आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील डुमराव शहर हे बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध असलं तरी या शहराची प्रमुख ओळख गेल्या कित्येक वर्षांपासून ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ’ यांचे जन्मगाव अशीच राहिली आहे. या शहरातील चटई, दरी आणि मंदिर प्रसिद्ध आहेत पण बिस्मिल्ला खाँ यांच्या इतकी ओळख कोणालाच नाही. आपल्या सनई वादनाने संपूर्ण जगाला संमोहित करणाऱ्या उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनी गिटारच्या काळात सनई लोकप्रिय केली आहे.
उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म २१ मार्च १९१६ रोजी झाला. त्यांचे बालपणीचे नाव ‘कमरुद्दीन’ असे होते, पण त्यांना प्रसिद्धी मिळाली ती ‘बिस्मिल्ला’ या नावामुळे!
बिस्मिल्ला हे नाव मिळण्यामागे एक रंजककथा आहे. बिस्मिल्ला खाँ यांचा ज्यावेळी जन्म झाला, तेव्हा त्यांच्या घरात उपस्थित असलेल्या एका म्हताऱ्या व्यक्तीच्या तोंडातून बिस्मिल्ला हा शब्द बाहेर पडला, हा एका पवित्र शब्द मानला जातो. यामुळेच सर्वच त्यांना बिस्मिल्ला म्हणू लागले. ते ६ वर्षाचे होते, त्यावेळी त्यांचे वडील पैगंबर बक्ष त्यांना सोबत घेऊन वाराणसीला आले. तिथे त्यांची त्यांच्या मामाशी गाठ पडली. लहान वयातच त्यांचे संगीतावरचे प्रेम बघून त्याचे मामा प्रसन्न झाले. त्यांनी बिस्मिल्ला खाँ यांच्या टॅलेंटला विकसित करण्याचा प्रयत्न सुरु केला.
जेव्हा बिस्मिल्ला खाँ १६ वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह करण्यात आला. त्यांचे मामा सादिक अली यांचीच दुसरी कन्या मुग्गन खान यांच्याशी त्यांनी लग्न केले. लग्नानंतरच्या काळात बिस्मिल्ला खाँ यांच्यात व सनईमध्ये अंतर आले होते, मात्र त्यांच्या सनईवरील प्रेमात अजिबात कमतरता आली नाही व थोड्याच काळात ते पुन्हा सनई वादनाकडे वळले.
कमी वयातच बिस्मिल्ला खाँ यांनी सनई वादन शिकले. दुसरीकडे त्यांनी छैती, ठुमरी, स्वानी आणि कजरी इत्यादी वाद्यांमध्ये देखील प्राविण्य मिळवले. त्यांच्या मामांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी बिस्मिल्ला खाँ यांनाच काशी विश्वनाथाच्या देवळात सनई वादनासाठी बोलवले होते.
बिस्मिल्ला खाँ यांचे काही शिकण्याचे प्रयत्न कधीच थांबले नाहीत. त्यांनी अनेक राग वाजवण्यात प्राविण्य मिळवले. त्यांच्या कलेची चर्चा सर्वदूर होऊ लागली, अनेक लोकांनी त्यांना आमंत्रित करण्यास सुरुवात केली. बऱ्याचदा त्यांच्याकडे कुठे कार्यक्रमाला पोहचायला वेळ नसायचा, इतके ते प्रसिद्ध झाले होते.
१९३७ साली उस्तादांना कोलकत्ता म्युझिक कॉन्फरन्ससाठी आमंत्रित करण्यात आले, इथूनच त्यांच्या नावाचा डंका जगभर वाजला. ते कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नव्हते. १९३८ साली त्यांना लखनऊ येथे ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. जर्मनीच्या एडनबर्ग म्युझिक फेस्टिव्हलमधील परफॉर्मन्सने त्यांनी सगळ्या जगाला संमोहित केले.
उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनी इतकी प्रसिद्धी आणि प्रेम मिळवले होते की भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी लाल किल्ल्यावर सनई वादन केले होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतः बहरुद्दीन तैय्यबजी यांना स्वातंत्र्याच्या सोहळ्यासाठी बिस्मिल्ला खाँ यांना सनई वादनासाठी बोलावण्यास सांगितले होते. यानंतर बिस्मिल्ला खाँ दिल्लीला आले आणि त्यांनी आपल्या संगीत मोहिनीने स्वातंत्र्याची पूर्वसंध्या गाजवली होती.
स्वरांचे उस्ताद असलेले बिस्मिल्ला खाँ साहेब यांची कीर्ती आपल्या देशातच नाही तर जगभरात पोहचली होती. जगभरात त्यांच्या स्वरांचे आणि भारतीय संस्कृतीचे कौतुक करण्यात येत होते. भारतच नाही पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, इराण, अमेरिका, जपान, कॅनडा इत्यादी देशांमध्ये देखील बिस्मिल्ला खाँ यांनी सनई वादन केले व भारतीय संस्कृतीचा ध्वज उंचावला. जगभरात त्यांचा सन्मान करण्यात आला.
त्यांना २००१ साली भारतरत्न, १९८० साली पद्मविभूषण, १९६८ साली पद्मभूषण, १९६२ साली पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
इतकेच नाही, एम. एस. सुब्बलक्ष्मी आणि रविशंकर यांच्यानंतर संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड मिळवणारे ते तिसरे भारतीय होते. त्यांच्या १०२व्या वाढदिवशी गुगलने त्यांचे डुडल तयार करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. २१ ऑगस्ट २००६ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
आजही त्यांच्या आठवणी भारतीय संस्कृतीचे एक नयनरम्य चित्र आपल्यासमोर उभं करतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाची सुंदरता आणि त्यांची भावनिकता फारच आकर्षक होती. २००६ साली वाराणसीच्या संकटमोचन हनुमान मंदिरावर काहींनी ह*ल्ला चढवला होता, त्यावेळी उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनी शांतीची कामना करत सनई वादन केले होते.
उस्ताद ‘बिस्मिल्ला खाँ’सारखी माणसं हीच या देशाची खरी संपत्ती आहेत !
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.