आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार धर्मरक्षण आणि धर्मप्रसार हे प्रत्येक राजाच्या आद्य कर्तव्यांपैकी एक मानले जात होते. राज्यातील प्रजेच्या हक्कांसाठी, सुरक्षेसाठी तसेच राज्यविस्तारासाठी यु*द्ध करणे ही राजधर्माची स्वाभाविकता असली तरी प्रसंगी धर्मासाठी मरायची तयारी राज्यकर्त्यांनी ठेवणं हेही त्यावेळी एक महत्कार्य मानलं जात असे.
त्यावेळची भारतातील बहुतांश प्रमुख साम्राज्ये ही हिंदू सम्राटांच्या अधिपत्याखाली असल्याने आणि इतर धर्मियांच्या राजवटींचं अशुभ सावट नसल्याने त्यावेळी धर्माच्या नावाखाली लढाया होणे हे फारच दुर्मिळ होतं. पण अशाही परिस्थितीत कित्येक यु*द्धं एका धार्मिक बाबींमुळे लढली गेली, ती म्हणजे – हिंदू धर्मातील संप्रदायवाद!
शास्त्रपुराणांनुसार, हिंदू धर्मामध्ये शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य आणि सौर्य असे पाच संप्रदाय प्रमुख मानले जातात. यातील बहुतांश पंथांना राजाश्रय लाभला असल्याने जनमानसात त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. प्रत्येक संप्रदाय हा एका विशिष्ट देवतेची व तिच्याशी निगडीत दैवी अवतारांचीच उपासना करत असल्याने आपल्या देवतेपुढे आणि संप्रदायापुढे इतर संप्रदाय गौण असल्याचा गैरसमज हळूहळू वाढत गेला आणि याचं रुपांतर पुढे रक्तरंजित लढायांमध्ये झालं. यातील शैव आणि वैष्णव पंथामध्ये लढल्या गेलेल्या लढाया प्रसिद्ध आहे.
रक्तरंजित संघर्षांनंतर मिळालेल्या विजयानंतर अनेक स्मारके उभारली गेली ज्यांकडे फक्त सांप्रदायिकतेचा वारसा म्हणून नव्हे तर यु*द्ध जिंकलेल्या राजाच्या शौर्याची परिसीमा म्हणूनही पाहिले जाते. भारतावरील हिंदू सम्राटांचं अधिपत्य मावळतीला लागलेलं असताना इस्लामी राजवटींनी आक्र*मक पवित्रा घेत भारतभर आपली सत्ता स्थापन केली. त्यावेळी कित्येक धार्मिक प्रतिकांची, स्मारकांची नासधूस आणि लूट करण्यात आली. त्यांचं रुपांतर मशिदींमध्ये केलं गेलं.
या लूटमारीच्या खुणा आपल्या अंगावर बाळगणारा असाच एक विजयस्तंभ दिल्लीच्या मेहरौली शहरात उभा आहे. या स्तंभाचं वैशिष्ट्य म्हणजे शतकानुशतके संततधार पावसाच्या सरी अंगावर झेलणाऱ्या या ‘लोखंडाच्या’ स्तंभाला गंज चढत नाही!!
पदार्थविज्ञानातील, विशेषतः धातुशास्त्रातील भारतीयांची रुची आणि संशोधनाचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून या लोहस्तंभाकडे पाहिले जाते. तिसऱ्या शतकातील भारतीय कारागीरांच्या अचाट बौद्धिक सामर्थ्याचे व उत्तम तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन करणारा हा लोहस्तंभ आज जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि इतिहासकारांच्या कुतुहुलाचा विषय ठरत आहे.
तब्बल सहा हजार किलोहून अधिक वजनाचा आणि २३ फुटांहून अधिक उंचीचा हा लोहस्तंभ भारतातील प्रमुख साम्राज्यांपैकी एक असलेल्या सामर्थ्यवान आणि वैभवशाली गुप्त साम्राज्याच्या विष्णूभक्तीचं प्रतिक मानलं जातो.
भारतात कला, विज्ञान आणि साहित्याचा उत्कर्ष गुप्तांच्या राजवटीत झाला असे मानण्यात येते. या राजवटीतील दुसरा चंद्रगुप्त (इ. स. पू. ३७५-४१५) याचा कार्यकाळ हा भारताच्या सुवर्णयुगाची नांदी ठरला. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अतुल्य पराक्रमाच्या जोरावर दुसऱ्या चंद्रगुप्ताने एक प्रभावशाली साम्राज्य स्थापन केले. या आपल्या एकछत्री सत्तेच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याने एक विजयस्तंभ बनवला आणि त्यावर आपल्या पराक्रमाची गाथा सांगणारा शिलालेखही कोरला.
दुसरा चंद्रगुप्त हा वैष्णव पंथाचा अनुयायी असल्याने त्याने उदयगिरी, मध्य प्रदेशमधील ‘विष्णूपाद’ टेकडीवर असलेल्या विष्णू मंदिरासमोर हा ध्वजस्तंभाच्या स्वरूपातील विजयस्तंभ स्थापन केला.
या विजयस्तंभाला कधीही गंज न लागण्याचं कारण होतं त्यावर असलेलं फॉस्फरसचं गंजप्रतिबंधक आवरण!
तब्बल ९८ टक्क्यांहून अधिक लोखंड या खांबाची रचना करताना वापरले होते. स्तंभ घडवताना त्याच्या इरोजन प्रोसेसमध्ये चुनखडीचा वापर होत नसल्याने यात सध्याच्या लोखंडापेक्षा अधिक प्रमाणात फॉस्फरस वापरले गेले आहे. फॉस्फरसच्या समावेशामुळे आणि त्याच्या केमिकल रिॲक्शन या स्तंभावर उच्चप्रतीचे गंजप्रतिबंधक आवरण तयार झाले. त्यामुळे गंज लागण्यासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक प्रक्रियेचा या खांबावर तीळमात्रही परिणाम झाला नाही.
आज धातुशास्त्रात इतकी प्रगती होऊनही पुन्हा असे स्तंभ बनवणं हे प्रचंड आव्हानात्मक मानलं जातं. त्यामुळे या एकमेवाद्वितीय लोहस्तंभावर इस्लामी राजवटीची नजर पडणे साहजिकच होते. भारतात इस्लामी राजवटीचा पाया घालणाऱ्या कुतुबुद्दीन ऐबक याच्या जावयाने म्हणजेच इल्तुतमिशने आपल्या सासऱ्याच्या स्मृतीप्रित्यर्थ अपुऱ्या राहिलेल्या जगप्रसिद्ध कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण केले.
इल्तुतमिश हा दिल्ली सल्तनतीची सुरुवात करणारा सुलतान मानला जातो, ज्याने आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत मोहंमद घोरीच्या स्वप्नातील भारतातल्या तुर्की साम्राज्याची मुहूर्तमेढ दिल्लीत रोवून बंगालपर्यंत एकछत्री अंमल प्रस्थापित केला. तिथेच त्याने कुव्वत-उल-मस्जिदही बांधली, जिच्या प्रांगणात हा ‘वैष्णवांचा विजयस्तंभ’ आज पर्यटकांना पाहायला मिळतो. मेहरौलीमधील हे ऐतिहासीक स्थळ सध्या कुतुब काँप्लेक्स/परिसर या नावाने प्रसिद्ध आहे.
कुतुब परिसरात उभ्या असलेल्या या लोहस्तंभाच्या कलाकुसरीने मढलेल्या शिखरावर एकेकाळी गरुडाची मूर्ती स्थापित केली असावी असा अंदाज त्याच्या शिखरावर असलेल्या विशिष्ट खाचेवरून बांधला जातो. अशा खाचा कित्येक वैष्णव ध्वजस्तंभावर असल्याचं निरीक्षणात आढळून आलेलं आहे.
स्तंभ मूळ जागेवरून हलवताना ही मूर्ती उ*द्ध्वस्त अथवा विस्थापित झाली असावी किंवा हिंदू धर्माचं प्रतिक असल्याने त्या मूर्तीला जाणीवपूर्वक हटवलं गेलं असावं असाही इतिहास संशोधकांचा कयास आहे.
भारतातील इस्लामी राजवटीच्या सुरुवातीचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या कुतुब परिसरात हिंदूंचा विजयध्वज आहे ही बाब नादीरशहाच्या वर्मावर घाव घालत होती. १७३९ साली कर्नालच्या लढाईत त्याने दिल्लीवर ताबा मिळवला. त्यानंतर त्याने या स्तंभावर जवळून तोफेचा मारा केला, ज्यामुळे हा स्तंभ किंचितसा झुकला पण अभंग राहिला. याउलट त्याला घासून मागे गेलेल्या तोफगोळ्याच्या ठिकऱ्यांमुळे मशिदीच्या काही भिंती कोसळल्या आणि स्तंभ हटवू पाहणाऱ्या नादीरशहाची चांगलीच फजिती झाली. आपल्या आततायीपणामुळे मशिदीला आणखी नुकसान पोहोचू नये असा विचार करून त्याने लोहस्तंभ उ*द्ध्वस्त करण्याचा निर्णय मागे घेतला.
असा हा गेल्या कित्येक वर्षांपासून आस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत खंबीरपणे उभा असलेला, पुरातन भारतीय धातुशास्त्राची महती सांगणारा, कधीही न गंजणारा लोहस्तंभ या पृथ्वीतलावरील अलौकिक आणि अद्भुत आश्चर्यांपैकी एक आहे, यात दुमत नाहीच!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.