आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारत जेव्हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वाटला गेलेला होता तेव्हा अनेक शतके एखाद्या घराण्याचे भारतावर अधिपत्य असायचे. आज भारतातील राजेशाही जाऊन काही दशकांचा कालावधी उलटलेला आहे. आज जरी भारतात होऊन गेलेल्या राजा-महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाच्या गोष्टी आजही आपल्या लोकांना प्रेरणा देत असतात.
आपल्या पराक्रमाच्या बळावर इतिहासात नाव कोरणारे अनेक राजे झाले, अनेकांनी आपले रक्त सांडून वीरतेचं प्रदर्शन केलं तर अनेकांनी शत्रूच्या रक्ताने मातृभूमीचा अभिषेक केला, या सर्व शूर आणि परमप्रतापी राजांच्या यादीतील एक दार महत्वाचे आणि अल्प परिचयाचे नाव आहे सम्राट समुद्रगुप्त!
सम्राट समुद्रगुप्त भारताचा नेपोलियन म्हणून देखील ओळखला जातो. त्यांनी अनेक विदेशी शक्तींचा दारुण पराभव करून आपल्या सामर्थ्याचा वस्तुपाठ दिला होता. आपला पुत्र विक्रमादित्य(दुसरा चंद्रगुप्त) याच्या भारतातील स्वर्ण युगाची मुहूर्तमेढ त्याने रोवली होती.
समुद्रगुप्ताचा जन्म कधी आणि कुठे झाला याचे प्रमाण देणारी माहिती उपलब्ध नाही, पण त्याच्या शासनकाळाची वर्णन करणारी ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत. यानुसार त्याचा शासनकाळ इसवी सन ३३० -३८० या काळात त्याचे भारतावर शासन होते, अशी माहिती मिळते.
समुद्रगुप्त बालपणापासूनच अत्यंत चतुर होता. त्याच्यात एका राजाच्या अंगी असाव्या त्या सर्व गुणांचा अंतर्भाव होता. त्याच्या अद्वितीय अशा सामर्थ्याने प्रभावित झालेल्या चंद्रगुप्त(पहिला) या त्याच्या पित्याने त्याला आपल्या गादीचा वारसदार म्हणून नेमले होते. चंद्रगुप्ताने घेतलेला हा निर्णय अनेकांच्या पचनी पडला नाही आणि त्यांनी त्याच्या साम्राज्यावर आक्रमण करण्याचा निर्धार केला. यात समुद्रगुप्ताच्या भावांचा देखील समावेश होता. त्यांना हा निर्णय अजिबात पचनी पडला नव्हता.
परंतु समुद्रगुप्त देखील काही लेचापेचा नव्हता, त्याने व्यवस्थितपणे त्याचा भावांच्या बंडाचा बिमोड करत, सिंहासनावरील आपली दावेदारी सिद्ध केली. यानंतर समुद्रगुप्त कधीच हरला नाही, त्याने गुप्त्यांच्या छोट्याशा राज्याचे विशाल साम्राज्यात रूपांतर करण्याचे कार्य केले.
ज्यावेळी समुद्रगुप्त सिंहासनावर बसला तेव्हा गुप्त साम्राज्याचा विस्तार इतका झालेला नव्हता. त्यावेळी भारतभूमी शेकडो लहान मोठ्या राज्यात विभागली गेली होती, त्यापैकी एक गुप्त साम्राज्य होते. भारतीय राज्ये एकमेकांची कट्टर शत्रू होती, यामुळे सतत त्यांच्यात युद्ध व्हायचे. समुद्रगुप्ताने निर्धार केला की या छोट्याछोट्या राज्यांचा बिमोड करून आपले एकछत्री साम्राज्य स्थापन करावे. मग तो आपल्या भारत दिग्विजय यात्रेवर निघाला.
भारत दिग्विजयासाठी त्याने चालवलेले प्रत्येक अभियान यशस्वी होत होते. पहिल्या आर्यवर्त युद्धात त्याने तीन राज्यांचा बिमोड करून त्यांना आपल्या साम्राज्याला जोडले. पुढे त्याने दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली आणि दक्षिणेच्या बारा राज्यांचा पराभव केला. समुद्रगुप्ताचे वैशिष्ट्य असे होते की तो ज्या राजांना हरवत असे, त्यांचा कधीच वध करत नसे. यामागे त्याच्या दूरदृष्टीचा विचार होता, ज्यामुळे त्याचे साम्राज्य अजून सुरक्षित झाले होते.
लहान मोठी राज्ये आपल्या साम्राज्याला जोडण्याचा समुद्रगुप्ताचा अश्वमेध असाच सुरू होता. त्याने पुढे दुसरी आर्यवर्त मोहीम काढून अजून राज्ये आपल्या साम्राज्याला जोडली. त्याने आपल्या ताकदीचे प्रदर्शन भरवले, त्याची ताकद बघून विदेशी शत्रूंचा देखील थरकाप उडाला होता. समुद्रगुप्ताचा एकही शत्रू त्याच्या विरोधात उभा राहण्याचे सामर्थ्य बाळगत नव्हता. उत्तरेतील हिमालय, दक्षिणेतील नर्मदा, पूर्वेकडील ब्रम्हपुत्रा आणि पश्चिमेकडील यमुना नदीपर्यंत त्याने आपला साम्राज्य विस्तार केला होता. याचमुळे प्रसिद्ध इतिहासतज्ञ ए. व्ही. स्मिथ यांनी त्याला “भारताचा नेपोलियन” असे म्हटले आहे.
‘प्रयाग प्रशस्ति ‘नावाच्या एका अभिलेखात समुद्रगुप्ताच्या पराक्रमाची विक्रमगाथा आढळून येते. हा अभिलेख समुद्रगुप्ताशी संबंधित ऐतिहासिक घटनांचा आरसा आहे. समुद्रगुप्ताचा दरबारी हरिसेन याने याची निर्मिती केली होती.
समुद्रगुप्त फक्त पराक्रमीच नव्हता, तर अनेक कलागुण त्याच्या अंगी भिनलेले होते. तो एक कुशल वीणावादक होता. त्याला संगीताची उत्तम जाण होती. तो एक चांगला संगीतकार होता. त्याने बनवलेल्या नाण्यांमध्ये त्याच्या या आवडीची छाप आढळून येते. या नाण्यात त्याच्या हातात वीणा आढळून येते.
समुद्रगुप्त जितका क्रूर योद्धा होता, तितकाच कवि मनाचा शासक होता. त्याला कवितेवर विशेष प्रेम होते, तो कविता करायचा आणि त्याच्या दरबारात असंख्य कविता म्हटल्या जायच्या, असा अनेक इतिहासकार असा दावा करतात, पण त्या संदर्भातील पुरावे उपलब्ध नसल्याने ही फक्त एक आख्यायिका मानली जाते.
भारताच्या मुद्रा या चलनावर समुद्रगुप्ताने आपला ठसा उमटवला होता. त्याने स्वर्ण-तांब्याची नाणी प्रचलनात आणली होती. त्याने आपल्या शासनकाळात सात प्रकारच्या नाण्यांची निर्मिती सुरू केले होते. या नाण्यांना अर्चर, बैकल, एक्स, अश्वमेध, टायगर स्लेयर, राजा आणि राणी, लयरिस्ट अशी नावं ब्रिटिश इतिहास अभ्यासकांनी ठेवली होती.
समुद्रगुप्ताचे वैवाहिक जीवन तसे फार फुललेले होते, त्याने अनेक स्त्रियांशी विवाह रचला, पण त्याला पुत्र मात्र फक्त त्याची पट्टराणी अग्रमहिषी पट्टमहादेवी यांच्यापासून प्राप्त झाला. समुद्रगुप्ताने त्या पुत्राचे नामकरण चंद्रगुप्त असे केले. हा दुसरा चंद्रगुप्त पुढे विक्रमादित्य या नावाने इतिहासात अजरामर झाला. याने गुप्त साम्राज्याला एका वेगळ्या उंचीवर नेले.
आपल्या अत्यंत प्रभावशाली शासनकाळानंतर इसवी सन ३८० मध्ये समुद्रगुप्ताने आपला देह ठेवला. त्याने देह ठेवला त्यावेळी त्याने गुप्तांच्या छोट्या राज्याला साम्राज्यात रूपांतरित केले होते. आज देखील इतिहासाचे वाचन करणाऱ्या प्रत्येकाला या समुद्रगुप्ताची आणि त्याच्या अद्वितीय अशा पराक्रमाची ओढ असतेच. त्याचा तो पराक्रम आणि त्याचे ते संगीतप्रेम आजही इतिहास अभ्यासकांना चर्चा करण्यास भाग पाडत असते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.