आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भर उन्हातून घरात आल्या आल्या सगळ्यांची पहिली मागणी असते, “मस्त थंडगार पाणी दे प्यायला!” पाणी प्यायल्यावर कसं एकदम शांत शांत वाटतं. आता, तुम्ही कोणाला पण विचारा-आपण पाणी केव्हा पितो? उत्तर काय मिळेल? साहजिकच, तहान लागल्यावर, जेवताना किंवा जेवण झाल्यावर, ठसका लागल्यावर, वगैरे वगैरे.
नेहमी आपल्याला डॉक्टर काका पण सांगतात की जास्तीत जास्त पाणी प्या! कारण आपल्या शरीरात ७०% पाणीच असतं. त्यामुळे आपला “वॉटर इनटेक” जास्त हवा. काही लोक मोजून एवढे लिटर पाणी पितातच. तुम्ही बघितलं असेल कोणी कोणी सकाळी उठून रिकाम्या पोटी गरम पाणी आणि त्यात लिंबू वगैरे पिळून ते पाणी पितात. त्याचे काय काय फायदे असतात म्हणे.
पण सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याचे खरंच फायदे असतात बरं का! काय? तेच आज आपण या लेखात पाहणार आहोत.
पोटाच्या विकारांना टाटा-बाय बाय!
सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या पोटाला होतो. नियमितपणे तुम्ही सकाळी उपाशी पोटी पाणी पिट असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठाचा त्रास होत नाही. एवढंच नाही तर पोटसुद्धा साफ राहते.
सकाळी उठून किमान २ पेले पाणी प्यायलाच पाहिजे. जेणेकरून पोट निरोगी राहायला मदत होईल. परिणामी रक्त शुद्ध होऊन त्वचा पण चमकेल.
मेटाबॉलिसम सक्रिय करण्यास मदत
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिसम चांगलं ठेवण्यास मदत होते. आपली पाचनक्रिया पण चांगली होते. उपाशीपोटी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो आणि पचनक्रिया फास्ट होते, अन्न व्यवस्थित पचतं. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. म्हणूनच लोक सकाळी उठून सगळ्यात पहिले गरम पाणी पितात.
प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत
वर वाचलं की वजन कमी करण्यासाठी आणि पोटाच्या विकारांसाठी उपाशीपोटी पाणी पिणं लाभदायक ठरतं. पण एवढाच नाहीये याचा फायदा. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही याचा फायदा होतो. रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय? तर, शरीरात होणाऱ्या काही इन्फेक्शन्सपासून वगैरे लढण्यास आपल्याला शरीराला लागणारी मदत म्हणजे ‘इम्युनिटी सिस्टम’.
सकाळी पाणी प्यायल्याने काही विषारी तत्व असतील तर बाहेर पडून जातात आणि परिणामतः शरीर हेल्दी राहण्यास मदत होते. तुम्ही करून बघा, तुम्हाला पण निश्चितच फायदा होईल.
मेंदूतील ऑक्सिजन मिळण्यास मदत
सकाळी उठून पाणी पिणे, एवढा छोटासा उपाय तुम्हाला कितीतरी फायदे देतो. असे केल्याने मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजन मिळण्यास होते. ऑक्सिजन व्यवस्थित मिळालं की आपण दिवसभर फ्रेश आणि तणावमुक्त राहतो. तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास असेल तर दर थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायल्यास मेंदूशी संबंधित स्नायूंना तणावमुक्त होण्यास मदत मिळते. कारण अनेकदा पाणी कमी पिण्यामुळे स्ट्रेस आणि त्यासंबंधित आजार होऊ शकतात.
त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत
कित्येक मुली (काही मुलं सुद्धा) आपली त्वचा तजेलदार राहावी यासाठी हजारो रुपये खर्च करतात. पण त्यांना हे माहितीच नसतं की तुमची तब्येत चांगली राहिली, शरीरात पाणी योग्य प्रमाणात असलं तर त्वचा आपोआप तजेलदार राहते.
उपाशी पोटी पाणी प्यायल्याने शरीर साफ होतं. जे काही टॉक्झिक केमिकल्स वगैरे असतात ते निघून जातात. परिणामी त्यांच्यामुळे जे डाग, पिंपल्स वगैरे होतात ते होत नाही. त्वचा तजेलदार होते. त्यामुळे एवढे महागडे उपाय करण्यापेक्षा रोज सकाळी उठून उपाशीपोटी पाणी पिण्याची सवय कधीही चांगली.
जापानी मेडिकल असोसिएशनने देखील उपाशी पोटी पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी उपाशी पोटी पाणी प्यायल्याने डोकेदुखी, अंगदुखी, हृदयविकार, छातीत धडधड होणे, एपिलेप्सी, स्थूलपणा, दमा, टीबी, किडनीचे विकार, पोटाचे विकार, कॅन्सर, नाक-कान-घसा यांच्याशी संबंधित आजार, या सर्वांच्या उपचारात मदत होते.
एवढंच नाही तर, जर तुम्हाला खूप सुस्त वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा पाणी प्यायल्याने मदत होते. कारण, पाणी प्यायल्याने रक्तातील रेड ब्लड सेल्सचं प्रमाण लवकर वाढतं आणि ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही. परिणामतः, तुमची एनर्जी लेव्हल कमी होत नाही.
सकाळी फक्त २-३ पेले पाणी पिण्याचे एवढे फायदे असतात तर मग आजपासूनच ही सवय लावायला काय हरकत आहे?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.