आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२०१९ साली मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा पारित केल्यानंतर या कायद्याविरोधात देशभर निदर्शने करण्यात आली. हा कायदा अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांसाठी धोक्याची घंटा असल्याचे धादांत खोटे अनियंत्रितपणे पसरवले गेले. दिल्लीतील शाहीनबाग मैदानावर तर याविरोधात मोठे आंदोलन उभे राहिले होते.
देशभर या आंदोलनाविरोधात निदर्शने सुरु असताना प्रसिद्ध इतिहास तज्ञ आणि भाष्यकार रामचंद्र गुहा हे देखील या बेंगळूरू येथील निदर्शनात सामील झाले असताना, कर्नाटक पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
रामचंद्र गुहा हे नेहमीच राजकीय घडामोडींवर आपले परखड मत व्यक्त करत असतात. रामचंद्र गुहा यांच्या या अटकेनंतर सोशल मीडियातून कर्नाटक सरकार, कर्नाटक पोलीस यांच्यावर निशाणा साधत पोस्ट करण्यात आल्या.
अरुंधती रॉय, देवदत्त पटनायक यासारख्या लेखकांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला होता. एखाद्या शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनात घुसून पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई करणे हे दडपशाहीचे लक्षण असल्याचेही म्हटले गेले.
रामचंद्र गुहा एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना खेचत नेले. देशातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि अभ्यासक यांना पोलिसांनी अशा प्रकारे दिलेल्या वागणुकीवरही अनेकांनी रोष व्यक्त केला होता.
पोलिसांच्या मते, शहरातील टाऊन हॉल परिसरात १४४ कलम अंतर्गत जमावबंदी लागू केलेली असताना रामचंद्र गुहा त्याच ठिकाणी उभे होते म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती.
ज्येष्ठ इतिहास तज्ञ रामचंद्र गुहा नेहमीच राजकीय निर्णयावर आणि राजकीय घडामोडींवर वेळोवेळी आपले विचार मांडत असतात. कधी कधी ते कॉंग्रेसवर टीकाटिप्पणी करतात तर कधी भाजपवरही निशाणा साधतात.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुका पार पडण्यापूर्वी त्यांनी भाजपला अच्छे दिन येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. तत्कालीन राजकीय घडामोडी आणि कॉंग्रेसची कामगिरी पाहता येत्या काळात कॉंग्रेसचे भविष्य धोक्यात असल्याचे भाकीतही त्यांनी वर्तवले होते.
कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्वच धोक्यात येईल असेही ते म्हणाले होते. पक्षात गांधी घराण्याच्या वारसाऐवजी नवे नेतृत्व पुढे आले तरच कॉंग्रेस भविष्यात टिकू शकेल.
कॉंग्रेसला टिकून राहण्यासाठी गांधी घराण्याची आवश्यकता नाही. मात्र गांधी घराण्याला कॉंग्रेसची गरज आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली होती.
२०१४ च्या निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेचेही भाकीत त्यांनी त्यापूर्वीच केले होते. नरेंद्र मोदी यांनी भाजपला मोठे केले आहे. त्यामुळे पक्षात त्यांचे वजन आहे. निवडणुकीत मोदी लाटेने कहर केल्यास त्यात आश्चर्यकारक काहीच नसेल. त्यानंतरही रामचंद्र गुहा यांनी कित्येकदा भाजपचे आणि मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
१९६० आणि ७० च्या दशकात कॉंग्रेस एक मजबूत पक्ष होता. कॉंग्रेसला देशपातळीवर विरोध करेल असा एकही विरोधी पक्ष नव्हता. आज तीच परिस्थिती भाजपची आहे. येत्या काळात भाजपला विरोध करणारा एकही राष्ट्रीय पक्ष निर्माण होणार नाही, असाही अंदाज गुहा यांनी वर्तवला होता.
राष्ट्रीय पातळीवर भाजपला पर्याय ठरेल असा एकही पक्ष आज दिसत नाही. पुढील १५-२० वर्षे भाजपचीच असतील. या काळात भाजपची ताकद वाढेल. भाजपच्या इशाऱ्यावरच भारताच्या राजकारणाची दिशा आणि दशा ठरवली जाईल असेही ते म्हणाले होते.
२०१७ मध्ये रामचंद्र गुहा यांनी आणखी एक खळबळजनक विधान करून स्वतःवर रोष ओढवून घेतला होता. एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी असे विधान केले होते की, कॉंग्रेस पक्ष हा नेतृत्व नसलेला पक्ष आणि नितीशकुमार पक्ष नसलेले नेते आहेत.
गुहा यांच्या बोलण्याचा अर्थ हाच होता की, कॉंग्रेसकडे कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे. महत्त्वाचे म्हणजे हे जाळे देशभर पसरलेले आहे. परंतु कॉंग्रेसकडे सक्षम नेतृत्व नाही. त्यांना राहुल गांधीमध्ये एका सक्षम नेत्याचे गुण नाहीत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नेतृत्व चांगले आहे. ते एक चांगले नेते असूनही त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी नाही. त्यांच्या पक्षाला देशपातळीवर मोठा जनाधार नाही.
त्यांच्या मते जर नितीशकुमार यांच्याकडे कॉंग्रेसचे नेतृत्व दिले तर कॉंग्रेसचा आणि देशाचा दोन्हींचाही कायापालट होऊ शकतो. मात्र, रामचंद्र गुहा यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात बराच धुरळा उडाला होता.
यानंतर त्यांनी मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक करणारे एक विधान केले होते.
पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे तिसरे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत. मोदींची जादू ही कुठल्याही धर्म, जाती आणि भाषेच्या कुंपणात बंदिस्त नाही. सर्व स्तरातील जनतेवर त्यांचा प्रभाव आहे.
रामचंद्र गुहा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे भरलेल्या परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले होते.
गेल्या काही वर्षात दलित नेत्यांचे जे अटक सत्र सुरु आहे. त्याबाबतही रामचंद्र गुहा यांनी नाराजी व्यक्त केली होती. मानवाधिकार कार्यकर्त्यांचे जे अटक सत्र सरकारने सुरु केले आहे, ते एक अत्यंत दमनकारी पाऊल आहे. सरकार अशा पद्धतीने त्यांचा आवाज दाबू पाहत आहे. सरकारचे हे काम बेकायदेशीर आहे.
देशातील आणि बाहेरील भांडवलदार इथल्या आदिवासींच्या जमिनी, जंगल आणि खनिज संसाधनावर डोळा ठेवून आहेत. सरकार त्यांना पाठीशी घालण्यासाठी असली कामे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
२०१८ मध्ये महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. पी वरावरा राव, गौतम नवलखा, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, अनु भारद्वाज यासह काही डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अटक केली होती.
तेंव्हा आपल्या ट्विटर वरून त्यांनी याबद्दल ट्विट करताना म्हटले होते, “महात्मा गांधींचा चरित्र लेखक या नात्याने मी इतकेच आज जर महात्मा गांधी असते, तर ते नक्कीच आपला वकिली कोट चढवून या कार्यकर्त्यांच्या बचावासाठी कोर्टात उतरले असते. मोदी सरकारने त्यांनाही अटक केली असती तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.”
अटक करण्यात आलेले हे माओवादी नेते मोदींच्या ह*त्येचा कट रचण्यात सहभागी होते, असा दावा पोलिसांनी केला होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.