आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आज विज्ञान व तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीमुळे मानवाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडत आहेत. मनोरंजनाच्या माध्यमात देखील मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहे. आजचा टीव्ही व त्यावर दिसणाऱ्या वाहिन्यांची संख्याही भरमसाठ आहे. विविध भाषेत प्रदर्शित होणाऱ्या या वाहिन्यांची संख्या आज शेकडोंच्या घरात आहे.
पण एक काळ असा देखील होता जेव्हा टीव्हीवर या शेकडो वाहिन्या बघायला नव्हत्या मिळत, फक्त एकच वाहिनी बघून सर्व वयोगटातील लोकांचे मनोरंजन व्हायचे.
त्या वाहिनीचे नाव होते ‘दूरदर्शन’!
विदेशात अनेक वाहिन्या ज्यावेळी लोकांचे मनोरंजन करत होत्या त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती, जिने भारतीय प्रेक्षकांच्या मनाचा ताबा मिळवला होता. भारतात टीव्ही आला त्यावेळी तो भारतात लोकप्रिय होईल की नाही याबाबतीत सरकार आणि टीव्ही कंपनीवाले दोघेही साशंक होते.
दूरदर्शनचे पहिले प्रसारण दिल्लीच्या काही भागांत १५ सप्टेंबर १९५९ रोजी करण्यात आले. त्यावेळी फक्त आठवड्यातून तीन वेळा टीव्ही बघता येत होता. त्याचा कालावधी देखील अर्ध्या तासाचाच होता. सुरुवातीलाच मोठ्या संख्येने भारतीय लोक टीव्हीकडे आकर्षित झाले. काही काळातच टीव्ही हे लोकांचे आवडते माध्यम बनले.
१९६५ पासून टीव्हीवर दूरदर्शनचे रोजच्या रोज प्रसारण व्हायला लागले. युनेस्कोने भारताला त्याकाळी २० हजार डॉलर्स आणि १८० फिलिप्स टीव्ही सेट्सची मदत केली होती. यानंतर दूरदर्शनवर पाच मिनिटांच्या बातम्या दाखवल्या जाऊ लागल्या. १९६७ साली पाहिल्यान्दाच भारताच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर करण्यात आले. सुरुवातीच्या काळात ‘टेलिव्हिजन इंडिया’ नाव असलेल्या वाहिनीचे १९७५ साली दूरदर्शन असे नामकरण करण्यात आले.
त्याकाळी एका मोठ्या ट्रान्समिटरच्या बळावर दुरदर्शनचे प्रसारण केले जात होते. अठरा ठिकाणी टेलिव्हिजन सेट बसवून प्रक्षेपण केले जात होते. सुरुवातीला लोकांना टेलिव्हिजन व त्यावर दिसणाऱ्या चित्रांबद्दल फारच कुतूहल होते.
१९६६ साली भारताच्या कृषिप्रधान देश या प्रतिमेला साजेशा ‘कृषिदर्शन’ कार्यक्रमाचे प्रसारण करण्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमामुळे दूरदर्शन ग्रामीण भागात लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली. हा कार्यक्रम आजही प्रदर्शित केला जातो.
सुरुवातीच्या काळात अत्यंत कासवगतीने प्रवास करणाऱ्या दूरदर्शनने मात्र नंतरच्या काळात मोठी गती पकडली. ८० च्या दशकात दूरदर्शन भारतातील सर्वच भागात प्रसारित होण्यास सुरुवात झाली. १५ ऑगस्ट १९८२ रोजीचे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भाषणाचे पहिल्यांदा रंगीत प्रसारण करण्यात आले. रंगीत प्रसारणामुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत अजून वाढ झाली. याच काळात अनेक टेलिव्हिजन कंपन्यांच्या टीव्ही सेट्सची भारतात विक्री होण्यास सुरुवात झाली, त्यामुळे दूरदर्शन वाहिनी भारतीयांसाठी कुतूहलाचा विषय बनली.
लोक अक्षरशः दूरदर्शन पाहण्यासाठी वेडावले होते. रविवारचा दिवस तर भारतीयांना पर्वणीचा होता, या दिवशी अनेक मनोरंजनपर कार्यक्रम, चित्रपट, गीतमाला, मालिका यांचे प्रसारण होत असत. ज्याच्याकडे टीव्ही असायचा त्याच्या घरासमोर लोक ठिय्या मांडून बसायचे. अगदी एका खोलीत पन्नास-साठ लोक एकत्र बसून टीव्ही बघायचे.
त्याकाळी नेटवर्क फार चांगलं नसायचं त्यामुळे कित्येकदा टीव्हीला सिग्नल येत नाही म्हणून लोक गच्चीवर जाऊन अँटेना हलवायचे व आवाज देऊन चॅनेल दिसतंय की नाही हे विचारायचे.
‘हम लोग’ या मालिकेने लोकांच्या मनावर मोठे गारुड घातले होते. बुनियाद, चित्रहार, सुबह सवेरे, रामायण, श्रीकृष्ण, महाभारत, मालगुडी डेज्, वाह जनाब या मालिकांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले होते.
लहान मुलांसाठी प्रसारीत होणाऱ्या शक्तिमान, ज्युनियर जी, ही-मॅन, व्योमकेश बक्षी, टर्निंग पॉईंट, अलिफ लैला, चंद्रकांता यासारख्या मालिकांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती.
२६ जानेवारी १९९३ साली दुरदर्शनने ‘मेट्रो’ या नवीन वाहिनीची सुरुवात केली. नंतर दूरदर्शनचे दोन भाग होऊन डीडी १ व डीडी २ असे दोन चॅनेल अस्तित्वात आले. १९९५ साली ‘डीडी इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय वाहिनी लॉंच करण्यात आली. १९९९ साली डीडी स्पोर्ट्स प्रसारित करण्यात आले. २००४ साली १६ डिसेंबरला दूरदर्शनने ‘डायरेक्ट टू होम’ सेवा सुरू केली, जी आजदेखील कार्यरत आहे व लोकप्रिय देखील आहे.
१९९१ च्या आर्थिक उदारीकरणापर्यंत भारतात दूरदर्शनला कुठलीच स्पर्धा नव्हती, पण उदारीकरणानंतर स्टार व झी या खाजगी वाहिन्या आल्या आणि दुरदर्शनच्या लोकप्रियतेवर परिणाम होऊ लागला होता, लोकांची आर्थिक स्थिती चांगली झाली होती. प्रत्येकाच्या घरी कलर टीव्ही आले, केबल, नवनवीन वाहिन्यांची भर पडत होती. डिश टीव्ही, टाटा स्काय व आता आता आलेल्या नेटफ्लिक्स व ॲमेझॉन प्राईमसारख्या ओटीटीने लोकांच्या मनोरंजन माध्यमात अनेक बदल घडवले, यामुळे दूरदर्शन मागे पडले होते.
परंतु मागच्या वर्षी आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटकाळात लॉकडाउनमुळे जेव्हा शूटिंग बंद होते, तेव्हा लोकांच्या मनोरंजनाची जबाबदारी दूरदर्शनने खांद्यावर घेतली व त्यावर पुन्हा प्रसारीत करण्यात आलेल्या रामायण, महाभारत या कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांना व दुरदर्शनला देखील पुन्हा एकदा आपला ८०-९० च्या दशकातील सुवर्णकाळ अनुभवता आला होता. त्याकाळातही रामायण मालिकेच्या दर्शकांच्या संख्येने उच्चांक गाठला होता.
आज शेकडोंनी वाहिन्या निघाल्या आहेत पण दूरदर्शनची सर कोणालाच नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.