आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
१९८८चा फेब्रुवारी महिना संपत आला होता. उन्हाळा हळूहळू रंगात येत होता. मुंबईच्या कुंद दमट वातावरणात सुप्रसिद्ध हॅरीस शिल्डची क्रिकेटची सेमीफायनल सुरू होती. शारदाश्रम विद्यामंदिर विरुद्ध सेंट झेव्हिअर्स. बारा-पंधरा वर्षांची लहान लहान मुलं जीव तोडून खेळत होती. तो काळ PUBG खेळण्याचा नव्हता, ना आई-वडिलांनी ‘जीत की तैय्यारी’ म्हणत बोर्नव्हिटा घेऊन मागे पळण्याचा.
२४ फेब्रुवारी १९८८.
तो दिवस कोणाचं तोंड बघून उजाडला होता माहिती नाही, पण तो दिवस विलक्षण होता. एकच दिवस, एकच घटना; पण तिघांच्या आयुष्याच्या धूसर आणि अपरिचित वाटा ठळक करणारा तो दिवस होता.
शारदाश्रमच्या दोन विकेट पडल्या होत्या. कुरळ्या केसांचा मुलगा आणि त्याचा मित्र बॅटिंग करत होते. ते दोघं त्या दिवशी काय खाऊन आले होते माहिती नाही, पण आऊट व्हायचं नावंच घेत नव्हते. बघताबघता त्यांनी इतिहास रचला. तिसऱ्या विकेटसाठी साडे सहाशेपेक्षा जास्त, म्हणजेच ६६४ रन्सची पार्टनरशिप झाली होती. टीमचे ७४८ रन्स झाले होते. जागतिक विक्रम होता तो. झेव्हिअर्सचे खेळाडू बॉलिंग आणि फिल्डिंग करून वैतागले होते. शेवटी शारदाश्रमनं इनिंग डिक्लेअर केली.
त्या दोघांच्या नावांनी आसमंत भरून टाकला होता. ती दोन मुलं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. सचिननं ३२६, विनोद कांबळीनं ३४९ रन्स केले होते.
त्याच मॅचमध्ये विनोद कांबळीनं २३ ओव्हर्समधे ३७ रन्स देऊन ६ विकेट काढल्या होत्या. शारदाश्रमनी ती मॅच तब्बल ६०२ रन्सनी जिंकली…
पण एकीकडं हे सगळं होत होतं, तेव्हा मुलगा होता, जो पॅड बांधून बसला होता. सचिन किंवा विनोदपैकी कोणी आऊट झालं, की पुढचा नंबर त्याचाच होता. पण ही वेळच आली नाही. दिवसभर ते दोघेच खेळत राहिले.
पॅड बांधून वाट बघत असलेला तो मुलगा म्हणजे अमोल मुझुमदार. पण त्याचा नंबर आलाच नाही.
पण ही फक्त त्या मॅच पुरतीच नाही, तर अमोल मुझुमदारच्या आयुष्याचीही करूण कहाणी झाली…
एवढ्या कमी वयात असा पराक्रम केल्यावर अर्थातच सचिन आणि विनोदच्या नावाची सगळीकडं चर्चा झाली. बघताबघता सचिन आणि विनोद दोघेही इंटरनॅशनल खेळू लागले. पुढं काय झालं, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सचिन ‘गॉड ऑफ क्रिकेट’ झाला, तर सगळ्यात जास्त बॅटिंग एव्हरेज असूनही वयाच्या फक्त तेविसाव्या वर्षी विनोद कांबळी आपली शेवटची टेस्ट मॅच खेळला…
आणि अमोल, त्या मॅचसारखं, आयुष्यभर पॅड बांधून संधीची वाट बघत बसला.
गुणवत्तेत तोही कमी नव्हताच कधी. तोही रमाकांत आचरेकरांकडेच शिकला होता. राहुल द्रविड सारखा चिवट होता. आऊटच व्हायचा नाही. पुढं रणजी, फस्ट क्लास खेळला. सगळे त्याला पुढचा सचिन म्हणत होते. खोऱ्यानं रन्स काढतच राहिला.
१९९६ साली इंग्लंडला झालेल्या सिरीजमधे चान्स मिळण्याची शक्यता होती, पण गांगुली आणि द्रविड यांना संधी मिळाली. दोघांनीही ती सिरीज गाजवली, आणि आपली जागा कायमची पक्की केली.
इकडं अमोल फर्स्ट क्लास क्रिकेटमधे खोऱ्याने धावा बनवतच राहिला. दोन हजारच्या दशकात तोवर टीममध्ये लक्ष्मण, सेहवाग, युवराज, कैफ असे अनेक खेळाडू आले होते.
त्याच्यापेक्षा कमी टॅलेन्टेड समजले जाणारे खेळाडूसुद्धा निळ्या जर्सीत दिसले. पण अमोल फक्त वाट बघत बसला.
शेवटी त्यानं वैतागून पूर्ण क्रिकेट कीट पोत्यात बांधून माळावर टाकलं. फर्स्ट क्लाससुद्धा खेळायचं नाही असं ठरवलं. पण पुढं बायकोने त्याला समजावलं. मुंबईसाठी खेळायला मिळणे हीसुद्धा साधी गोष्ट नाही आणि काय माहित नशिबाने साथ दिली तर देशासाठी खेळायची संधी देखील मिळेल. अमोल कसाबसा कन्व्हिन्स झाला. परत जिद्दीने प्रॅक्टीस सुरु केली.
पुढं त्याच्यानंतर आलेले वसीम जाफर, अजित आगरकर, साईराज बहुतुले हेसुद्धा भारताकडून खेळून गेले. पण रणजी क्रिकेटमधे ११ हजार रन्स करून पण अमोल मुझुमदारची प्रतीक्षा कधी संपलीच नाही…
अमोल आज साऊथ आफ्रिकेचा बॅटिंग कोच आहे. गुणवत्ता, नशीब आणि कष्ट या तिन्ही गोष्टी कमी-जास्त प्रमाणात असाव्याच लागतात. एखादी गोष्ट जर कमी पडली, तर आयुष्याचं सगळं चित्रंच बदलून जातं.
संकटं, अडचणी, संघर्ष कोणालाच चुकलेला नाहीये. पण नशिबानं रडीचा डाव खेळल्यावरही जो रडत नाही, त्यालाच आयुष्याचा खरा अर्थ समजला. आलेल्या अडचणींवर मात करताच आली पाहिजे. किमान तसे प्रयत्न तरी आपण पूर्ण ताकदीने करायला हवेत. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक अपूर्णांक असतो, पण असे सगळे अपूर्णांक मिळून एक पूर्णांक होत असतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.