आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आजपासून भारत आणि इंग्लंडच्या दरम्यान कसोटी मालिका सुरु होतेय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरात भारतात एकही सामना खेळण्यात आला नव्हता. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडिअमवर पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आज आपण कसोटी सामना नेमका कसा खेळला जातो, त्याचे नियम काय आहेत, हे जाणून घेऊयात..
क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्ती दिवस खेळला जाणारा सामना म्हणजे कसोटी. कसोटी सामन्यात नावाप्रमाणेच क्रिकेटपटूच्या खऱ्या कौशल्याची कसोटी घेतली जाते. क्रिकेटच्या इतिहासात आजवर अनेकदा कसोटी सामन्याचे नियम बदलण्यात आले आहेत.
पूर्वीच्या काळी कसोटीच्या मॅचेस या सात-सात दिवस चालायच्या. पण काही वर्षांनी या सामन्यांचे दिवस निश्चित करण्यात आले. पाच दिवसाच्या कसोटी सामन्यात प्रत्येक संघाला दोन इनिंग्स खेळायला मिळतील असा नियम आला. यात पूर्वी तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या मध्ये एक दिवस खेळाडूंना आराम करण्यासाठी मिळायचा पण, 1997ला ब्रिजटाऊन येथे भारत-वेस्ट इंडिजदरम्यान झालेल्या सामन्यानंतर हे बंद करण्यात आलं.
कसोटी सामन्यात प्रत्येक दिवशी 30 ओव्हरचे तीन सेशन्स असतात. यामध्ये दोन्ही संघाला दोन वेळा बॅटिंगची संधी मिळते.
समजा, ‘अ’ संघाने पहिली बॅटिंग केली आणि ‘ब’ने दुसरी तर पुढच्या इनिंगमध्येही याच क्रमाने बॅटिंगची संधी दिली जाईल. याला फॉलो-ऑनचा अपवाद आहे. जर ‘ब’ संघाने पहिल्या इनिंगमध्ये ‘अ’पेक्षा जास्ती धावा काढल्या तर जेवढ्या धावा जास्ती असतील तेवढ्या धावांची आघाडी घेतली असं म्हटलं जातं.
आता जर, ‘अ’ संघाने धावांचा भला मोठा डोंगर रचला आणि ‘ब’ला तेवढ्या धावा काढता आल्या नाही. २०० धावांपेक्षा जास्ती फरक असतानाच ‘ब’चे सगळे खेळाडू आउट झाले तर अशा वेळी ‘अ’ संघाचा कॅप्टन ‘ब’ला पुन्हा एकदा खेळायला बोलावून धावांची बरोबरी करण्याची संधी देऊ शकतो. यालाच “फॉलो-ऑन” म्हणतात. अर्थात “फॉलो-ऑन”चा निर्णय हा ‘अ’ संघाच्या कॅप्टनवर असतो.
एखाद्या वेळी जर एखाद्या संघाला वाटलं की आपण बऱ्यापैकी धावा काढल्या आहेत आणि समोरचे खेळाडू काही एवढ्या धावा काढू शकणार नाहीत तर अशा वेळी तो संघ आपला डाव घोषित करून दुसऱ्या संघाला बॅटींग करायला बोलावू शकतो.
जेव्हा दोन वेळा बॅटींग करूनही ‘अ’ संघ ‘ब’ची बरोबरी करू शकत नाही त्यावेळी ते तो सामना एका इनिंगने हारले असं घोषित करण्यात येतं आणि जर दोन्ही संघाच्या दोन्ही इनिंग पाच दिवसात संपल्या नाहीत तर मॅच ड्रॉ होते.
ओव्हर लिमिट
कसोटी सामन्यात एका दिवसात किमान ९० ओव्हर टाकायचे असतात किंवा एका तासात किमान १५ ओव्हर शेवटचा दिवस वगळता. शेवटच्या दिवस किमान ७५ ओव्हर खेळले गेले पाहिजेत असा नियम आहे.
ज्यावेळी एखादा संघ आपला डाव घोषित करतो किंवा एखाद्या संघातील सगळेच खेळाडू बाद होतात त्यावेळी त्यादिवशीच्या एकूण ओव्हरमधून दोन ओव्हर कमी करण्यात येतात.
डिसीजन रीव्हीव्यू सिस्टिम (DRS)
DRS पहिल्यांदा नोव्हेंबर २००९ साली न्युझीलंड आणि पाकिस्तान दरम्यान खेळण्यात आलेल्या सामन्यात वापरण्यात आलं होतं. DRS मैदानावर असलेल्या अंपायरच्या निर्णयाला रीव्हीव्यू करण्याची मागणी करणं.
सुरुवातीला दोन्ही संघांना प्रत्येक इनिंगमध्ये जास्तीतजास्त दोन रीव्हीव्यू देण्यात आले होते. त्यानंतर ८० ओव्हर झाल्यानंतर रीव्हीव्यू वाढवून देण्याचा प्रस्ताव आला होता. पण आता कोणालाच रीव्हीव्यू वाढवून मिळत नाहीत. प्रत्येक संघाला दोनच रीव्हीव्यू असतात.
फ्ल्डलाइट्स
कसोटी सामने कायमच दिवसा खेळण्यात आले आहेत. लाईट केवळ त्यादिवशीचा सामना संपवताना लागले तर वापरण्यात येतात.
पण, कसोटी सामने लोकप्रिय करण्यासाठी ICCने “डे-नाईट” सामन्यांचे आयोजन करायला सुरुवात केली. हे सामने गुलाबी बाॅलने खेळले जातात.
पहिला “डे-नाईट” कसोटी सामना नोव्हेंबर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड यांच्यादरम्यान खेळण्यात आला होता.
आता, या कसोटी सामन्यांचे नियम दिवसा खेळल्या जाणाऱ्या सामन्यांपेक्षा जरा वेगळे असतात. यात दोन्ही संघांमध्ये एक करार करण्यात येतो, शिवाय त्यांना “डे-नाईट” सामने खेळवण्यासाठी ICCची परवानगी देखील मिळवावी लागते. या कराराच्या माध्यमातूनच सामन्याचे नियम ठरवण्यात येतात. ज्यामध्ये दर दिवशी सहा तासांचा खेळ निश्चित करण्यात येतो. बाकी नियम त्या त्या देशांचे बोर्ड ठरवतात.
कोरोना वर्षानंतर पहिल्यांदाच भारतात कोणते सामने आयोजित करण्यात येतायत. नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळवलेल्या विजयाने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच विराट कोहली, इशांत शर्मा आणि ओपनर के एल राहुल यांचेही संघात पुनरागमन झाले आहेत. एकूणच या कसोटी मालिकेसाठी उत्साहाचं वातावरण आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.