अलींच्या पथ्यावर पडला. तुरुंगात असतांना अनेक क्रांतिकारी नेत्यांच्या संपर्कात ते आले. पुढे जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, नरेंद्र देव आणि मसानी यांसारख्या काँग्रेसमधील डाव्या विचारांच्या नेत्यांशी त्यांची जवळीक वाढतच गेली. या सगळ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांशी निगडीत सहकार संघ आणि कामगार संघटनांना मजबूत करण्याचा निश्चय त्यांनी केला.
१९३८ साली पार पडलेल्या जागतिक सांस्कृतिक संमेलनात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांनी या संमेलनात भारतीयांच्या संस्कृतीवर आधारित मूलभूत साहित्य रचना होत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी यावर फक्त खंत व्यक्त केली नाही. यानंतर त्यांनी ‘लीडर ऑफ इंडिया’ नावाच्या पुस्तकाचे लेखन केले.
भारतात युसुफ मेहर अलींचा ब्रिटीशांविरोधात संघर्ष सुरु होता. सत्याग्रहाच्या लढ्यात युसुफ अलींनी सक्रिय सहभाग नोंदवला. महात्मा गांधींच्या आज्ञेने त्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. त्यांना यासाठी तब्बल ८ वेळा जेलची वारी करावी लागली.
१९४२ साली लाहोरच्या जेलमध्ये असताना काँग्रेसने त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे तिकीट दिले. या निवडणुकीत प्रत्यक्ष उपस्थिती नसून देखील त्यांनी सहज विजय संपादन केला. त्यांनी आपल्या कार्यकाळात मजूर आणि कष्टकरी वर्गाच्या कल्याणासाठी प्रयत्न केले.
१९४२ साली इंग्रज सरकार भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला केराची टोपली दाखवते आहे, हे बघून गांधीजींनी स्वतंत्र भारतासाठी मुंबईत बैठक बोलावली. यात आंदोलनासंबंधित उपाययोजना करण्यासाठी युसूफ अलींशी सल्लामसलत करण्यात आली.
या आंदोलनाला कसे संबोधित करावे यावर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु असताना युसूफ मेहर अलींनी ‘छोडो भारत आंदोलन’ म्हणजेच ‘क्विट इंडिया मुव्हमेंट’ हे नाव सुचविले.
या संबोधनाचा सर्वांकडून सहर्ष स्वीकार करण्यात आला. अशा प्रकारे भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली. युसूफ मेहर अलींनी ‘क्विट इंडिया’ या नावाच्या पुस्तिकेचे देखील प्रकाशन केले.
युसूफ मेहर अलींनी ब्रिटिशांच्या विरोधात उभारलेला समाजवाद्यांचा लढा बघून चिडलेल्या ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात पाठवले. तुरुंगात असताना मोठ्या अडचणींचा सामना युसूफ मेहर अली यांना करावा लागला. अशातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्यांना सेंट जॉर्ज इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. पण या मागणीकडे ब्रिटिशांनी दुर्लक्ष केले.
ब्रिटिश सरकारच्या वागणुकीला कंटाळून कैद्यांनी युसूफ मेहर अलींसाठी ब्रिटिश सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. छोटो भारत चळवळ त्यावेळी आपल्या चरमसीमेवर होती त्यामुळे युसूफ मेहर अलींना मुक्त करण्याव्यतिरिक्त दुसरा कुठला पर्याय ब्रिटिश सरकारकडे उरला नाही. त्यांनी युसूफ मेहर अलींची वैद्यकीय कारणाने मुक्तता केली.
सुटका झाल्यावर आजारी असून देखील युसूफ मेहर अलींनी स्वातंत्र्य चळवळीत आपले योगदान दिले. स्वतंत्र भारताची पहाट पाहू शकलेल्या निवडक नेत्यांपैकी ते एक होते.
युसूफ मेहर अलींना चित्रकलेची देखील आवड होती. १९४९ साली त्यांनी आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील आठवणी चित्ररूपात काढून त्यांचे प्रदर्शन मुंबईत आयोजित केले होते.
२ जुलै १९५० साली वयाच्या ४७ व्या वर्षी या थोर क्रांतिकारकाने आपले प्राण त्यागले. आयुष्यभर युसूफ मेहर अली ज्या मुंबई शहरासाठी आणि तेथील जनतेच्या कल्याणासाठी झगडले होते, त्या शहराने देखील त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने ‘न थांबणाऱ्या मुंबई शहरा’ची गती देखील मंदावली होती.
युसूफ मेहर अलींनी आपल्या अल्पायुष्यात मुंबई आणि देशासाठी मोठा संघर्ष केला. खरंतर पैशाची मुबलकता आणि घरचा व्यवसाय असून देखील युसूफ मेहर अली सदैव गरीब कष्टकरी वर्गाच्या न्यायहक्कांसाठी लढले, आयुष्यभर त्यांनी आपला समाजवादी बाणा जपला. या महान देशभक्तास विनम्र अभिवादन…!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.