आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारत-पाकिस्तानचा सामना म्हणजे जणू युद्धच मानले जाते. असंही क्रिकेटचा सामना भारतीयांसाठी एखाद्या धार्मिक कार्यक्रमापेक्षा कमी नाहीच. त्यातही जेव्हा जेव्हा भारत वि. पाकिस्तान मॅच असेल तेंव्हा तेंव्हा तर क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचतो आणि अर्थातच अपेक्षाही उंचावलेल्या असतात.
पाकिस्तान विरुद्ध जर सामना हारलो तर… या कल्पनेचे भारतीय संघावरही दडपण असते.
१९९६ सालची विल्स वर्ल्डकपमधील क्वार्टर फायनल मॅच. आणि भारताचा सामना होता पाकिस्तानशी. मैदानात उपस्थित असलेल्या क्रिकेटप्रेमींच्या शिट्ट्या, टाळ्या, आणि आरडओरडा ऐकूनच वातावरणातील उत्साहाची जाणीव होत होती. रेडीओवरून या क्रिकेटचे समालोचन ऐकणारे आणि टीव्हीवरून हे दृश्य पाहणारे लाखो भारतीय क्रिकेटप्रेमी देखील उत्साहाने पुढचा खेळ पाहण्यासाठी आणि समालोचन ऐकण्यासाठी आतुर होते.
चिन्नास्वामी स्टेडीयम फलंदाजीसाठी उत्तम असल्याचे मानले जाते. या वर्ल्डकपच्या सगळ्याच सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. या सामन्यातही ते पाकिस्तानला धुळ चारतील अशी अपेक्षा होती. अर्थात, आपला संघ विजय व्हावा ही अपेक्षा नेहमीच असते आणि ती रास्तही असते.
यावेळी संघाचा कॅप्टन होता, अझरूद्दीन. संपूर्ण वर्ल्डकपमधे भारतीय संघाने आपल्या फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. या सामन्यावेळी मात्र भारतीय संघ काहीसा गोंधळून गेला होता.
खेळायला आलेली सलामीवीरांची जोडी होती सचिन तेंडुलकर आणि नवज्योत सिंग सिद्धू. नवज्योत सिंग सिद्धूला कोण ओळखत नाही? आणि सचिन? तर या दोघांनीही फलंदाजी सुरु केली.
लोकांनी आवर्जून सचिनची फलंदाजी बघण्यासाठी सामन्याचे तिकीट काढले होते. पण, अताउर रेहमानने चेंडू टाकला आणि सचिन ३१व्या रनवर आउट झाला. सचिन आउट झाला म्हणजे निम्मा सामना जिंकला असेच त्यावेळी समोरच्या स्पर्धक संघाला वाटत असे. सचिन आउट झाल्यावर पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांना मिठी मारून आनंद साजरा करू लागले. पाकिस्तानचा कॅप्टन अमीर सोहेलने तर खेळाडूंचे अभिनंदनही अशा पद्धतीने केले जणू त्यांनी सामना जिंकलाच.
सचिन इतक्यात आउट होणे प्रेक्षकांना मात्र रुचले नाही. प्रेक्षकांचा सगळा उत्साहच ओसरून गेला. प्रेक्षकांत एक अजब शांतता पसरली. त्याच्या शिट्ट्या, टाळ्या, आरडओरड हे सगळेच थांडवून गेले. नवज्योत मात्र खेळपट्टीवर टिकून राहिला. सचिन आउट झाल्याने पाकिस्तानी खेळाडूंना विजयाची खात्रीच वाटू लागली. त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
सिद्धूने मात्र त्यांच्या या आनंदावर विरजण घालण्याची संधी सोडली नाही. तो अगदी चिकाटीने खेळपट्टीवर टिकून राहिला. सिद्धू पटापट धावा काढत होता. ११५ चेंडूमधे त्याने ९३ धावा काढल्या. परंतु मुश्ताक अहमदच्या चेंडूतील फिरकी त्याला समजली नाही आणि त्याच्या चेंडूवर सिद्धू आउट झाला. त्याचे शतक अवघ्या सात धावांनी हुकले. पण, सिद्धूने सामन्याचा पाया तरी चांगला रचला होता. पुढे येणाऱ्या खेळाडूंनी थोडी जरी चांगली कामगिरी केली असती तरी, पाकिस्तान समोर भरपूर धावांचे आव्हान ठेवणे सहज शक्य होते.
सिद्धू पण आउट झाल्यावर भारतीय संघाचे अवसानच गळले. प्रेक्षकांतील उत्साह तर कधीच थंड झाला होता. नाही म्हणायला सिद्धूच्या फलंदाजीने त्यांच्या आशा थोड्याफार पल्लवित झाल्या होत्या. एकेक करत भारतीय फलंदाज तंबूत परतत होते. ४ विकेट आणि २०० धावा अशी धावसंख्या झाली होती. प्रेक्षकांच्यात निराशा पसरली होती. कित्येकांना तर आपले तिकिटाचे पैसे वाया गेल्याचे दु:ख वाटत होते.
अताउर रेहमानची गोलंदाजी त्यादिवशी चांगलीच फार्मात होती. त्यामुळे पाकिस्तानी संघाला देखील विजयाची हमी वाटत होती.
भारतीय संघ आता फार मोठा धावांचा डोंगर रचू शकणार नाही आणि २५० पर्यंत जरी त्यांनी धावा केल्या तरी आपणही सहजच तितक्या धावा पार करू शकू असा विश्वास पाकिस्तानी संघाला आणि त्याच्या कॅप्टनला वाटत होता. भारतीय फलंदाजांना पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगलेच अडवून ठेवले होते.
भारतीय संघाचा कॅप्टन अझरूद्दीन देखील २२ चेंडूमध्ये २७ धावा करू शकला. त्यानंतर आलेल्या संजय मांजरेकरने देखील ४३ चेंडूमध्ये २० धावा काढल्या. त्यानंतर आला विनोद कांबळी, याने २६ चेंडू मध्ये २४ धावा काढल्या. आता भारताची धावसंख्या होती. ४६ ओव्हर, २३६ धावा आणि ६ विकेट. बस्स आता पुढच्या चार ओव्हर संपल्या की खेळ खतम असाच काहीसा माहोल बनला होता.
सामन्यातील अनिश्चितता वाढत असतानाच खेळपट्टीवर आला एक उमदा आणि तरूण खेळाडू अजय जडेजा. अजय तेंव्हा टीममधे नवीनच होता. अजय जडेजाने फटके मारायला सुरुवात केली आणि सामन्याचे पारडेच फिरले. अजयचा खेळ बघून प्रेक्षकांच्या आशा उंचावल्या. त्यांना पुन्हा एकदा विजयाची शक्यता खुणावू लागली.
अजयने जवळजवळ हरलेल्या सामन्याचे पारडेच फिरवले आणि विजय खेचून आणला.
शेवटच्या चार ओव्हर मध्ये जडेजाने ४० धावा केल्या. २५ चेंडूत त्याने ४५ धावा केल्या. आणि शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाची धावसंख्या होती ८ बाद २८७ धावा.
फक्त २५० धावावरच भारताला अडवण्याचा पाकिस्तानी संघाचा मनसुबा होता मात्र भारताने त्यांच्यापुढे २८७ धावांचा डोंगर उभा केला होता. आता पाकिस्तानला थोडी चिंता वाटू लागली. इतका मोठा धावांचा डोंगर कसा पार करायचा?
दबावात आलेल्या पाकिस्तानी संघाच्या एकही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांचा कॅप्टन अमीर सोहेलने ५५ धावा केल्या. त्याचा साथीदार सईद अन्वरने त्याला चांगली साथ दिली. पण, हे दोन्ही सलामीवीर आउट झाल्यावर मात्र पाकिस्तानी संघाचा उत्साह पूर्णतः ओसरून गेला.
भारताच्या धावांचा पाठलाग करणे शक्य न झालेल्या पाकिस्तानी संघाने फक्त २४८ धावाच केल्या आणि भारतीय संघ विजयी ठरला. विजयचा पाया रचणाऱ्या सिद्धूला ‘मॅन ऑफ दि मॅच’चा किताब देखील मिळाला.
या संपूर्ण खेळत अजय जडेजा आणि नवज्योत सिंग सिद्धू या दोघांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघाला विजयापर्यंत पोहोचणे शक्य झाले. अगदी मोक्याच्या क्षणी या दोघांनी भारतीय संघाची लाज राखली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.