आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शाळेचे दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा काळ असतो. प्रत्येकाच्या असंख्य आठवणी या काळाशी जोडलेल्या असतात. आपली शाळा, तिचा परिसर, आपले शिक्षक, मित्रमैत्रिणी या सर्वांसोबतचे अनेक प्रसंग आपल्या आठवणींच्या रुपात आपल्याकडे असतात. मित्रमैत्रिणींचे रुसवेफुगवे, भांडणतंटे, नंतर पुन्हा एकत्र येणं, एकत्र बसून खाल्लेला डबा, खेळलेले खेळ, शिक्षकांनी केलेलं कौतुक व वेळप्रसंगी केलेली शिक्षाही आपल्याला कायमच आठवत असते. शाळेतला आपला रोजचा दिनक्रमही सगळ्यांनाच आता आठवत असेल. रोज सकाळी ठराविक वेळेला घंटा वाजली, की सगळ्यांनी एका ठिकाणी एकत्र जमून ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत म्हणायचं. त्यानंतर रोजच्या परिपाठाचा भाग म्हणून एक सामूहिक प्रतिज्ञा आपल्याला म्हणायचो.
“भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.” असे शब्द असलेली प्रतिज्ञा आजसुद्धा कित्येक जणांना अगदी अचूक तोंडपाठ असेल. आपल्या अभ्यासाच्या सर्व पुस्तकांमध्ये ही प्रतिज्ञा पहिल्या काही पानांमध्येच छापलेली असते. पण कधी आपण असा विचार केलाय, की ही प्रतिज्ञा आली कशी? कुठून आली? कोणी आणली? तर आज हेच आपल्याला इथं जाणून घ्यायचंय.
अगदी आत्ताआत्तापर्यंत या प्रश्नाचं उत्तर कोणालाच माहिती नव्हतं. अगदी जे आपली पुस्तकं तयार करतात, त्या शालेय पाठ्यपुस्तक मंडळाकडेही याचं उत्तर नव्हतं. पण आता ते उत्तर मिळालं आहे.
ही प्रतिज्ञा मूळ आंध्रप्रदेश या राज्यातून संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाली आहे. आंध्रप्रदेशातले सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा लिहिलेली आहे.
पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांचा जन्म आंध्रप्रदेश राज्यातील नालगोंडा जिल्ह्यात अन्नेपर्थी या गावी १० जून १९१६ रोजी झाला. त्यांचं मातृभाषा तेलुगूप्रमाणेच संस्कृत, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झालं होतं. त्याचबरोबर नॅचरोपथीचा अभ्यासदेखील त्यांनी केला होता. ते विशाखापट्टणम् जिल्ह्याचे अनेक वर्षं जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते.
त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामातही योगदान दिलं होतं. त्या देशप्रेमातूनच आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना म्हणण्यासाठी म्हणून त्यांनी ही प्रतिज्ञा प्रथम १९६२ मध्ये तेलुगू भाषेमधून लिहिली. ‘विशाखापट्टणम्’मधील एका शाळेत १९६३ साली या प्रतिज्ञेचं सर्वात पहिल्यांदा वाचन केलं गेलं. सुब्बाराव यांचे मित्र तेनेती विश्वनाथम् यांना ही संकल्पना व प्रतिज्ञाही खूपच आवडली. ही प्रतिज्ञा त्यांनी आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू यांना दाखवली. त्यांनादेखील ती फार आवडली,अन् लगेच राज्यातील सर्व शाळांमध्ये ती प्रतिज्ञा रोजच्या दैनंदिन परिपाठात घ्यायचा आदेश त्यांनी जारी केला.
पुढे तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय शिक्षण खात्याच्या बेंगलोर इथं १२ ऑक्टोबर १९६४ रोजी झालेल्या बैठकीत या प्रतिज्ञेला देशपातळीवर स्वीकारण्याचा निर्णय घेतला गेला. २६ जानेवारी १९६५ पासून ही प्रतिज्ञा संपूर्ण देशात लागू करण्यात आली.
त्याचवर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात या प्रतिज्ञेचा १८ भारतीय भाषांत अनुवाद करून भारतातील सर्व राज्यांमधल्या शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये स्थानिक भाषेनुसार ही प्रतिज्ञा समाविष्ट करण्यात आली. तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जादेखील देण्यात आला. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली ही प्रतिज्ञा संपूर्ण भारतभर पोहोचली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सुब्बाराव यांना याविषयी काहीच कल्पना नव्हती. आपण कधीतरी लिहून ठेवलेले शब्द आज संपूर्ण देशभरात रोज म्हटले जातायत, याबद्दल ते पूर्णतः अनभिज्ञ होते. त्यांच्या मुलांनाही याची काहीच माहिती नव्हती. सुब्बाराव जेव्हा नोकरीतून निवृत्त झाले, त्यानंतर १९८७ मध्ये एकदा त्यांच्या नातीला तिच्या पाठ्यपुस्तकात असलेली ही प्रतिज्ञा वाचत असताना त्यांनी ऐकलं, त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल कळलं. त्यांच्या कुटुंबियांसाठी तर हा एक सुखद धक्काच होता. मात्र त्यांच्या मुलांना यासोबतच या गोष्टीचंही आश्चर्य वाटलं की, अद्याप ही गोष्ट कुणालाच कशी कळली नाही. आपल्यालासुद्धा ‘जन गण मन’ लिहिणारे रवींद्रनाथ टागोर माहीत असतात, ‘वंदे मातरम्’ लिहिणारे बंकिमचंद्र चटर्जी माहीत असतात, पण राष्ट्रप्रतिज्ञा लिहिणारे पेदेमरी व्यंकट सुब्बाराव मात्र माहीत नसतात.
२०१२ साली या प्रतिज्ञेचा सुवर्णमहोत्सव पैदीमारी व्यंकट सुब्बाराव यांच्या कुटुंबियांतर्फे साजरा करण्यात आला. त्यावेळी एक-दोन स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये त्याची दखल घेण्यात आली. सुब्बाराव यांच्या कुटुंबियांची सरकारकडे मागणी आहे की, त्यांनी सुब्बाराव यांना राष्ट्रप्रतिज्ञेचे जनक म्हणून योग्य तो सन्मान द्यावा. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रप्रतिज्ञेच्या खाली लेखक म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख असावा. त्यांचा जन्मदिन व स्मृतिदिन यांची आंध्रप्रदेश व तेलंगणा सरकारने नोंद घ्यावी. पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात यावी, अशीही त्यांच्या कुटुंबाची इच्छा आहे.
सुब्बाराव यांचे सुपुत्र पैदीमारी व्यंकट सुब्रहमण्यम यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीनंतर शिक्षणमंत्री जगदीश रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या वडिलांच्या कार्याविषयी माहिती दिली. तेव्हा त्यांनी पैदीमारी व्यंकट सुब्बाराव यांचं छायाचित्र आणि काही थोडीफार माहिती इयत्ता पाचवीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली. पण ते तेवढंच राहिलं. आपल्या वडिलांच्या कार्याची दखल सरकार नीटपणे घेत नसल्याची खंत पैदीमारी व्यंकट सुब्बाराव यांच्या कुटुंबाला आजही आहे.
साधारणपणे आता जे पन्नाशीच्या सुमारास असतील, त्यांनी आपल्या शाळेच्या दिवसांत ही प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात केली असेल. म्हणजे जवळपास तीन-चार पिढ्या ही प्रतिज्ञा आपल्या शालेय जीवनात रोज म्हणत आलेल्या आहेत. पण तरीही जर आपल्याला या प्रतिज्ञेच्या मूळ लेखकाविषयी काहीच माहिती नसेल, तर ते एका अर्थाने चुकीचंच आहे, नाही का! आतातरी आपण हा प्रयत्न करूया. शक्य असेल तितक्या जणांपर्यंत ही माहिती पोहोचवूया.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.